महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणा-या फेब्रवारी-मार्चमधील दहावीच्या लेखी परीक्षा मंगळवार, ३ मार्चपासून सुरू होणार आहेत.
मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणा-या फेब्रवारी-मार्चमधील दहावीच्या लेखी परीक्षा मंगळवार, ३ मार्चपासून सुरू होणार आहेत. तर सोमवार, २ फेब्रुवारीपासून केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा देशासह विदेशातील परीक्षा केंद्रांत सुरू होतील.
शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षेची तयारी मागील आठवडयातच पूर्ण झाली आहे. यंदा या परीक्षेला सुमारे १८ लाखांच्या आसपास विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे. मागील वर्षी हॉल तिकिटांसाठी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर यंदा यात अनेक सुधारणा मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.
राज्यभरातील शाळांना या वेळी हॉलतिकीट ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. सीबीएसईच्या दहावी-बारावीची परीक्षा सोमवारी सुरू होत असून, २६ मार्चपर्यंत चालणार आहे. या परीक्षेला देश-विदेशातून ७ लाखांहून अधिक विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे.
ही परीक्षा केंद्रशासित प्रदेशासह नेपाळ, सौदी अरेबिया, कुवैत आदी परदेशातील परीक्षा केंद्रांवर एकाच तारखेला घेतली जाणार आहे. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ६४ विषयांचे पेपर असून, यात देशातील मराठी, हिंदी, संस्कृत, बंगाली, कन्नड, गुजराती, मणिपुरी आदी मुख्य भाषांसह जर्मन, अरेबिक, जपानी, नेपाळी, मिझो, लेपचा आदी २८ हून अधिक भाषांचे पेपर असतील.
बारावीची परीक्षा २ मार्चपासून १७ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या परीक्षेसाठी मुख्य भाषांतील २८, तर दीडशेहून अधिक पेपर असणार असल्याची माहिती मंडळाच्या विभागीय जनसंपर्क अधिकारी रमा शर्मा यांनी दिली.