श्रीशैल ह्या नावाचा अर्थच मुळी देवीचा पर्वत असा आहे. तेथील ज्योतिर्लिगही प्रसिद्धच आहे. जटाजूट, भस्म, रुद्राक्ष अशी त्यांची अवधूतमूर्ती वैराग्याचे साक्षात प्रतीक. त्रिदेवांचा अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांनी आपल्या मातेला अजपा साधनेचा उपदेश केला होता. गोरक्षनाथांनी गौरवलेली न भूतो न भविष्यती अशी ही सहज सोपी, कोणालाही करता येण्यासारखी पण, अत्यंत प्रभावकारी साधना सर्वच योगसाधकांनी आचारावी अशी आहे. श्रीशंकराने दत्तात्रेयांच्या हस्ते मच्छिंद्रनाथांच्या माध्यमातून नाथ संप्रदायाची गुढी उभारली. त्यामुळे दत्त संप्रदायाबरोबरच नाथ संप्रदायातही दत्तात्रेयांना मानाचे स्थान आहे. अशी मान्यता आहे की, सिद्ध गोरक्षनाथ आजही दत्तसेवेत आहेत. याच विषयीची एक कथा पाहू.
स्त्री-राज्यातून मच्छिंद्रनाथांची सुटका केल्यावर मच्छिंद्र-गोरक्ष ही गुरू-शिष्यांची जोडगोळी नाना ठिकाणची भ्रमंती करत होती. एके दिवशी मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना भिक्षा आणण्यास सांगितले. त्यावेळी त्यांचा मुकाम एका पर्वतावर होता. आजूबाजूस चिटपाखरूही नव्हते. जवळपास गावही दिसत नव्हते. भिक्षा मागायला जाणार कुठे, या चिंतेत असताना गोरक्षनाथांना मैनावाती राणीचे बोल आठवले. स्त्री-राज्यातून निरोप घेताना तिने कधीही भिक्षा मागायला या, असे सांगितले होते. गोरक्षांनी योगसामर्थ्यांने आपले भिक्षापात्र आकाशमार्गाने स्त्री-राज्यात धाडले. ते भिक्षापात्र थेट राणीपुढे जाऊन पडले. राणीने नाथाचे पात्र लगेच ओळखले आणि ती आश्चर्यचकीत झाली. तिलाही आपले शब्द आठवले आणि ही गोरक्षांचीच किमया आहे याची खात्री पटली. एवढय़ाशा पात्रातली भिक्षा तिघांना (मच्छिंद्र, गोरक्ष आणि मीननाथ) कशी पुरणार अशी काळजी वाटून तिने आपल्या दासींना त्या पात्रात भरपूर भिक्षा वाढण्यास सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेवढी भिक्षा घालावी तेवढे ते पात्र मोठे मोठे होत होते. अगदी मारुतीच्या शेपटासारखे. शेवटी राणी अहंकार सोडून मनातल्या मनात मच्छिंद्रनाथांना शरण गेली. तत्क्षणी पात्र पूर्ण भरले आणि परत अवकाशमार्गाने गोरक्षनाथांकडे निघाले.
वाटेत एका पर्वतावर अत्रिपुत्र दत्तात्रेय बसले होते. त्यांनी आकाशमार्गाने उडत जाणारे हे भिक्षापात्र पाहिले. त्यांना विस्मय वाटला. हे कोणाचे पात्र आहे ते विचारावे या हेतूने त्यांनी हातातला दंड वर केला. पात्र घेऊन जाणारी सिद्धी त्या दंडाला आपटून खाली पडली. दतात्रेयांनी तिला ठावठिकाणा विचारला आणि पुढे जाण्याची अनुमती दिली. सिद्धी भिक्षापात्रासह गोरक्षनाथांकडे पोहोचली आणि म्लान वदनाने उभी राहिली. गोरक्षनाथांनी तिला उशीर होण्याचे कारण विचारले. सिद्धीने झालेला सर्व प्रकार कथन केला.
