एम. एल. डहाणूकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेलं ‘झोपाळा’ हे दोन अंकी प्रायोगिक नाटक रंगभूमीवर आलं आहे. प्रेक्षक आणि समीक्षक या दोन्हींकडून त्याचं कौतुक होतंय. कुणाल आलवे, पराग ओझा, सुशील जाधव या तीन विद्यार्थी दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेलं हे नाटक इतकं का चर्चेत आहे?
आपल्या नाटय-कलागुणांना वाव देण्यासाठी कॉलेज विद्यार्थ्यांनी नाटयकृती सादर करणं ही नवी गोष्ट नाही. विद्यार्थ्यांच्या कॉलेज अॅक्टिव्हिटीचाच तो महत्त्वाचा भाग असतो, असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यातून कॉलेजात नाटयमंडळ स्थापन केली जातात आणि आंतरमहाविद्यालयीन नाटयस्पर्धामध्ये एकांकिकाही सादर केल्या जातात. मामला हौशी असतो तरी विद्यार्थ्यांच्या नाटयऊर्जेला चालना देणारा असतो, पण घडतं असं की, बरेचदा ही नाटयऊर्जा आंतरमहाविद्यालयीन नाटयस्पर्धापुरतीच राहते. त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला जात नाही. या पार्श्वभूमीवर एम. एल. डहाणूकर कॉलेजने दोन अंकी नाटक रंगभूमीवर आणून एक वेगळीच रंगजाणीव दाखवून दिली आहे. ‘झोपाळा’ नावाचं हे प्रायोगिक म्हणजे व. पु. काळे आणि रत्नाकर मतकरी या मराठीतल्या दोन प्रथितयश लेखकांच्या त्याच नावाच्या दोन कथांचं नाटयरूप आहे. कुणाल आलवे, पराग ओझा, सुशील जाधव या तीन विद्यार्थी दिग्दर्शकांनी ते दिग्दर्शित केलंय. त्यांनीच त्याचं नाटयरूपांतरही केलं आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या नाटकाला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. आजवर झालेले या नाटकाचे सातही प्रयोग हाऊसफुल्ल गेलेत. समीक्षकांकडूनही नाटकाला चांगले गुण मिळतायत. ज्यांच्या कथेवर या नाटकाचा एक अंक आहे, त्या रत्नाकर मतकरींनी या तरुण रंगकर्मीचं कौतुक केलंय.
विद्यार्थी कॉलेजच्या व्यासपीठाचा वापर करून एक कलाकृती सादर करायचं ठरवतात, त्यासाठी मराठीतल्या दोन लोकप्रिय लेखकांच्या कथा निवड करतात, स्वत:च त्यांचं नाटयरूपांतर करतात आणि ते सादर करून एक आगळावेगळा प्रयोग यशस्वी करतात, ही गोष्ट केवळ दखल घेण्यापुरतीच मर्यादित नाही तर कौतुक करण्यासारखीच आहे. म्हणूनच या प्रयोगामागचं ‘नाटय’ जाणून घेण्याची उत्सुकता वाटणं स्वाभावीक आहे. त्यासाठी कुणाल, पराग, सुशील या लेखक-दिग्दर्शक त्रयीशी गप्पा मारणंही ओघानंच येतं.
मुळात ही कल्पना नेमकी कशी आणि कुणाला सुचली, हा पहिला प्रश्न मनात असतो. त्याचं उत्तर देताना कुणाल सांगतो, ‘साधारणपणे कॉलेज एकांकिका स्पर्धा जुलैपासून डिसेंबपर्यंत चालतात. त्यानंतर सहा महिने काही अॅक्टिव्हिटी नसते. त्यामुळे आमच्या कॉलेजच्या मुलांकडून असं सुरू होतं की, आपण या काळात काहीतरी करू या, वर्कशॉप तरी करू या. कारण उन्हाळ्याची सुट्टी असते, तेव्हा सगळेच जण काही गावी जात नसतात. मग आम्ही मुलांनाच सांगितलं की, तुम्हीच काहीतरी करा. तुमचे विषय डेव्हलप करा आणि आम्हाला दाखवा. मग या काळात मुलांनी काही एकांकिका बसवल्या. आम्ही त्या पाहिल्या तेव्हा आमच्या लक्षात आलं की, आपण ही अॅक्टिव्हिटी पुढे चालवू शकतो.
