प्राचीन काळापासून मानवाचे फक्त दोनच प्राथमिक व्यवसाय अस्तित्वात होते. पहिला म्हणजे शेती आणि दुसरा खनिकर्म किंवा खाणकाम. मानवाच्या या दोन महत्त्वपूर्ण क्रिया अनादी काळापासून सुरू आहेत, ज्या आजही थांबलेल्या नाहीत. आधुनिक काळात तर त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. मानवानं प्रागैतेहासिक काळात दगडानं एखादं फळ तोडण्याचा वा पाडण्याचा प्रयत्न केला असावा किंवा एखाद्या टोकदार दगडानं त्यानं खायची वस्तू सोलली असेल, त्या वेळी खाणकामाचा शोध लागला असावा. प्राण्यांची हत्या, फांदी तोडणं यासारख्या कामासाठी खनिजाचा वापर सुरू केल्यानंतर हळूहळू त्याच्या खाणकामास वेग आला.
खाणकाम हे मानवाच्या अस्तित्वाशीच जोडलं गेलेलं आहे. या क्रियेतूनच त्याची उत्तरोत्तर प्रगती होत गेलेली आहे व साऱ्या विश्वावर आपलं अधिराज्य प्रस्थापित करण्याची ताकद त्याच्या मनगटात आलेली आहे. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पेही त्याच्या खनिज वापराशी निगडित आहेत. पाषाण युग ४००० इ.स.पूर्वीचा कालखंड, कास्य युग ४००० ते ५००० इ.स.पू., लोह युग १५०० ते १७८० इ.स.पू., स्टील युग १७८० ते १९४५ इ.स.पू. आणि अणु युग १९४५ ते आजपर्यंत, याप्रमाणे मानवाच्या खनिज वापराचे कालखंड अधोरेखित करण्यात आले आहेत. मानवाच्या वैश्विक इतिहासात मानदंड ठरलेल्या अनेक घटना खनिजांशी अगदी अतूटपणे निगडित आहेत. मार्को पोलोची चीन यात्रा, वास्को-दी-गामाच्या आफ्रिका व भारताच्या साहसी सफरी, कोलंबसानं लावलेला अमेरिकेचा शोध, कॅलिफोर्निया, अलास्का, दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियातील ‘गोल्ड रश’ या सा-या महत्त्वाच्या घटना कोणत्या ना कोणत्या खनिजाशी जोडल्या गेलेल्या आहेत.
आज जागतिक संस्कृतीचा संपूर्ण डोलारा खनिजांच्या उपलब्धतेवर उभा राहिलेला आहे. ‘वैश्विक खेडं’ हे पृथ्वीचं जे स्वरूप तयार झालेलं आहे, त्याचं सारं श्रेय खनिजसंपन्नतेला जातं. भौतिक अंतर मिटवणारे घटक (गाडया, रेल्वे, विमान), काल्पनिक अंतर मिटवणारे घटक (टेलिफोन, टीव्ही, संगणक) आणि ऊर्जा निर्माण करणा-या यंत्रणा (अणुभट्टी, कोळसा भट्टी) या सगळ्यांमध्ये वेळोवेळी खनिजांचा वापर होतो. इतरही अनेक ठिकाणी खनिजांचा वापर होतो, त्यामुळे खाणकामाची खरी निकड ही आधीच्या काळापेक्षा आजच्या काळात अधिक आहे.
