शहरातील ६२ टक्के महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई – शहरातील ६२ टक्के महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेचे आरोग्य विभाग आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रिसर्च रिप्रॉडक्टिव्ह हेल्थच्या (एनआयआरआरएच) सर्वेक्षणातून हे उघड झाले आहे.
३ महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. योग्य ती काळजी न घेतल्यास कर्करोगाचा धोका कायम आहे, असे सांगण्यात आले.
देशात दरवर्षी १ लाख ३२ हजार महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाची लागण होते. त्यांपैकी ७२ हजार महिलांना प्राणही गमवावे लागते. गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत समाजात जनजागृती नाही. कित्येकदा महिलांना या आजाराची लागण झालेलीच कळत नाही. गर्भाशयाचा, गर्भाशय मुखाचा आणि अंडकोशाचा कर्करोग असे गर्भाशयाच्या कर्करोगाचे तीन प्रकार आहेत.
प्रमाणापेक्षा वजन वाढणे, मधुमेह, मूल न होणे, धुम्रपान आणि अति मद्यसेवनामुळे गर्भाशयाचा कर्करोग होतो. तर पीएचव्ही विषाणू, जास्त मुले होणे आणि वेगवेगळया पुरुषांसोबत शारीरिकसंबध ठेवणे आदींमुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग होतो. अंडाशयाच्या कर्करोगाच्या तपासण्या अवघड असतात. कित्येकदा त्यात लक्षणे आढळत नाहीत.
मुंबई महापालिकेचे आरोग्य विभाग आणि ‘एनआयआरआरएच’च्या वतीने विक्रोळी येथील टागोर नगरमधील प्रसूतिगृहात २०११ ते २०१३ या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणाकरता ७५८ महिलांची ‘पॅप्समेर’ तपासणी करण्यात आली. त्यानुसार ६२ टक्के महिलांना भविष्यात कर्करोगाची लागण होण्याची दाट शक्यता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
देशात लैंगिक स्वच्छतेवर अधिक भर दिला जात नाहीत. लैंगिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास आणि संसर्ग झाल्यास संबंधित महिलांमध्ये पीएचव्ही विषाणू पसरतात. अशा महिलांना कर्करोग होण्याची दाट शक्यता असते.
सर्वेक्षणानुसार, ३६ टक्के महिलांना गर्भाशयाचा कर्करोग झालेला नाही. तर ०.४ टक्के महिलांना याची प्राथमिक लागण झाल्याचे दिसून आले. या महिलांवर उपचार सुरू असल्याचे महापालिकेचे उप कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले. या सर्वेक्षणाकरता पाच प्रसूतिगृहांची निवड करण्यात आली होती.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या म्हणण्यानुसार, देहविक्रय करणा-या २१ वर्षावरील महिलांनी प्रत्येक तीन वर्षानी तपासणी करून घेणे गरजेचे आहे. महिलांच्या गुप्तांगातून वारंवार रक्तस्त्राव होणे, मासिक पाळी बंद होणे आदी बदल दिसून आल्यास त्यांनी तत्काळ स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे डॉ. उद्धव राज यांनी सांगितले. दरम्यान, शहरातील पाच ठिकाणी त्यासाठी तपासणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असे डॉ. केसकर यांनी सांगितले.