बुरखा परिधान केलेल्या महिलेला सुरक्षारक्षकांनी लहान मुलांच्या वॉर्डात जाण्यास रोखल्याने रुग्णाच्या नातेवाइकांनी गोंधळ घातल्याची घटना शनिवारी केईएम रुग्णालयात घडली.
मुंबई – बुरखा परिधान केलेल्या महिलेला सुरक्षारक्षकांनी लहान मुलांच्या वॉर्डात जाण्यास रोखल्याने रुग्णाच्या नातेवाइकांनी गोंधळ घातल्याची घटना शनिवारी केईएम रुग्णालयात घडली. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे.
देशाच्या कानाकोप-यातून रुग्ण मोठया संख्येने उपचारासाठी केईएम रुग्णालयात येतात. त्यातच पाच वर्षापूर्वी शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात आणि पाच महिन्यांपूर्वी वाडिया रुग्णालयातून मूल चोरीच्या घटना घडल्या आहेत. शीवच्या टिळक रुग्णालयातून मूल चोरी झाल्याची घटना घडल्यानंतर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने सर्वच सरकारी रुग्णालयांना आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सांगितले होते.
केईएम रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये शनिवारी एका बुरखाधारी महिलेला प्रवेश करताना तेथील सुरक्षारक्षकांनी रोखले. त्यावर धार्मिक भावना दुखावल्याने त्याबाबतची माहिती त्या महिलेने आपल्या नातेवाइकांना दिली. या संदर्भात नातेवाइकांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संध्या कामत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी त्या महिलेला बुरखा काढून त्यानंतर वॉर्डात प्रवेश करण्याच्या सूचना केल्या होत्या.
बुरखा परिधान करणारी व्यक्ती त्यात मूल लपवून सहजपणे बाहेर पडू शकते, अशी भीती रुग्णालयातील एका वरिष्ठ सुरक्षा अधिका-याने व्यक्त केली. त्यामुळे वॉर्ड क्र. २ येथील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. या घडल्या प्रकाराची चौकशी डॉ. शुभांगी पारकर करत असून, ती सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, त्या महिलेने पुरुष सुरक्षारक्षकाने आपला विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. याबाबत अधिष्ठाता डॉ. संध्या कामत यांच्याकडे विचारणा केली असता, या प्रकरणाची चौकशी सुरू असून, त्याचा अहवाल आल्यावर सुरक्षारक्षकाने विनयभंग केला आहे की नाही, हे सिद्ध होईल, असे सांगितले.