प्राथमिक अवस्थेतील खाणकाम साधारणत: चार लाख पन्नास वर्षापूर्वी सुरू झालं, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. त्यांना उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील मानवाच्या सांगाडयाजवळ टोकदार असं फ्लिंट खनिजाचं हत्यार आढळलं आहे. फ्लिंट हा एक प्रकारचा खनिज दगड आहे, जो आदिमानव आपल्या अनेक प्रकारच्या कामांसाठी वापरत असे. पाषाणयुगाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आदिमानवानं भूमिगत खाणकामाचं कसब आत्मसात केलं होतं. भारतासह जगातील अनेक ठिकाणी या कालखंडातील भूमिगत खाणींचे अवशेष सापडलेले आहेत. अशा प्रकारची सर्वात जुनी भूमिगत खाण स्वाझीलँड (दक्षिण आफ्रिका खंडातील एक मागासलेला देश) येथील बोमवू पर्वतात सापडली आहे. ही खाण सुमारे चाळीस हजार वर्षापूर्वीची असून येथून हेमटाइट खनिजाचा उपसा केला जात होता. ही खाण ३० फूट खोल आहे. त्यानंतर कालांतरानं मात्र खाणीची खोली वाढत गेलेली आढळते. सर्वात खोल म्हणजे सुमारे ८०० फूट खोल असलेली खाण इजिप्त देशात आढळली (हे विवेचन पाषाण युगातील खाणीबद्दलचं आहे.)
आदिमानवाला धातूचंही आकर्षण होतं. कठीण, अणकुचीदार व चकाकणारे हे धातू सहजपणे कोणाचंही लक्ष वेधून घेतात. हे सारे घटक विशुद्ध स्वरूपातील होते, पण नंतर अवतरलेल्या ताम्र व लोह युगातील तांत्रिक प्रगतीमुळे धातू वितळण्याची आणि कच्च्या धातूंपासूनही शुद्ध स्वरूपातील धातू वेगळे करण्याची कलाही त्यांनी अवगत केली. या सा-या उत्क्रांतीच्या प्रवासामध्ये त्या काळच्या खाणकामगारांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला होता. पहिलं आव्हान म्हणजे कच्च्या धातूला आजूबाजूच्या खडकांतून वेगळं करणं. टोकदार खडक व काठयांच्या मदतीनं ते हे काम करण्याचा प्रयत्न करत असत. पण ब-याचदा त्यांच्या पदरी अपयश येई. त्यानंतर त्यांपैकीच कुणाला तरी एक अफलातून कल्पना सुचली. कच्च्या धातूला खडकापासून वेगळं करण्यासाठी त्यानं खडकाला येनकेन प्रकारे गरम केलं आणि गरम केल्यानंतर लागलीच त्यावर थंड पाणी ओतलं. गरम केल्यामुळे खडक प्रसरण पावतो व थंड पाणी टाकल्यानंतर तो आकुंचित होतो, त्यामुळे तो खडक सहजपणे फुटतो. खडक फोडण्याची ही क्लृप्ती इतकी क्रांतिकारी आहे, की त्याची तुलना थेट आल्फ्रेड नोबेल यांनी १८६७ साली लावलेल्या डायनामाइटच्या शोधाशीच करता येईल.
आदिमानव खनिज व धातूचा उपयोग आपल्या प्राथमिक गरज भागवण्यासाठी वा आपल्या शरीरावर, निवासाच्या ठिकाणी रंगसंगती करण्यासाठी करत असे. पण औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाल्यापासून मात्र खनिज व धातूचा अनिर्बंध वापर सुरूच आहे. मशिन व जड अवजारांच्या मदतीने करण्यात येणारं खाणकाम सा-या भूपृष्ठाचा चेहरामोहरा अद्भुतरीत्या बदलवत आहे.
