उन्हाळी सुट्टी साजरी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांचा मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
मुंबई- उन्हाळी सुट्टी साजरी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांचा मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सध्या एसटीसह कोकण रेल्वेला प्रवाशांची तुडुंब गर्दी लोटू लागल्याने प्रवाशांच्या हालाला पारावार उरलेला नाही.
कुटुंबकबिल्यासह मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांच्या खिशावर दरोडा घालून दुप्पट-तिप्पट दराने खासगी वाहतूकदारांनी लूट माजवण्यास सुरुवात केली आहे. ही लूट निमूटपणे सहन करण्यापलीकडे चाकरमान्यांना पर्याय नसल्याने खासगी वाहतूकदारांचे चांगलेच फावल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
परतीच्या प्रवासात कोकण रेल्वे आणि एसटी बसमध्ये प्रवाशांना पाय ठेवण्यास जागा मिळत नाही. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने परतीचा प्रवास करण्याकडे अनेकांचा भर आहे. उन्हाळी सुट्टी, गणेशोत्सव आणि शिमगोत्सवासाठी कोकणात मोठया प्रमाणावर मुंबईकर चाकरमानी दरवर्षी दाखल होत असतात.
प्रवाशांच्या तुलनेत एसटी आणि कोकण रेल्वेची सेवा अपुरी पडत असल्याने कोकणवासीयांना नाइलाजास्तव खासगी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो. प्रवाशांच्या या गैरसोयीचा फायदा उठवत खासगी वाहतूकदार सालाबादप्रमाणे यंदाही प्रवाशांची लूट माजवत आहेत. मुंबईत परतीच्या प्रवासासाठी सध्या दुप्पट पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
एसटी आणि कोकण रेल्वेच्या तिकिटाच्या तुलनेत ७०० ते १००० रुपये तिकीट दर आकारून ही खुलेआम लूट ठिकठिकाणी सुरू आहे.
तोटा भरून निघतो
एरव्ही कोकण मार्गावर प्रवाशांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे आमचे प्रचंड नुकसान होते. त्यानंतरही सेवा सुरूच असते. अशावेळी प्रवाशांची संख्या अधिक असल्याने जादाचे दर आकारले जातात. त्यामुळे वर्षभर होणारा तोटा काही प्रमाणात भरून काढण्यास मदत होते.
– संजय ढोकाळे, खासगी बस वाहतूकदार