राज्यातील अनेक जिल्हे दुष्काळात होरपळत असल्याने या परिसरातील स्थलांतरितांचा लोंढा ठाणे, मुंबई शहराकडे वळत आहे. मात्र, सोलापूरसारख्या दुष्काळी भागातून आलेले व उसाच्या रसाचा गाडा चालवून उदरनिर्वाह करणारे दाम्पत्य सध्या ठाण्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.
ठाणे – राज्यातील अनेक जिल्हे दुष्काळात होरपळत असल्याने या परिसरातील स्थलांतरितांचा लोंढा ठाणे, मुंबई शहराकडे वळत आहे. मात्र, सोलापूरसारख्या दुष्काळी भागातून आलेले व उसाच्या रसाचा गाडा चालवून उदरनिर्वाह करणारे दाम्पत्य सध्या ठाण्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.
करमाळा तालुक्यातील शिंगवी गावच्या नरसाळे दाम्पत्याने दाखवलेली ही जिद्द खरोखरच असामान्य म्हणावी अशी आहे. गावात नैसर्गिक दुष्काळाचा सामना करताना निर्माण झालेली जिद्द त्यांना ठाण्यात घेऊन आली. या जिद्दीसमोर दुष्काळ हरला आणि नरसाळे कुटुंबाची परिस्थितीवर मात करण्याची शक्ती मात्र जिंकली. दिवसभर ठाण्यातील चौकाचौकात ते आपला रसाचा गाडा घेऊन फिरत असतात.
शांताराम नरसाळे यांना या कामात त्यांची पत्नी शेवंतीबाई यांची मदत होते. शांताराम रस काढत असतात तेव्हा शांताबाई ग्लास भरणे व ग्लास धुण्यासारखी तत्सम कामे करून आपल्या व्यवसायातील वाटा उचलत असतात. दिवसभर मेहनत केल्यानंतर चारशे ते पाचशे रुपये मिळतात. व्यवसाय करत असताना काही वेळा वाहतूक पोलिसांचा त्रास होतो. मात्र दुष्काळी भागातून आलो आहोत, हे समजल्यानंतर त्यांचेही सहकार्य मिळते, असे नरसाळे यांनी सांगितले.
दिवसभर व्यवसाय केल्यानंतर कुठल्या तरी मैदानात अथवा फूटपाथवर हे दाम्पत्य आसरा घेते. मैदानात तीन विटांच्या चुलीवरची भाकरी बनवून खातात. भाकरीबरोबर बहुतेक वेळा मिरचीचा खर्डा अथवा गावाहून आणलेली शेंगदाण्याची चटणी असते. अशाच एका रात्री झोप लागल्यानंतर त्यांची पिशवी एका गर्दुल्ल्याने पळवली होती.
त्या दिवसापासून मैदानात मुक्कामाला आल्यावर दोघांपैकी एक जण झोपतो व एक जागा राहतो. रसाचा गाडा दिवसाला १०० रुपये भाडय़ाने त्यांनी घेतला आहे. शहरातील महाग असलेल्या भाजीला चव नाही आणि भाजीचे पैसे वाचवले तर तेवढेच गावाला लेकराला दोन पैसे जास्त पाठवता येतील, ही या दाम्पत्याची तळमळ बरेच काही सांगून जाते.