अर्थशास्त्रात रत्न पारखण्याचे तसेच कोषागारात जतन करण्याचे नियम सांगण्यात आले आहेत. तसेच खनिकर्म कसं करावं, कोणती काळजी घ्यावी, सोने-चांदीची नाणी कशी बनवावीत याचं सविस्तर विवेचनही या ग्रंथात आहे. भारतात अनादी काळापासून खनिकर्म पार पाडलं जात आहे, पण त्याचं शास्त्रीय टिपण त्या काळातील कोणत्याही व्यक्तीनं केलेलं नाही. आपल्या देशाला फारच समृद्ध असा मौखिक माहितीचा वारसा आहे. पण मौखिक माहितीच्या सत्यतेत अनेक त्रुटी असू शकतात. रत्नांसाठी राजस्थान फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशातील पन्ना हे हिरव्या मण्यां (एमरल्ड)साठी, कटनी लाइमस्टोन व छोटानागपूर पठारावरील झाल्वा ही ठिकाणं लोहकामासाठी प्रसिद्ध आहेत. अनेक खाणींतून मिळवलेले हिरे, माणकं, पाचू व मणी त्यांच्या शुद्ध स्वरूपात अगदीच फिके दिसतात. त्यांना उजळवण्यासाठी त्यांच्यावर बरीच प्रक्रिया करावी लागते. या कार्यात प्रावीण्य असणारे कारागीर आज मुंबई व सुरतसारख्या ठिकाणी एकवटलेले आहेत, ज्यांच्या कलेतून करोडो रुपयांची कमाई आपल्या देशाला होत असते.
प्राचीन भारतात धातूंचा फार मोठया प्रमाणात उपसा होत असे. आज ज्या-ज्या ठिकाणी खनिकर्माचे उपक्रम सुरू आहेत त्या-त्या ठिकाणी जुन्या खाणींचे अवशेष सापडलेले आहेत. खरं तर अशा जुन्या खाणींचा शोध घेऊन तिथं मोठमोठे खाणप्रकल्प हाती घेतले जात आहेत. राजस्थानातील खेत्री रामपूर, अगूचा, राजपूर, दरिबासारख्या ठिकाणी तांब्याच्या खाणी कार्यरत होत्या. प्राचीन काळात तर राजस्थानातील झवर या ठिकाणी फार मोठया प्रमाणावर धातूंना वितळवण्याचा प्रकल्प कार्यरत होता.
जाँ बॅप्टीस्ट तॅवेर्निए हा फ्रेंच जवाहीर भारतात आला होता. १६६५ ते १६६९ पर्यंत त्याने इथल्या कित्येक ठिकाणांना भेटी दिल्या. त्याच्या प्रवासवर्णनात त्यानं कृष्णा नदीकाठी हिरे शोधणा-या कार्यपद्धतीचं वर्णन केलं आहे. त्याला तिथं चार मीटर खोल खणलेल्या खाणी सापडल्या. त्याच्याच भेटीदरम्यान ६७ कॅरेटचा ‘होप’ नावाचा हिरा व ७८ पूर्णाक पाच कॅरेटचा ‘कोहिनूर हिरा’ सापडल्याच्या नोंदी आहेत. हे दोन्ही हिरेगुंटूर जिल्ह्यातील कोल्लूर या भागातून वाहणा-या कृष्णा नदीकाठी सापडले होते. ऐन-ए-अकबरीमध्ये ‘वायरागड’नावाच्या हि-याचा उल्लेख सापडतो.
सोन्याचे साठे बहुतकरून धारवाड भूभागात आढळतात. पण त्यांचं अस्तित्व उत्तर प्रदेशातील महाकोशल, महाराष्ट्रातील साकोली, झारखंडमधील सिंगभूम व राजस्थानातील बनसवाडा पट्टय़ांत आढळतं. कथील धातूचे साठे छत्तीसगडच्या बस्तर व हरयाणाच्या भिवानी तालुक्यात आढळतात. तर शिसं, जस्त आणि चांदीचं विपुल भांडार राजस्थानात आढळतं. १४०० ते १८०० इ.स.पू. मध्ये मोचिया माग्रा, बल्लारिया या उदयपूरजवळच्या ठिकाणी या तीन खनिजांचा फार मोठया प्रमाणावर उपसा सुरू होता. युद्धात कामी येणा-या या खनिजांच्या जोरावरच महाराणा प्रताप यांनी अकबर बादशहाच्या मनसुब्यांवर दीर्घकाळ पाणी फेरलं होतं. याच काळात अजमेरजवळील तारागड येथे शिसं या धातूची खाण पाच हजार रुपयांच्या वार्षिक भाडेपट्टीवर मराठे सरदार चालवत होते.