‘मेक इन इंडिया’ या गिरगाव चौपाटीवर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या व्यासपीठाला लागलेली आग सदोष विद्युत यंत्रणेमुळे लागल्याचे मुंबई अग्निशमन दलाने आपल्या चौकशी अहवालात म्हटले आहे.
मुंबई – ‘मेक इन इंडिया’ या गिरगाव चौपाटीवर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या व्यासपीठाला लागलेली आग सदोष विद्युत यंत्रणेमुळे लागल्याचे मुंबई अग्निशमन दलाने आपल्या चौकशी अहवालात म्हटले आहे. सदोष विद्युत यंत्रणेमुळे लागलेली आग तेथील फायरो टेक्निकसाठी वापरण्यात येणारे एलपीजी गॅस सिलेंडर आणि व्यासपीठाखाली ठेवण्यात आलेले रंगाचे डबे तसेच इतर सोल्युशनचे डबे आदी ज्वलनशील पदार्थामुळे मोठय़ा प्रमाणात पसरली. मात्र आयोजक आणि इव्हेंट कंपनीच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागल्याचा ठपकाही या अहवालात ठेवण्यात आला आहे. ज्वालांतील गणपती दाखवण्यासाठी या गॅस सिलेंडरचा विशेष वापर केला होता. परंतु गणपती आगीत दाखवण्यापूर्वीच कार्यक्रम भस्मसात झाल्याचे बोलले जात आहे.
गिरगाव चौपाटीवरील मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या व्यासपीठाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे आणि सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी के. एफ. डिसोझा यांनी १४५ पानांचा अहवाल बनवला आहे. एकूण १२ प्रत्यक्षदर्शीचे कबुलीजबाव नोंदवून बनवलेला हा अहवाल महापालिकेच्यावतीने राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. या अहवालात ही आग सदोष विद्युत यंत्रणेमुळे लागल्याचे नमूद केले आहे.
व्यासपीठाखाली अनावश्यक सामान आणि रंगाचे डबे, रंगासाठी लागणारे टर्पेटाईन, चिकटवण्यासाठी वापरण्यात येणारे सोल्युशन यांसह इतर ज्वालाग्रही पदार्थ होते. त्यामुळे शॉट नंतर ही आग व्यासपीठाखाली लागून पसरली. त्यानंतर एलईडीच्या माध्यमातून एलपीजी गॅस सिलेंडपर्यंत पोहोचून स्फोट होत आगीने रौद्ररूप धारण केल्याचे म्हटले आहे. यामध्ये एकूण ६पैकी १ एलपीजी गॅस सिलेंडर जळून वाकडा झाला होता. पाच गॅस सिलेंडरसह १२ कार्बन डायॉक्साईडचे सिलेंडरही या ठिकाणी होते, असे या अहवालात म्हटले आहे.
परवानगी नसतानाही वापरला फायरो टेक्निकसाठी एलपीजी या कार्यक्रमात ज्वालेतून गणपतीचे दर्शन फायर हायड्रो टेक्निकच्या माध्यमातून घडवले जाणार होते. यासाठी एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर करण्यात येणार होता. परंतु अग्निशमन दलाने या कार्यक्रमाला परवानगी देताना त्यामध्ये गॅस सिलेंडरचा वापर न करण्याचा सूचना दिल्या होत्या. तरीही कार्यक्रमाला गॅस सिलेंडरचा वापर करण्यात आला. याशिवाय आदल्या दिवशी आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये व्यासपीठाखाली ज्वालाग्रही तसेच अनावश्यक सामान ठेवू नये, असे सांगत अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना विझक्राफ्ट कंपनीच्या व्यवस्थापकाला केल्या होत्या. परंतु याचे पालन या कंपनीकडून झाले नसल्याचे यामध्ये म्हटले आहे.
जबाबदारी इव्हेंट कंपनीवर
मेक इन इंडियाचे मुख्य आयोजक राज्य सरकार होते. त्यांनी या कार्यक्रमासाठी ‘विझक्राफ्ट इंटरनॅशनल एंटरटेंमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ची निवड केली होती. सीआयआय आणि विझक्राफ्ट या दोन कंपन्याच्या देखरेखीखाली हे कार्यक्रम केले जात होते. परंतु अग्निशमन दलाने याचे खापर आयोजक असलेल्या सरकारवर न फोडता इव्हेंट कंपनी विझक्रॉफ्टवर फोडले आहे. त्यामुळे सरकारला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर येत आहे.
अहवालाला दिले वेगळे वळण
गॅस सिलेंडरमुळेच आग लागलेली असताना शॉर्ट सर्किंटकारण पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे या माध्यमातून सरकारला आणि कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न आहे. फायर हायड्रोमुळे आग लागल्याचे नमूद केले असते तर सरकारवर हे प्रकरण शेकले असते. त्यामुळेच शॉर्ट सर्किंटकारण पुढे करत ज्वालाग्रही पदार्थ आणि सिलेंडरमुळे ही आग पसरल्याचे म्हटले असल्याचे बोलले जात आहे.
सरकारच जबाबदार
आगीला सरकारच जबाबदार असून हा संपूर्णपणे सरकारचाच निष्काळजीपणा असल्याचा आरोप मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. ‘विझक्राफ्ट’या कंपनीला केवळ बळीचा बकरा बनवला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांच्या आतषबाजीला परवानगी दिली नव्हती, असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून हा कार्यक्रम केल्यामुळे या आगीला मुख्यमंत्रीच जबाबदार असल्याचेही ते म्हणाले.