तारापूर औद्योगिक वसाहतीत असणा-या कंपन्यांतून निघणा-या सांडपाण्यासाठी २५ एमएलडीची परवानगी आहे. पण प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त एमएलडी रासायनिक पाणी सोडले जाते.
बोईसर – तारापूर औद्योगिक वसाहतीत असणा-या कंपन्यांतून निघणा-या सांडपाण्यासाठी २५ एमएलडीची परवानगी आहे. पण प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त एमएलडी रासायनिक पाणी सोडले जाते. त्यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कॉमन एफ्ल्यूऐन्ट ट्रीटमेंट प्लॉन्ट (सी़ईटीपी) हा प्रकल्प केवळ नावापुरताच राहिला आहे. या प्रकल्पाची क्षमता फक्त २५ एमएलडी असून कारखान्यांतून सोडण्यात येणारे प्रदूषित सांडपाणी मर्यादेपेक्षा जास्त असते.
त्यामुळे प्रदूषित सांडपाणी औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यावर, खड्डे व मोकळ्या जागेवर तुंबलेले दिसत़े तर काही नाल्यावाटे खाडीत व समुद्रात जात़े त्यामुळे या भागातील प्रदूषण वाढलेले आह़े या ठिकाणी होणा-या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला लेखी व तोंडी तक्रारीही वारंवार करण्यात आल्या आहेत.
कारखान्यात वापरण्यात येणा-या पाण्याचे मोजमाप हे एमआयडीसीकडून घेतलेल्या पाण्याद्वारे केल्या जात़े परंतु प्रदूषित झालेल्या सांडपाण्याचे योग्य मोजमाप होत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर येथील उपप्रादेशिक अधिकारी व त्यांचे कर्मचारी सहकारी येथील औद्योगिक क्षेत्रात पाहणीसाठी फिरतात. मात्र, केवळ नोटीस बजावून हे प्रकार रोखता येणे शक्य नसल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.
मात्र अलीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी डी़ बी़ पाटील यांनी सीईटीपी प्रकल्पाला सांडपाणी प्रक्रिया व नियोजन करण्यास सक्षम नसल्याने त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. मात्र, या प्रकरणात उपप्रादेशिक अधिका-यांनी पोलिसांकडे तक्रार न करता थेट न्यायालयात धाव घेतल्याने संबंधितांवर योग्य कारवाई झाली नसल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
कारखान्यांतून प्रदूषित सांडपाणी ‘सीईटीपी’ प्रक्रिया केंद्रात सोडून त्यावर प्रक्रिया केली जाते. ते पाणी एमआयडीसीमधील सम १, सम २ व सम ३ मध्ये सोडावे असा क्रम आह़े ‘सीईटीपी’ प्रकल्पातून पाणी सोडताना त्याची ‘पीएचव्हॅल्य’ किती असत़े याची दखल घेणेही गरजेचे असते. प्रकल्पातून थेट सममध्ये सोडण्यात येणा-या पाण्यात मोठय़ा प्रमाणात रासायनिक पदार्थ असल्याचे अलीकडच्या काळात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रासायनिक पाण्यातून येणाऱ्या ‘स्लच’ने टाक्या अध्र्याअधिक भरलेल्या आढळतात. परिणामी प्रदूषित सांडपाणी त्यावरून वाहून जाते.
पूर्वी सममधील टाकीतून गाळ काढण्याचे टेंडर निघत होत़े परंत अलीकडच्या काळात ते काम बंद झाले आहे. या भागात मोठमोठया कापडनिर्मिती व रंगप्रक्रियेचे कारखाने उभारण्यात आले आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेले सीईटीपी प्रकल्प कमी पडत आहेत. त्यामुळेच जास्त क्षमतेचे प्रकल्प आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
तारापूर औद्योगिक वसाहतीत २० ते २५ एमएलडी रासायनिक पाणी निर्माण होत असून नव्याने सार्वजनिक सांडपाणी केंद्र उभारणे गरजचे आहे.
– डी. बी. पाटील, उपप्रादेशिक अधिकारी, तारापूर
तारापूर औद्योगिक वसाहतीत २५ एमएलडी सांडपाणी निघण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी आहे. मात्र, ३० एमएलडी पाणी निघत असल्याचे स्पष्ट होत असल्याने ते बंद होणे गरजेचे आहे. त्यामुळे नव्याने सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याची गरज नाही.
– मनीष संखे, पदाधिकारी, पर्यावरण दक्षता मंच