गेल्या वर्षभरापासून गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत असणा-या अर्जदारांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
मुंबई – गेल्या वर्षभरापासून गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत असणा-या अर्जदारांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. म्हाडाने गेल्या वर्षी काढलेल्या सोडतीतील जवळपास ३०० विजेत्यांना घराची किंमत भरण्यासाठी पहिले सूचना पत्र पाठवण्यात येणार आहे. पुढील आठवडय़ापासून ही प्रक्रिया सुरू केली जाईल. अर्जदारांनी किंमत भरल्यानंतर घराचा ताबा देण्याची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यांत राबवली जाईल. विजेत्यांनी नियोजित वेळेत किंमत भरल्यास त्यांना लवकरात लवकर घराचा ताबा देणे सोयीस्कर पडणार असल्याचे म्हाडाच्या अधिका-यांनी सांगितले.
गेल्या वर्षी म्हाडाद्वारे मुंबईतील १ हजार ६३ घरांसाठीची सोडत काढण्यात आली होती. विजेत्या अर्जदारांना वर्षभरात घरांचे वितरण करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला असून त्या अनुषंगाने प्रक्रियाही राबवली जात आहे. सोडतीतील इमारतींना महानगरपालिकेद्वारे भोगवटा प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. म्हाडाने आतापर्यंत ७०० विजेत्यांना पहिले सूचनापत्र पाठवले आहे. अर्जदारांच्या पात्रतानिश्चितीसाठी बँकेत कागदपत्र सादर केल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली. आतापर्यंत ४५० विजेत्यांची पात्रतानिश्चित झाली आहे. पहिल्या टप्प्यात ३०० अर्जदारांना घराची किंमत भरण्यासाठी पहिले सूचनापत्र पाठवण्यात येईल. घराचा ताबा देण्यासाठीची प्रक्रिया मार्च ते एप्रिल दरम्यान राबवली जाईल.
सेवानिवृत्तीच्या दिवशी कर्मचा-यांना धनादेश
म्हाडातर्फे निवृत्त कर्मचा-यांकरिता नवीन उपक्रम राबवला जात आहे. कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी निरोप समारंभ आयोजित करून त्यांना ग्रॅच्युईटी (उपदान) आणि रजा रोखीकरणाचे धनादेश देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. झेंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या योजनेअंतर्गत म्हाडाचे सचिव डॉ. बी. एन. बास्टेवाड आणि वित्त नियंत्रक संजय शाह यांच्या हस्ते आठ अधिकारी-कर्मचारी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी कर्मचा-यांना ग्रॅच्युईटी, रजा रोखीकरणाचे धनादेश, सेवा प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.