कुर्ला येथील भाभा रुग्णालयात मरण पावलेल्या सायरा शेख यांचा मृत्यू इंजेक्शनच्या रिअॅक्शनने झाला नाही, तर डेंग्युमुळे झाला असल्याचा निष्कर्ष मुंबई महापालिकेने काढला आहे.
मुंबई- कुर्ला येथील भाभा रुग्णालयात मरण पावलेल्या सायरा शेख यांचा मृत्यू इंजेक्शनच्या रिअॅक्शनने झाला नाही, तर डेंग्युमुळे झाला असल्याचा निष्कर्ष मुंबई महापालिकेने काढला आहे. सायरा शेख यांना ताप होता आणि डेंग्यूच्या आजारासाठी त्यांची रक्त तपासणी ‘पॉझिटिव्ह’ आलेली होती. त्यामुळे डेंग्यूच्या आजाराचे लेबल लावत स्वत:वरील डाग पुसण्याचा प्रयत्न पालिकेने केल्याचे उघड झाले आहे.
कुर्ला येथील के. बी. भाभा रुग्णालयात महिला आंतररुग्ण कक्षात १८ ऑगस्ट रोजी एकूण २८ रुग्णांना इंजेक्शनची बाधा झाली होती. या वेळी रुग्णांना थंडी वाजणे, उलटी व चक्कर येणे, अंग दुखत असल्याचे प्रकार घडू लागल्याने केईएम रुग्णालयात १५, शीव रुग्णालयात १३ रुग्णांना तातडीने हलवले होते. हे सर्व रुग्ण ताप, मलेरिया आणि अतिसाराचे होते. यापैकी २२ रुग्णांना सेफ्रीट्रीएक्सोन आणि ५ रुग्णांना सेफोटॅक्सिम या इंजेक्शनसह अन्य औषधेही दिली होती. परंतु सायरा शेखचा केईएम रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या महिलेची प्रकृती इंजेक्शनची बाधा झाल्यानंतर अत्यंत खालावल्यानंतरही पालिका प्रशासनाने या महिलेची डेंग्यू आजारासाठी रक्ताची तपासणी ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे सांगत तिच्या शवविच्छेदन अहवाल प्रतीक्षेत असल्याचे म्हटले आहे.
शिवसेनेच्या कुर्ला येथील नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी घटना घडल्यानंतर दोन दिवसांत स्थायी समितीत हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे याबाबत प्रशासनाकडूनच खुलासा मागितला होता.
यात प्रशासनाने शेख यांना डेंग्यू झाल्याचे म्हटले आहे. मात्र, या प्रकरणी प्रमुख वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ. नागदा यांच्या अधिपत्याखाली एक चौकशी समिती नेमली होती. या समितीने अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांना अहवाल सादर केल्यानंतरही त्यावर कोणतीही वाच्यता केली जात नाही. मात्र, खुद्द स्थायी समितीच्या बैठकीत यावर खुलासा करण्यापूर्वी हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही प्रशासन त्यावर स्पष्ट मत मांडत नसल्याने यात काही लपवाछपवी असल्याचे बोलले जात आहे.