जुलै महिन्यात पाऊस कमी झाला असला तरीही बदलत्या हवामानामुळे मुंबईकरांना अजूनही साथींच्या आजारांनी ग्रासलेले आहे.
मुंबई – जुलै महिन्यात पाऊस कमी झाला असला तरीही बदलत्या हवामानामुळे मुंबईकरांना अजूनही साथींच्या आजारांनी ग्रासलेले आहे. दूषित पाण्यामुळे होणा-या आजारांचा संसर्ग वाढला असून जुलै महिन्यात गॅस्ट्रोचे तब्बल १ हजार ७५५ रुग्ण आढळून आले आहेत.
कधी कडक ऊन तर कधी थंड वातावरण अशा सततच्या बदलत्या वातावरणामुळे मुंबईकर तापाने फणफणत आहेत. असे असताना तापाबरोबरच गॅस्ट्रोचा त्रासही वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मुळात, सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी रुग्णांचा वाढता आकडा कमी व्हायचे नावच घेत नाही. त्यामुळे मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ामध्ये गॅस्ट्रोचे ८२२ रुग्ण आढळले होते. दुस-या आठवडय़ामध्ये ही संख्या ८८८वर पोहोचली होती. तर तिस-या आठवडय़ात रुग्णांची संख्या दुपटीने वाढून ती १ हजार ७५५वर पोहोचली आहे. गॅस्ट्रोबरोबरच तापाच्या रुग्णांची संख्याही झपाटय़ाने वाढली आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात तापाचे ३,५६३ रुग्ण आढळले होते. तर दुस-या आणि तिस-या आठवडय़ामध्ये चार हजार ७३१ रुग्ण आढळून आले आहेत. तर संपूर्ण जुलै महिन्यात तापाच्या रुग्णांची संख्या सात हजार ९२२ इतकी झाली आहे. दरम्यान, या साथीच्या आजारांवरील रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यास पालिकेला अपयश आले आहे.
विशेषत: सर्दी, खोकला, घसा खवखवणे हा त्रास सर्वानाच जाणवतो. पण वेळेवर उपचार न घेतल्यास हा त्रास वाढून ताप येऊ लागतो. विषाणूंमुळे होणा-या आजाराच्या बरोबरच दूषित पाण्यामुळे होणा-या आजारांचे प्रमाण मुंबईत वाढलेले आहे. त्यामुळे, अशा परिस्थितीत नागरिकांना पाणी गरम करून प्यावे, उघडय़ावरील पदार्थ खाणे शक्यतो टाळावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
हॅपेटायटिसचे १०६ रुग्ण आढळून आले आहेत. डासांमुळे होणा-या आजारात मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आतापर्यंत मलेरियाचे ७४८ रुग्ण आढळून आले आहेत. तर डेंग्यूचे ५७ तर लेप्टोचे ७८ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू आणि कॉलरा या आजारावरील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना जाणवत आहे.
स्वाईन फ्लू रुग्णांची वाढती संख्या
जानेवारी महिन्यापासून स्वाईन फ्लू या आजाराने मुंबईत अक्षरश: थैमान घातले होते. या आजारामुळे मुंबईत आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. उन्हाळा सुरू झाल्यावर स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी होईल, असे वाटले होते. परंतु, तसे झाले नाही. उलट वातावरणातील बदलामुळे ही संख्या झपाटय़ाने वाढत गेली. जुलै महिन्यातही स्वाईन फ्लू रुग्णांचा आकडा चढताच राहिलेला आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात या आजारावरील रुग्णांची संख्या हातांच्या बोटावर मोजण्याइतकीच होती. परंतु, यंदाच्या जुलैमध्ये हा आकडा १८४ वर पोहोचला आहे.