मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर जाणा-या दोन जागांसाठी होणा-या निवडणुकीसाठी घोडेबाजार तेजीत आला आहे.
मुंबई- मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर जाणा-या दोन जागांसाठी होणा-या निवडणुकीसाठी घोडेबाजार तेजीत आला आहे.
अपक्षांसह इतर छोटय़ा पक्षांना पैशांसह इतर आमिषे दाखवून आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न सर्वच उमेदवारांकडून होत आहे. दहा लाखांपर्यंत अपक्षांसह इतर नगरसेवकांसाठी बोली लावत त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. २००९मध्ये झालेल्या निवडणुकीतही अपक्षांचा भाव दहा लाख होता. पण सहा वर्षानीही तोच भाव मिळत असल्याने घोडेबाजारात आपला भाव वाढवण्याचा प्रयत्न अपक्षांकडून होत असल्याचेही समजते. तसेच काही कुंपणावरच्या विविध पक्षांमधील नगरसेवकांनीही बिनधास्तपणे ऑफर स्वीकारत आपल्या पक्षाला राम राम करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे या नगरसेवकांमुळे ही निवडणुक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी मुंबई महापालिकेतून जाणा-या दोन जागांसाठी शिवसेनेचे रामदास कदम, काँग्रेसचे भाई जगताप आणि अपक्ष प्रसाद लाड हे रिंगणात आहेत. येत्या २७ डिसेंबर रोजी या दोन जागांसाठी महापालिका मुख्यालयात निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांकडून दगाफटका होऊन तसेच मते फुटू नये म्हणून प्रत्येक पक्ष काळजी घेत आहे. शिवसेनेने मढ आयलंड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये आपल्या नगरसेवकांसह अपक्षांची व्यवस्था केली आहे.
याच हॉटेलमध्ये २० खोल्या अधिक बूक करून तेथे भाजपाच्या नगरसेवकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. शनिवारी भाजपाचे नगरसेवक तेथे जाणार असल्याची माहिती भाजपाच्या वरिष्ठ अधिका-यांकडून समजते.
अपक्षांमुळे शिवसेना बेजार
शिवसेनेचे ७६ नगरसेवक असून १३ अपक्षांनी त्यांना जाहिर पाठिंबा दिलेला आहे. परंतु हा पाठिंबा महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी असून विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या बाजुने मतदान करणे बंधनकारक नाही. त्यामुळे अपक्षांनी या घोडेबाजारात हात धुण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेकडे असलेल्या १३ नगरसेवकांपैकी दीपक हांडे, भावना मांगेला आणि लीना शुक्ला हे शिवसेनेत परत गेले आहेत. परंतु उर्वरीत १० अपक्ष नगरसेवकांना फोडाफोडीसाठी शिवसेनेसह काँग्रेस आणि अपक्षानेही आपले घोडे त्यांच्या दिशेने दामटवले असल्यामुळे त्यांचा भाव चांगलाच वधारलेला दिसून येत आहे. त्यामुळे आपलेच अपक्ष नगरसेवक आपले ऐकत नसल्यामुळे शिवसेना बेजार झाली असून विविध मार्गानी त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे.
कपटी मित्राचाच आधार
२००९ला झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या विजयानंतर कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा,असा अनुभव आल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या रामदास कदम यांनी दिली होती. परंतु या निवडणुकीत कपटी मित्राचा आधार घेण्याची वेळ शिवसेना आणि रामदास कदमांवर आली. मनसे तटस्थ राहिल्यामुळे विजयासाठी ६८ मतांपेक्षा अधिक मते आवश्यक असली तरी ऐनवेळी मनसेने भूमिका बदलल्यास सेनेला ८० पेक्षा अधिक मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे कपटी मित्रांच्या मदतीशिवाय रामदास कदम यांचा विजय होणार नसून मागील निवडणुकीत मधु चव्हाण यांना दुस-या क्रमांकाची मते न दिल्यामुळे शिवसेनेमुळे त्यांचा पराभव झाला होता. त्याचा वचपा काढण्याची भाजपाची रणनिती असून शिवसेनेची मते फोडून ती प्रसाद लाडकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेखात्रीलायक सुत्रांकडून समजते.
सर्व नगरसेवक मुंबईतच
शिवसेना आणि भाजपाचे नगरसेवकांची व्यवस्था ‘रिट्रीट’मध्ये तर काँग्रेसच्या नगरसेवकांची व्यवस्था दमणच्या डेन्टीन हॉटेलमधून शुक्रवारी आयटीसी मराठा हॉटेलमध्ये केली. तर प्रसाद लाड यांनीही मुंबईच्या हॉटेलमधील २२ खोल्या बुक केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सर्वच नगरसेवक मुंबईतच असून रविवारी सकाळी या सर्व नगरसेवकांना महापालिका मुख्यालयात नेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे
मनसेच्या नगरसेवकांची होतेय घुसमट
विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच मनसेने व्हीप काढून २४ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईबाहेर जावू नये, असे नगरसेवकांना फर्मान सोडले होते. परंतु ऐनवेळी मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली. त्यामुळे या निवडणुकीत भागच घेतला जाणार नसल्यामुळे कुटुंबासह बाहेर जाण्याची इच्छा असलेल्या नगरसेवकांची घुसमट झाली. पक्षाचा आदेशच मिळत नसल्याने मुंबईत राहावे की नको यामुळे मनसेचे नगरसेवक गोंधळले आहेत.