गोवंडी-देवनार म्हटले म्हणजे डोळ्यांसमोर येते कचरापट्टी. दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टय़ा, उघडी गटारे, तुटलेल्या- फुटलेल्या लाद्या, घरातील शिक्षणास अनुकूल नसलेले वातावरण, घरातील अपुरी जागा, तेथील कोंदट वातावरण यामुळे शिक्षणाची साधी आवडही नसलेल्या मुलांमधील कलागुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न समाजवादी पक्षाकडून होत आहे.
मुंबई- गोवंडी-देवनार म्हटले म्हणजे डोळ्यांसमोर येते कचरापट्टी. दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टय़ा, उघडी गटारे, तुटलेल्या- फुटलेल्या लाद्या, घरातील शिक्षणास अनुकूल नसलेले वातावरण, घरातील अपुरी जागा, तेथील कोंदट वातावरण यामुळे शिक्षणाची साधी आवडही नसलेल्या मुलांमधील कलागुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न समाजवादी पक्षाकडून होत आहे. यासाठी या विभागातील सर्वच मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देतानाच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गोवंडीतील समाजवादी पक्षाचे स्थानिक नगरसेवक रईस शेख ‘गोवडी एज्युफेस्ट-२०१६’चा अभिनव प्रयोग करत आहे. अशाप्रकारे केवळ एकाच विभागासाठी शैक्षणिक मेळावा राबवण्याचा मुंबईतील हा पहिलाच प्रयत्न असून या माध्यमातून गोवंडीतील मुलेही आपण कशातच कमी नाही आहोत, हे दाखवून देण्यासाठी सज्ज झालेली आहेत.
‘गोवंडी एज्युफेस्ट-२०१६’ या सोहळ्यात पूर्व प्राथमिकपासून ते उच्चशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात गोरगरीब मुलांनाही त्यांच्या संधीची माहिती आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी १९ ते २१ जानेवारीदरम्यान गोवंडी परिसरात १६ ठिकाणी शैक्षणिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महापालिकेच्या गोवंडी भागातील ७३ शाळांमधील ५२ हजार आणि ५० ते ६० खासगी शाळांमधील ३ ते ४ हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती ‘गोवंडी एज्युफेस्ट-२०१६’चे आयोजक नगरसेवक व महापालिकेतील सपाचे गटनेते रईस शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. १९ व २० या दोन दिवशी शाळांतर्गत हा कार्यक्रम होणार असून २१ तारखेला ‘गोवंडी एज्युफेस्ट-२०१६’ सांगता होणार आहे. या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
‘गोवंडी एज्युफेस्ट-२०१६’मधील स्पर्धा विविध ठिकाणच्या शाळांमध्ये घेण्यात येणार आहेत. नर्सरीतील मुलांसाठी संगीत, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, समूह नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर त्याच दिवशी प्राथमिकच्या मुलांसाठी लोकनृत्यावर आधारित स्पर्धा होईल. उच्च प्राथमिकच्या मुलांसाठी अभिनय, निबंध, पोस्टर पेंटिंग, सामान्य ज्ञान आदी तर माध्यमिकच्या मुलांसाठीही अशाच स्पर्धा होतील. उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी चर्चा, वादविवाद, व्यक्तिमत्त्व विकास, नाटक, आदी स्पर्धा घेतल्या जातील तर महिलांसाठीच्या स्पर्धामध्ये मेहंदी, गायन, रांगोळी आदींचा समावेश आहे. याशिवाय विभागातील मुलांसाठी शरीरसौष्ठव स्पध्रेचेही आयोजन करून व्यसनाधीन मुलांना फिटनेसकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न असल्याचे शेख यांनी सांगितले.