मराठी सिनेमाचा आत्मा त्यातील आशय समजला जात असला तरी हल्ली दिग्दर्शक कोण हे बघूनही सिनेमाला गर्दी होण्याचा ‘ट्रेंड’ आला आहे.
मराठी सिनेमाचा आत्मा त्यातील आशय समजला जात असला तरी हल्ली दिग्दर्शक कोण हे बघूनही सिनेमाला गर्दी होण्याचा ‘ट्रेंड’ आला आहे. त्यामुळे जसे कलाकारांच्या नावाने चित्रपट चालतात तसेच दिग्दर्शकाच्या नावानेही सिनेमे चालू लागले आहेत. परंतु सशक्त आशय, प्रसिद्ध कलाकार आणि सर्जनशील दिग्दर्शक असे भक्कम ‘पॅकेज’ घेऊन ‘बायोस्कोप’ हा सिनेमा येत आहे.
चार दिग्दर्शक, चार कवितांवरील वेगवेगळ्या चार गोष्टी, चार कवी, चार संगीतकार अशा चौकोनी भिंगाच्या चौकटीतून सादर होणारा ‘बायोस्कोप’ दि. १७ जुलै रोजी संपूर्ण राज्यात प्रदर्शित होत आहे.
टाईमपास, बालक-पालक, बालगंधर्व, नटरंग यांसारख्या एकापेक्षा एक हिट देणारे दिग्दर्शक रवी जाधव तसेच पिपाणी, टुरिंग टॉकीज, पोस्टकार्ड, अनवट, अनुमती यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा, भारतीय, तुला शिकवीन चांगला धडा, बे दुणे चार अशा चित्रपटांद्वारे घराघरात पोहोचलेले तसेच सध्या सुरू असलेल्या ‘येक नंबर’चे दिग्दर्शक गिरीश मोहिते तर खेळ मांडला, गोजिरी, ती रात्र, शर्यत अशा चित्रपटांचे दिग्दर्शक विजू माने या चारही दिग्गजांनी एकत्र येऊन एकाच चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. परंतु असे जरी असले तरी प्रत्येकाच्या दिग्दर्शनाचे वेगळेपण आणि खासियत रसिकांना अतिशय ठळक आणि स्पष्टपणे जाणवणार आहे.