कोणत्याही चित्रपट कथेत किंवा प्रेमकथेत डोळयांना व नजरेला फार महत्त्व असते. याच नजरेच्या महत्त्वाविषयी अधिक विशदपणे सांगणारा नजर हा सिनेमा या आठवडयात प्रदर्शित झाला आहे.
कोणत्याही चित्रपट कथेत किंवा प्रेमकथेत डोळयांना व नजरेला फार महत्त्व असते. याच नजरेच्या महत्त्वाविषयी अधिक विशदपणे सांगणारा नजर हा सिनेमा या आठवडयात प्रदर्शित झाला आहे. दिवाळीच्या आधीच्या आठवडयात होणारा चित्रपट म्हणून या चित्रपटविषयी अधिक अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट म्हणजे एक प्रयोग झाला आहे.
चित्रपटाची कथा आहे एका मुलीच्या जीवनाची. ती जन्मापासून अंध असते. त्याच गावात एक तलाठी येतो. दिसायला बरा असलेल्या या तलाठयाच्या जेवणासाठी या मुलीची नियुक्ती करण्यात येते. त्याच काळात हा तलाठी तिला आपल्या जाळयात ओढतो.
लग्नाचं आमिष देऊन तो तिचा उपभोग घेतो. त्यानंतर लग्नाच्या तयारीसाठी म्हणून तो गावातून शहरात जातो व आपली बदली करून घेतो. त्यानंतर मग तिच्या आयुष्यात काय होते? ही गोष्ट या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक गोरख जोगदंडे यांच्याकडे एक चांगली कथा होती. ती कथा त्यांना हवी तशी फुलवता आली असती. मात्र केवळ नायिका व नायकातल्या प्रेमप्रसंगात व गावातल्या लोकांच्या चर्चामध्ये हा चित्रपट कुठे तरी अडकून पडला आहे की काय असे वाटत राहते. या चित्रपटातून एक नेत्रदानाचा संदेश मात्र तेवढा गंभीरपणे देण्यात आलेला आहे.
अनेक अनावश्यक व कृत्रिम वाटणा-या प्रसंगांनी हा चित्रपट भरलेला आहे. त्यामुळे तो पाहत असतानाही कधीही आपली एक सूर सापडत नाही. त्यातल्या त्यात या चित्रपटातल्या अभिनेत्यांनी आपल्या परीने चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे. तेजा देवकर हिने अंधपणाची भूमिका करताना चांगले काम केल्याचे दिसून येते. गावातल्या काही लोकांनाही या चित्रपटातून संधी देण्यात आली आहे.
मुळात गावातला तलाठी नेमका काय काम करतो व त्याच्यावर काय जबाबदारी असते याचं कोणतंही दर्शन या चित्रपटातून दिसून येत नाही. त्यामुळे कोणतंही काम धंदा नसणारा एक जण एवढीच त्याची भूमिका दिसून आली आहे. त्यामुळे त्या पात्राचं खलनायकपणही जितक्या स्पष्टपणे यायला हवं तितक्या ठाशीवपणे ते आलेलं नाही.
नेमक्या कोणत्या गतीने ही कथा चालते व त्याचप्रमाणे या कथेतून नेमकं काय सांगायचं याचा उलगडा चित्रपटात फारच उशिरा होतो. चित्रपटातले प्रसंग इतके सावकाश घडतात की त्याला खास एक सिनेमॅटिक गती असते, याचाही विचार दिग्दर्शकाने केला नाही की काय असे वाटत राहते. त्यामुळे एक चांगली कथा वाया गेली की काय असा भास होत राहतो. त्या मानाने सन्ना मोरे यांनी लिहिलेले काही संवाद मात्र प्रेक्षकांना धरून ठेवतात.