आपल्या सिद्धीला कोणी गोसाव्याने दंड मारून पाडले, हे ऐकून गोरक्षनाथांचा क्रोध अनावर झाला. आपल्या योग सामर्थ्यांचा अपमान करणाऱ्याला शासन करायला ते त्या पर्वतावर पोहोचले. गोरक्षनाथांचा क्रोध म्हणजे ज्वालामुखीच. पर्वतावर दत्तात्रय ध्यानस्थ बसले होते. गोरक्षनाथांनी क्रोधायमान होऊन दातात्रेयांवर झेप घेतली. पण, अघटित घडले. गोरक्ष दत्तात्रेयांच्या शरीरातून त्यांना काहीही इजा न करता आरपार निघून गेले. पाण्यातून काठी फिरवली, तरी ते जसे अभेद राहते अगदी तसे. गोरक्ष विस्मयचकीत झाले. दत्तात्रेयांनाही गोरक्षांची परीक्षा पाहावी, असे वाटले. ते गोरक्षनाथांना म्हणाले, गोरक्षा! तुझ्या सिद्धींविषयी मी बरेच ऐकून आहे. तू सिद्धांचा सिद्ध आहेस असे ऐकले आहे. तुला ब्रह्मांडसमाधीचा अनुभव आहे म्हणे. जरा पंचतत्त्वात लीन होऊन दाखव बरे. बघूया तुला शोधता येतेय का ते.
गोरक्षनाथ अवश्य म्हणत तेथून गुप्त झाले आणि समुद्रात एक छोटा मासा बनले. दत्तात्रेयांनी ध्यान लावले आणि क्षणात गोरक्षांचा ठाव शोधला. पटकन पाण्यात हात घालून त्यांनी माशाच्या रूपातील गोरक्षनाथांना बाहेर काढले. मग ते गोरक्षनाथांना म्हणाले, आता मी अदृश्य होतो. तू जर मला शोधू शकलास, तर तू खरा सिद्ध. मग माझे सर्वस्व तुला दिले असे समज.
गोरक्षाने होकार देताच, दत्तात्रेय अदृश्य पावले. गोरक्षाने चौदा भुवने, तीर्थक्षेत्रे, गुहा, वने, समुद्र सर्व शोधले, पण दत्तात्रेय काही त्यांना सापडले नाहीत. आपण हरलो असे लक्षात येऊन गोरक्षांनी मच्छिंद्रनाथांचा धावा केला. मच्छिंद्रनाथ तत्काळ पर्वतावर प्रकट झाले. गोरक्षांनी झालेली हकीकत सांगितली. ती ऐकल्यावर मच्छिंद्र म्हणाले, गोरक्षा! हा नक्कीच अत्रेय आहे. त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही असला अचाट प्रकार करता येणार नाही. त्याला शोधण्याचा मार्ग एकच की, तू लीन भावाने पंचतत्त्वात विलीन झालेल्या दत्तात्रेयांना मनोध्यानाने शोध. गुरू आज्ञेनुसार गोरक्षांनी तसे करताच, दत्तात्रेयांचे दिव्य स्वरूप त्यांना दृगोचर झाले. अलक्ष शब्द गर्जून गोरक्ष त्यांना आदेश करते झाले आणि म्हणाले,
दत्तात्रेयांच्या या उत्तरावर गोरक्ष देहभान विसरले. त्या अवस्थेतच मिच्छद्रनाथांनी गोरक्षांचा हात दत्तात्रेयांच्या हातात ठेवला. द्वैत नावालाही उरले नाही. केवळ सोहम भाव भरून राहिला. गोरक्षनाथांची क्षमता जाणूनच दत्त माऊलीने त्यांना गिरनार, (जुनागढ, गुजरात) पर्वतावर आपल्याबरोबर वसवून घेतले आहे.