जे. जे. रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयांना झोपडय़ांचा विळखा बसला आहे. त्यामुळे या रुग्णालयांच्या आरोग्य सेवेवरच त्याचा थेट परिणाम होत आहे.
मुंबई – जे. जे. रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयांना झोपडय़ांचा विळखा बसला आहे. त्यामुळे या रुग्णालयांच्या आरोग्य सेवेवरच त्याचा थेट परिणाम होत आहे. यातून आता या रुग्णालयांची सुटका होणार आहे.
या परिसरात असलेल्या अधिकृत झोपडीधारकांना ‘एमएमआरडीए’मार्फत हक्काचे घर देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. शिवाय ज्या झोपडय़ा अनधिकृत आहेत, त्या निष्कासित करण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरच या दोन्ही रुग्णालयांची झोपडय़ांच्या विळख्यातून सुटका होणार आहे. मुंबईतील अनधिकृत झोपडय़ांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. त्यातच जे. जे. रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या परिसरात वाढणा-या झोपडय़ा चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
या दोन्ही रुग्णालयांच्या परिसरात ७३ अधिकृत झोपडय़ा आहेत. मात्र त्यापेक्षा जास्त झोपडय़ा अनधिकृत आहेत. रुग्णालय परिसरात झोपडय़ा वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम रुग्णालयांच्या आरोग्य सेवेवर होत आहे. त्यामुळे रुग्णांना सेवा देताना अनेक अडचणी आणि मर्यादाही येत असल्याची तक्रार पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत या झोपडय़ांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पात्र झोपडीधारकांचे एमएमआरडीएमार्फत पुनर्वसन करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू असेल, त्या ठिकाणी या सर्वाना सदनिका देण्यात येतील. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाला कळवण्यात आले आहे.
दरम्यान, ७३ झोपडय़ांचे प्रत्येकी ३ लाख ७५ हजार रुपयांप्रमाणे २ कोटी ७४ लाख रुपये वैद्यकीय शिक्षण विभागाला एमएमआरडीएकडे भरावे लागणार आहेत. त्यानंतरच संबंधित पात्र झोपडीधारकांना घर मिळू शकेल. त्यानंतर अनधिकृत झोपडय़ांवर महापालिका आणि जिल्हाधिका-यांनी कारवाई करावी, अशी सूचनाही पाटील यांनी संबंधितांना दिल्या.
बाणगंगाच्या सुशोभीकरणासाठी २ कोटी रुपये
बाणगंगा सुशोभीकरणासाठी आणि मंदिराचे जतन करण्यासाठी केंद्र सरकारकडून दोन कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. राज्य सरकारने यासाठी सहा कोटी रुपये मिळावेत, असा प्रस्ताव पाठवला होता. त्यांपैकी पहिला टप्पा म्हणून दोन कोटींचा निधी राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. या निधीच्या माध्यमातून बाणगंगा सुशोभीकरणाला लवकरच सुरुवात केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.