वरळीतील कॅम्पा कोलातील इमारतींमधील अनधिकृत मजल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेले महापालिकेचे पथक दुस-या दिवशीही हात हलवत माघारी फिरले.
मुंबई – वरळीतील कॅम्पा कोलातील इमारतींमधील अनधिकृत मजल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेले महापालिकेचे पथक दुस-या दिवशीही हात हलवत माघारी फिरले. शनिवारीही शांततापूर्ण परिस्थितीत कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका घेत केवळ रहिवाशांची विनवणी केल्याशिवाय त्यांना काहीच करता आलेले नाही. मात्र या कारवाईला पोलिस संरक्षणही न मिळाल्यामुळे शुक्रवारप्रमाणे महापालिकेची ही कारवाई रहिवाशांसह सर्वच यंत्रणांसाठी वेळखाऊपणाची ठरली. दोन दिवसांच्या वेळखाऊपणानंतर रविवारीही कारवाईची मोहीम सुरूच राहणार असून महापालिका बळाचा वापर न करता शांततेच्या मार्गाने कारवाई करणार असल्याचे महापालिका उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांनी स्पष्ट केले.
वरळीतील कॅम्पा कोला कंपाउंडमधील सहा इमारतींतील ३५ अनधिकृत मजल्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारपासून महापालिकेने कारवाई मोहीम हाती घेतली. कारवाईच्या पहिल्याच दिवशीच महापालिकेने शांततामय मार्गाने कॅम्पा कोलात प्रवेश करून जलजोडणी, वीजजोडणी आणि गॅसजोडणी तोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु रहिवाशांनी प्रवेशद्वारावरच ठाण मांडून प्रवेशद्वार उघडण्यास नकार दिल्यामुळे शुक्रवारी कोणतीही कारवाई न करता माघारी परतणा-या महापालिकेच्या पथकाला शनिवारीही लोकांची विनवणी करत माघारी फिरावे लागले.
शनिवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास परिमंडळ दोनचे महापालिका उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांच्या नेतृत्वाखाली केशव उबाळे, शरद उघडे, संजय कुऱ्हाडे आदी सहायक आयुक्त पोलिस अधिका-यांसह घटनास्थळी पोहोचले. मात्र महापालिकेचे पथक आले असले तरी प्रत्यक्षात पोलिस सुरक्षा तैनात करण्यात आली नव्हती. त्यामुळे बाराच्या सुमारास या पथकातील अधिका-यांनी प्रवेशद्वारावर जाऊन गेट उघडण्याची विनंती केली. परंतु त्यांनी प्रवेशद्वार उघडण्यास नकार दिला. मात्र, याच वेळी प्रवेशद्वार अडवून ते उघडू देण्यास नकार दिल्यामुळे या सर्वाचे चित्रीकरण करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
त्याप्रमाणे विरोध करणा-यांचे चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर आनंद वाघ्राळकर यांनी, आजही शांततामय वातावरणात महापालिका कारवाई करणार असून रहिवाशांनी महापालिकेला सहकार्य करावे, अशी विनंती केली. परंतु त्यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याने या लोकांचे चित्रीकरण केले आहे. त्याआधारे न्यायालयाच्या आदेशाच्या उल्लंघन प्रकरणी या सर्वावर कशा प्रकारे अवमान याचिका दाखल करता येईल, याची सर्व माहिती संकलित करून या सर्वाच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कॅम्पा कोलातील रहिवाशांवर गुन्हा दाखल
वरळीच्या कॅम्पा कोला इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आदेश देऊनही कारवाईत अडथळा निर्माण करणा-या या सोसायटीतील रहिवाशांविरोधात महापालिका प्रशासनाने वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आणि महापालिकेच्या कामात अडथळा आणल्यामुळे हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री महापालिका प्रशासनाच्या अधिका-यांनी वरळी पोलिस ठाणे गाठले. शुक्रवारी पालिकेचे अधिकारी कारवाई करता गेले होते. मात्र तेथील रहिवाशांनी पालिकेच्या कामगारांना कारवाई करण्यास विरोध केल्याचे व्हीडिओ चित्रीकरण पोलिसांना दिले. त्यानुसार सोसायटीच्या नागरिकांविरोधात भा.दं.वि. कलम ३५३, ३४१, १४१, १४२, १४५, १४९नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. चित्रीकरण पाहून त्यानंतर पुढील कारवाई करू, असे पोलिसांनी सांगितले.