गिरणी कामगारांच्या दुस-या टप्प्यातील घरांची किंमत कमी करण्यासाठी म्हाडाला जेएनएनआरयुएमसारख्या निधीची प्रतीक्षा आहे.
मुंबई – गिरणी कामगारांच्या दुस-या टप्प्यातील घरांची किंमत कमी करण्यासाठी म्हाडाला जेएनएनआरयुएमसारख्या निधीची प्रतीक्षा आहे. पहिल्या टप्प्यातील घरांची किंमत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुननिर्माण योजनेचा (जेएनएनआरयुएम) निधी मिळाल्याने म्हाडाला घरांची किंमत कमी करता आली होती. पण योजनेचा निधी २०१५पर्यंतच असल्याने दुस-या टप्प्यातील घरांसाठी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे घरांच्या किमती कमी कशा करता येतील, हा विचार म्हाडातर्फे केला जातो आहे.
दोन वर्षापूर्वी म्हाडाने गिरणी कामगारांसाठी ६ हजार ९२५ घरांची सोडत काढली. या वेळी घरांची किंमत १२ लाख रुपये ठरली होती. पण गिरणी कामगारांना ही रक्कम परवडणारी नसल्याने जेएनएनआरयुएम या योजनेतून म्हाडाला मिळणा-या निधीची मदत घेण्यात आली. या निधीमुळे घरांची किंमत कमी करून साडेसात लाख रुपये आकारण्यात आली. आता सहा गिरण्यांच्या जमिनीवर दुस-या टप्प्यातील घरे म्हाडा बांधते आहे. सध्या या घरांचे बांधकाम सुरू असून नव्या वर्षात या घरांची सोडत काढण्याचे नियोजन म्हाडाचे आहे.
या घरांची किंमत म्हाडाने २२ लाख रुपये ठरवली आहे. ही किंमत कामगारांना परवडणारी नाही. त्यामुळे किंमत कमी करण्यासाठी जेएनएनआरयुएमचा निधी पुढील वर्षी मिळणार नसल्याने केंद्र सरकारचा अजून कोणत्या निधीचा नियमानुसार मदत घेता येऊ शकते का, हा विचार केला जात असल्याचे एका अधिका-याने सांगितले. दरम्यान, दुस-या टप्प्यातील घरांची किंमत म्हाडाने काढली असली तरी ती अंतिम झालेली नसून, ती कमी करण्यासाठी म्हाडाचा प्रयत्न राहणार असल्याचेही सांगण्यात आले.