‘झी टीव्ही’वर सध्या ‘कुबूल है’ ही मालिका गाजत आहे. या मालिकेतील आसाद, झोया आणि आस्या यांनी कित्येकांच्या मनात घर केलं आहे.
मुंबई – ‘झी टीव्ही’वर सध्या ‘कुबूल है’ ही मालिका गाजत आहे. या मालिकेतील आसाद, झोया आणि आस्या यांनी कित्येकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील आसाद अहमद खान या भूमिकेने करणसिंग ग्रोव्हरला यशाचं शिखर दाखवलं. त्यानंतरच तर करणसिंग ग्रोव्हर अनेक तरुणींच्या हृदयाची धडकन बनला.
तसा ‘दिल मिल गये’ या मालिकेतही करणने त्याची छाप सोडली होती, पण मध्यंतरीच्या काळात करणसिंग ग्रोव्हर स्वत:हूनच या मालिकेतून बाहेर पडला होता. त्यासाठी त्यानं तब्येत बरी नसल्याचं कारण पुढं केलं होतं. त्यामुळे या मालिकेतली आसादची भूमिका राकेश वशिष्ठला देण्यात आली.
पण मालिकेच्या कट्टर चाहत्यांनी राकेशला बिलकुल स्वीकारलं नाही, उलट ई-मेल करून, फोन करून, फेसबुक-ट्विटरवर पोस्ट्स टाकून करणलाच परत बोलवा, असा धोशा त्याच्या चाहत्यांनी चॅनेलकडे लावला. आणि हे कानावर आल्यावर करणला ‘सुबुद्धी’ सुचून, झुकतं माप घेत त्यानं स्वत:ची चुकी मान्य केली आणि परत येण्याची तयारी दाखवली, अशी चर्चा कानावर येतेय. त्यामुळे येत्या काही भागांतच करण ‘कुबुल है’ मालिकेत पुनरागमन करेल, अशी चिन्हं दिसत आहेत. मालिकाही २० वर्षाची उडी घेऊन पुढं सरकणार आहे, आणि याचा फायदा घेऊन करणला पुन्हा एकदा इंट्रोडयुस केलं जाण्याची शक्यता आहे.