मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीस अरुंद असल्यामुळे या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्ग प्रशासनाने महामार्ग चौपदरीकरणाऐवजी महामार्गावर रंब्लिंग गतिरोधक लावण्याचा सपाटा लावला आहे.
महाड- मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीस अरुंद असल्यामुळे या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्ग प्रशासनाने महामार्ग चौपदरीकरणाऐवजी महामार्गावर रंब्लिंग गतिरोधक लावण्याचा सपाटा लावला आहे. एक किलोमीटर अंतरावर दहा रंब्लिंग गतिरोधक तर महाड शहराजवळील भागात आठ ते दहा गतिरोधक लावण्यात आले आहेत. यामुळे या रंब्लिंग गतिरोधकांमुळे वाहन चालवणे वाहनचालकांना जीवघेणे ठरत आहे.
मुंबई-गोवा महामार्ग हा सर्वात जुना ब्रिटिशकालीन महामार्ग आहे. राज्यात अनेक महामार्ग नव्याने बांधण्यात आले. त्यांचे चौपदरीकरण नव्हे तर सहा पदरीकरण झाले, पण मुंबई आणि गोव्याला कोकणातून जोडणा-या या महामार्गाचे चौपदरीकरण स्वातंत्र्यानंतर आजही झालेले नाही. पनवेल ते कोलाड यादरम्यान महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. पण उर्वरित महामार्गाचे काम धीम्या गतीने करण्यात येत आहे. कोकणाला जोडणारा हा एकमेव मार्ग असून तो अपघाताचे केंद्र बनल्यामुळे गेली दोन तीन वष्रे कोकणातील प्रवासी कोकणात जाण्यासाठी पर्याय म्हणून पुणे आणि कोल्हापूर मार्गाचा वापर करीत आहेत. यामुळे या मार्गाची ओळख खराब आणि अरुंद महामार्गाच्या पुढे जाऊन महामार्गावर रंब्लिंग गतिरोधकाचा मार्ग अशी होत आहे. पनवेल ते इंदापूरदरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम होत असताना येथील रस्ता खराब झाला आहे. तर इंदापूर ते कशेडी घाट हा रस्ता अरुंद असला तरी चांगला आहे.
गेल्या महिन्याभरापासून या चांगल्या रस्त्यावर रंब्लिंग गतिरोधकाचे काम सुरू आहे. लाखपले गावादरम्यान केवळ एक किलोमीटर अंतरावर दहा रंब्लिंग गतिरोधक, तर महाड शहराजवळील भागात आठ ते दहा गतिरोधक लावण्यात आले आहेत. अपघात होऊ नयेत म्हणून हे गतिरोधक लावण्यात आले होते, मात्र आता या गतिरोधकांमुळेच अपघात होत आहेत.
महामार्गावर किती अंतरावर गतिरोधक असावेत याबाबत नियमावली आहे. महामार्गावर गतिरोधक लावण्यासाठी जिल्हाधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी आणि त्यांच्या कमिटीच्या निर्णयाप्रमाणे हे गतिरोधक लावले जातात. मुंबई-गोवा महामार्गावर ग्रामस्थांच्या मागणीनुसार हे गितिरोधक टाकले जात आहेत. यामुळे हा महामार्ग आहे का, गावातील मार्ग याबाबत साशंकता निर्माण होत आहे. किलोमीटर अंतरात दहा-दहा गतिरोधक लावले गेल्यामुळे आता हे गतिरोधक प्रवाशांची सुरक्षा म्हणून लावले जात आहे की ठेकेदारांच्या भरभराटीसाठी? याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.