गुहागर तालुक्यात गेल्या शेकडो वर्षापासून शिमगोत्सवामध्ये गावातील नमन मंडळी संकासूर – राधाच्या नमनांनी सात आठ दिवस तालुकाभर फिरून लोककलेचे दर्शन घडवताना दिसतात.
गुहागर- गुहागर तालुक्यात गेल्या शेकडो वर्षापासून शिमगोत्सवामध्ये गावातील नमन मंडळी संकासूर – राधाच्या नमनांनी सात आठ दिवस तालुकाभर फिरून लोककलेचे दर्शन घडवताना दिसतात.
कोकणातील गुहागर तालुक्यातील नमनाची ही लोककला पाहणा-या प्रत्येकाला आपलसं करताना दिसते. त्यामुळे लोककला पाहणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गावापासून मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी सादर होणा-या कार्यक्रमांमधून ही लोककला खास प्रेक्षकांच्या आग्रहाखातर सादर केली जाते.
परंतु गेल्या काही वर्षापासून ही लोककला जतन करणा-या या नमन मंडळांना व त्यातील कलाकारांना अद्यापही शासनाकडून कोणताही ‘राजाश्रय’ मिळू शकलेला नाही. त्यामुळे आजही ही नमन मंडळे व ही कला सादर करणारे कलाकार आपल्या हक्काच्या शासकीय मानधनापासून वंचित राहिले आहेत.
कोकणात अनेक पारंपरिक लोककला आहेत. त्यामध्ये तळकोकणातील दशावतार या लोककलेला राजाश्रय मिळाल्यामुळे आज दशावतार ही लोककला वेगाने संपूर्ण जगात पोहोचलेली दिसते. दशावताराप्रमाणेच गुहागर तालुक्यातील संकासूर – राधाच्या नमनाची लोककला प्रेक्षकांना भावणारी आहे.
दरवर्षी शिमगोत्सवातील या लोककलेला धार्मिक संस्कृतीचीही पवित्र जोड आहे. होळीच्या दुस-या दिवशी नमन परंपरा जपणारी गावातील मंडळी आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर नमनाचा पोशाख चढवून देवासमोर गा-हाणे घालून आरती म्हणतात. त्यानंतर नमनातील गाणे म्हणून ग्रामदेवतेच्या होळीचा होमासाठी लागणा-या साहित्यासाठी दक्षिणा जमवण्यासाठी ही मंडळी नमन घेऊन गावाबाहेर पडतात.
सुमारे सात-आठ दिवस विविध गावांतून संकासूर – राधेचे नृत्य करून मिळणारी दक्षिणा जमा केली जाते. त्यानंतर वस्तीच्या ठिकाणी जमा झालेल्या गावकरी मंडळींसमोर सुमारे दोन-तीन तासांचे वगनाटय करण्याची परंपरा दिसून येते.
तालुक्यातील अनेक गावांमधून ही लोककला आजही जपली गेली आहे. या शिमगोत्सवासाठी गावातील मंडळींबरोबर चाकरमानीही खास सुट्टी काढून गावात दाखल होतात. शिमगोत्सवापासून गुडीपाडव्यापर्यंत विविध ठिकाणाहून आलेल्या निमंत्रणानुसार नमन व वगनाटय सादर केले जाते.
गुडीपाडव्यानंतर ही लोककला संपुष्टात आणून आपल्या नमनाचे सर्व साहित्य पुढील वर्षभरासाठी पुन्हा जतन करून ठेवले जाते.
नमन मंडळातून अनेक कलाकार शिमगोत्सव काळात आपले संपूर्ण योगदान लोककलेसाठी अर्पण करताना दिसतात. यामागे पूर्वजांपासून चालत आलेली लोकसंस्कृती व परंपरा जपणे हे त्यांचे प्रमुख ध्येय व उद्दिष्ट असते. त्यामुळे आजवर दुर्लक्षित राहिलेल्या लोककलेला राज्य शासनाचा राजाश्रय मिळाल्यास प्रत्येक नमन मंडळाला व कलाकारांना काहीना काही मानधन मिळू शकेल.
सध्या राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोककला जपणा-या मंडळाला व त्यामधील कलाकारांची श्रेणी निश्चित करून त्यांना त्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहासाठी मंडळाला किमान २५ हजारांपासून पुढे मानधन देण्यात येते. त्यामुळे अनेक मंडळे व कलाकारांना आपली लोककला सादर करण्यास प्रोत्साहन मिळून ती लोकसंस्कृती जिवंत राहण्यास मदत होते.
मात्र गुहागर तालुक्यातील संकासूर – राधाच्या नमनाच्या प्रसिद्ध लोककलेला अद्याप राजाश्रय मिळू शकलेला नाही. त्यामुळे ही लोकसंस्कृती जपण्यासाठी काम करणारी मंडळे व त्यातील कलाकार वाढीस लागण्यापेक्षा कमी झाले. तरी या लोककलेला राजाश्रय मिळून देण्यासाठी प्रयत्न झाल्यास सर्वाना भावणारी संकासूर-राधाच्या नमनाची ही लोककला सर्वदूर पोहोचण्यास प्रोत्साहनच मिळणार आहे.