सेट्स वगैरे मुलांनीच केले होते. त्यामुळे हे सगळं चांगल्या लेव्हलला घेऊन जाणं शक्य होतं. त्यानंतर आम्ही आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपॉल पेठेमॅडमना भेटलो. त्यांच्याशी बोललो. त्या ‘ठीक आहे’ म्हणाल्या. पण काय करायचं, असा प्रश्न होता. खूप विषय डोक्यात होते. त्यात एक विषय होता ‘झोपाळा’ या कथेचा. वपु आणि मतकरींनी याच नावाने स्वतंत्र कथा लिहिल्या होत्या. त्या आम्ही निवडल्या आणि आम्हीच त्याचं नाटयरूपांतर केलं. तसंच दिग्दर्शनांची जबाबदारीही आम्ही तिघांनी घेतली. कारण आम्ही दोन-तीन वर्ष डहाणूकर कॉलेजसाठी एकत्र काम करतो आहोत. त्याआधी मागच्या वर्षी आम्ही ‘बंध नायलॉन’चे ही एकांकिका केली होती. अंबर हडपच्या ‘बीपी’शीही आम्ही जोडलेलो होतो. त्यानंतर आम्ही ‘बँक ऑफ द बँकरप्ट’ ही एकांकिका केली होती. आयएनटीसाठी आम्ही दोन-तीन र्वष एकत्रच काम करतोय. त्यामुळे या नाटकासाठीही तिघांनी एकत्र काम केलं.’
कुणाल-पराग-सुशील यांनी पहिल्याच नाटकांसाठी वपु आणि मतकरी यांच्या दोन कथांची केलेली निवड अनेकांना चकित करणारीच होती. मुळात दोन्ही लेखकांच्या लिखाणाची जातकुळी वेगळी. वपु हलकफुलकं लिहिणारे तर मतकरी गूढगंभीर लिहिणारे. त्यामुळे या दोन लेखकांच्या भिन्न जातकुळीतील कथांना नाटयरूपात गुफणं हीदेखील एक मोठी गोष्ट होती. दिग्दर्शक त्रयीपैकी सुशील त्याविषयी सांगतो, ‘विशिष्ट लेखकाच्या कथांवर नाटक करायचं असं काही ठरलं नव्हतं. आमचा ब-याच गोष्टींवर विचार करत होतो. ही गेल्या सुट्टीतील गोष्ट होती. कॉलेजच्या मुलांनी काही या काळात अॅक्टिव्हिटी केल्या होत्या. प्रथमेश परबने एकांकिकेसारखं एक प्रेझेंटेशन केलं होतं. त्यातून असं ठरलं की, आणखी काहीतरी करायला पाहिजे. आम्ही सुरुवातीला प्रायोगिक दीर्घाक करायचं ठरवलं. मग त्या दृष्टीने खूप विचार केला.
चर्चा करता करता चारेक कन्सेप्ट सुचल्या. त्यानंतर अशी कल्पना पुढे आली की, दोन अंकी नाटक करू या. तरीही नेमकं काय करायचं ते कळत नव्हतं. त्याच सुमारास वपुंची ‘झोपाळा’ हाती लागली. मग त्यावरही ब्रेनस्टॉर्मिग झालं. वपुंची ही कथा खूप चार्मिग आहे. वपुंचा हातखंडा तशी ती होती. ती आम्हाला आवडली त्याआधी गेल्या वर्षीही आम्ही वपुंची एक कथा परफॉर्म केली होती. त्याच वेळी लक्षात आलं की, मतकरींचीही ‘झोपाळा’ नावाची कथा आहे. मग ठरलं की, तीही वाचूया. ती गूढकथा असेल तर नक्कीच इंटरेस्टिंग असेल, असं आम्हाला वाटलं. मग तिघांच्याही डोक्यात आलं की, हा एक कॉमन थ्रेड आहे. एकाच नावाच्या कथा दोन वेगवेगळ्या लेखकांनी लिहिल्यात आणि त्याही दोन वेगवेगळ्या ज्यॉनरच्या. त्यामुळे त्यांच्यावर नाटक केलं तर दिग्दर्शक म्हणून आपल्याला दोन वेगवेगळे ज्यॉनर हाताळायला मिळतील. तसंच मुलांनाही दोन वेगवगेळ्या ज्यॉनरमध्ये काम करता येईल. दोन अंक केल्यास बेसिक स्ट्रक्चर कायम ठेवून आपल्याला दोन कथा करता येतील, असं आम्हाला वाटलं. असं सगळं सुचत गेलं. तसंच वपु आणि मतकरी या दोन्ही लेखकांचा मोठा वाचकवर्ग आहे. त्यांच्या कथांवर नाटक केल्यास तो नक्की बघायला येतील, हाही विचार त्यामागे होताच. या सगळ्यामुळे आम्ही या दोन कथांची निवड करून त्यांना नाटयरूप दिलं.’
