सुमित्रा महाजन यांच्या निर्णयाविरोधात काँग्रेस खासदारांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसदभवन परिसरात जोरदार धरणे आंदोलन केले.
नवी दिल्ली- लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कॉँग्रेसच्या २५ खासदारांचे केलेले निलंबन हा लोकशाहीचा खून आहे, अशी कडक टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी केली.
या निलंबनाच्या विरोधात काँग्रेससह तृणमूल कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला तर डावे, सपा व राजदने सभात्याग करून निषेध नोंदवला.
कॉँग्रेसने आपल्या २५ खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ मंगळवारी जोरदार आंदोलन सुरू केले. संसदेच्या आवारात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राज्यसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी संरक्षणमंत्री ए. के. अॅण्टनी यांच्यासह पक्षाचे नेते सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेसच्या खासदारांनी काळ्या फिती लावून निलंबनाचा निषेध केला.
या निलंबनाच्या निषेधार्थ कॉँग्रेसने राज्यसभेत सकाळपासूनच गदारोळ सुरू केला. काँग्रेसच्या खासदारांनी राज्यसभेत सभापतींच्या समोरील वेलमध्ये जाऊन सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात निषेध नोंदवला. हा गदारोळ थांबत नसल्याचे पाहून राज्यसभेचे कामकाज दुपारी तहकूब करण्यात आले. त्यानंतर काँग्रेसच्या भूसंपादनाबाबतच्या संसदीय समितीतील बैठकीवर खासदारांनी बहिष्कार घातला. तसेच येते पाच दिवस कामकाजावर बहिष्कार घालण्याचे काँग्रेसने ठरवले आहे.
लोकसभेचे सत्र सुरू झाल्यानंतर सपा, डावे, राजदने बहिष्काराबाबतचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तो फेटाळून लावला.
२५ खासदारांचे निलंबन आज रद्द होण्याची शक्यता
काँग्रेसच्या २५ खासदारांचे निलंबन बुधवारी मागे घेण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन या आज विरोधी पक्षांची बैठक घेण्याची शक्यता आहे. त्यात निलंबन मागे घेतल्याचा निर्णय घेण्यात येईल, असे वरिष्ठ सरकारी सूत्रांनी सांगितले.