या दोन कथा नाटकातही स्वतंत्रपणे सादर होतात. पहिल्या अंकात वपुंची कथा सादर होते. ती ५५ मिनिटांची आहे, तर दुस-या अंकात सादर होणारी मतकरींची कथा ३५ मिनिटांची आहे. या कथा स्वतंत्रपणे सादर होत असल्याने दोन ज्यॉनरचं मिश्रण होत नाही. मात्र झोपाळा ही सामायिक गोष्ट दोन्ही नाटकांच्या केंद्रस्थानी आहे.
या वेगवेगळ्या धाटणीच्या कथांचं सादरीकरण करणं हे आव्हानात्मक होतं. ते आव्हान कसं पेललं, हे सांगताना या नाटकाचा तिसरा दिग्दर्शक परागने सांगितलं, ‘एक तर आम्ही अशा दोन लेखकांनी लिहिलेल्या कथांची निवड केली होती की, ज्यांचा मराठीत कट्टर वाचकवर्ग आहे. त्यामुळे खूप मोठी जबाबदारी आमच्यावर होती. नाटक करताना या कथांच्या आशयाशी प्रामाणिक राहणं अत्यावश्यक होतं. कथांना नाटयरूप देताना आम्हाला प्रसंग घडवणं गरजेचं होतं, परंतु ते कथेशी फटकून घडवणं चालणार नव्हतं, तर त्याला कथेचा संदर्भ असणं आवश्यक होतं. तिच्या बाहेर जाऊन किंवा आमच्या पदरचं काही टाकून ते करता येणार नव्हतं. वपुंच्या कथेत जसवंतीच्या कथा सुरू झाल्यावर अनेक प्रसंग आहेत. ते आम्ही कथेचा तपशील बिलकूल न बदलता सादर केलेत. सगळ्यात मोठं आव्हान हे होतं की, दोन वेगवेगळ्या ज्यॉनरवर आम्हाला काम करायचं होतं. आम्ही पूर्वी वपुंची एक कथा केली होती, परंतु मतकरींचा ज्यॉनर कधीच हाताळला नव्हता. जेव्हा आम्ही यावर काम सुरू केलं तेव्हा लोकांनी आम्हाला परावृत्तही केलं. प्रेक्षक दुसरा अंक स्वीकारणार नाहीत. कारण त्यांनी पहिल्या अंकात एक ज्यॉनर पाहिलेला असतो आणि त्यातच त्यांना पुढे काय होणार याची उत्सुकता असते, वगैरे. तरीही आम्ही हे केलं. कारण साधंच नाटक करायचं तर त्यात मजा काय? आम्हाला ठाऊक होतं की, आम्ही जर चांगलं सादरीकरण केलं तर वपु आणि मतकरींचा वाचकवर्ग आम्हाला मिळेल. आम्ही यात यशस्वी झालो. नाटक बघायला वपुंचा मुलगा आणि कन्या आल्या होत्या. वपु आज असते, तर खूप बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मतकरींचीही अशीच प्रतिक्रिया होती. तुम्ही फार काही न करता विषयाशी प्रामाणिक राहून सादरीकरण केलंत, असं ते म्हणाले.’
विशेष म्हणजे कुणाल-पराग-सुशील या तिघांची कामाची शैली वेगळे आहेत. सुशील अभिनेता आहे आणि त्याला लेखनाचीही आवड आहे. कुणाल डबिंग आर्टिस्ट आणि कलाकारीत रस असणारा आहे. पराग हा व्यावसायिक लेखक आहे. त्याने काही कार्टून सीरिज लिहिल्यात. तो ‘यलो’ चित्रपटाच्या रिसर्च टीममध्येही होता. दिग्दर्शन करताना या तिघांत ताळमेळ कसा होता, याचं उत्तर त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, लिखाणात काही कमी पडलं तर पराग बघत असे. म्हणजे एखादा सीन कथेचा आशय घेऊन कथेच्या बाहेर जाऊ न कसा लिहायचा ते पराग करत असे. हा सीन अगदीच कथाबाह्य झालाय नाही ना, हे सुशील बघत असे. कारण त्याची टेक्स्टवर खूप श्रद्धा आहे. कुणाल डिझायनिंगच्या बाबतीत स्ट्राँग आहे. तो डिझायनिंग आणि क्राफ्टिंग करतो. यानंतर जे तयार होतं त्याच्या पॉलिशिंगमध्ये तिघांची भूमिका असते.
या ताळमेळातूनच ‘झोपाळा’ तयार झालंय. या झोपाळ्यावर स्वार होऊन हे कुणाल-पराग-सुशील नाटयक्षेत्रात यशाचे हिंदोळे घ्यायला तयार झालेत.