भारताची अग्रगण्य हिंदी मनोरंजन वाहिनी झी टीव्हीने नुकतीच आपली नवीन ब्रॅण्ड ओळख ‘हरलम्हा, नयी उम्मीद’चे अनावरण केले होते. यातून आयुष्याच्या प्रत्येक क्षणातून आशेच्या नवीन किरणाच्या शोधाचे सौंदर्य प्रतीत होते. झी टीव्हीचा आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी कार्यक्रम कोणता असा प्रश्न विचारला तर बिनदिक्कतपणे सारेगमपचं नाव घेता येईल.
या कार्यक्रमाचे प्रत्येक सत्र हे यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळते. आताही झी टीव्हीच्या नव्या सारेगमप या सत्राची सुरुवात येत्या २७ डिसेंबरपासून होत आहे. हा कार्यक्रम आपण दर शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता पाहू शकतो.
गायन किंवा अन्य कुठल्याही कलेच्या शिक्षणाची प्रक्रिया ही लहानपणापासूनच होत असते. त्याला संगीत क्षेत्रही अपवाद नाहीच. त्यामुळे मोठय़ा कलाकारांची जडणघडण ही लहान वयातच व्हायला हवी याच हेतूने यंदाचे सारेगमप हे बारा-तेरा वर्षाच्या मुलांच्या सहभागाने गाजणार आहे. यात सहभागी होण्यासाठी बारा कलाकारांची निवड करण्यात आली आहे. त्यात ११ वर्षीय अंतरा सरकार बिंद्र ही सध्या संगीत शिकत आहे. मूळ कोलकत्याची ही मुलगी संगीताच्या बाबतीत चांगलीच सजग आहे. लता मंगेशकर व आशा भोसले यांना आदर्श मानणा-या अंतरा या स्पर्धेत तगडं आव्हान निर्माण करत आहे. या स्पर्धेत सहभागी होणा-या प्रत्येक स्पर्धकाची खासियत आहे. त्यांची आवाजाची लकब वेगळी आहे. त्यातून त्यांची वेगळी शैलीही दिसून येत असते. त्यात १३ वर्षाच्या उडीपीमधल्या गगन गांवकर हा सुफी गातो. त्याचे प्रेरणास्थान हे पंडित भीमसेन जोशी हे आहेत. अमृतसरमधून आलेला रिदम कल्याण हा मुलगा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकलेला. त्याला सुखविंदरकडून गाणे शिकायचे आहे. त्याच्या बरोबरच कोचीमधून आलेला अरविंद नायर हा मुलगा शंकर महादेवनला आपल्या गुरुस्थानी मानणारा आहे. या व अशा मुलांमध्ये रंगणारी ही स्पर्धा रसिकांना मात्र या मुलांमध्ये दडलेल्या विलक्षण प्रतिभेचे दर्शन करून देईल यात काहीही शंका नाही. त्यातही या स्पर्धेला मुली विरुद्ध मुलं असा रंग देण्यात आला आहे. त्यामुळे काही धमाल ऐकायला मिळणार ती आहेच. यामध्ये दोन गट करण्यात आले असून एका टीमची कॅप्टन म्हणून मोनाली ठाकूर तर दुस-या टीमचा कॅप्टन म्हणून शान हे सहभागी होणार आहेत. अलका याज्ञिक या शोची महागुरू असेल. या कार्यक्रमाबाबत बोलताना झी टीव्ही प्रोग्रािमग हेड नमित शर्मा म्हणाले,
‘सारेगमप’ हा भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात पहिल्या टॅलेन्टवर आधारित रिअॅलिटी शोजपैकी एक आहे. गेल्या दोन दशकांपासून (या शोने गायनाची परंपराच जणू वाहिनीवर उभारलेली आहे. हा भावी गायकांसाठी एक उत्तम मंच असून देशातील संस्कृती आणि गायन क्षेत्रामध्ये (या शोने उत्तम योगदान दिलेले आहे. देशात उदयास येत असलेल्या कलागुणांना मार्गदर्शन करण्यासाठी हा शो देशातील संगीत क्षेत्रामधील उत्तमोत्तम कलाकारांना परीक्षकांच्या रूपात आणतो. प्रत्येक नव्या सीझनसह हा शो अधिकाधिक भव्य होत चालेला आहे. आता हा शो लिटल चॅम्प्सच्या पाचव्या सीझनसह परतत आहे. आम्ही शान आणि मोनाली यांना मुलांच्या मार्गदर्शकांच्या रूपात आणले आहे. ते त्यांचे आदर्श बनून, त्यांना गायक म्हणून मार्गदर्शन करतील. आमच्या काळातील सर्वात नावाजलेल्या पार्श्वगायिका अलकाजी आपल्या अनेक वर्षाच्या अनुभवासह या मुलांना अमूल्य मार्गदर्शन करणार आहेत.
महागुरू अलका याज्ञिक यांच्या मते, झी टीव्ही आणि ‘सारेगमप’सह अगदी पहिल्या सीझनपासून मी संलग्न आहे. या शोमध्ये आम्हाला असाधारण कला पाहायला मिळते. देशातील सर्वोत्तम गायकांना शोधून काढायचा चंगच जणू हे चॅनल बांधते. सारेगमप हा भावी गायकांसाठी सर्वात सच्चा मंच असून त्यामुळे अनेक संधी खुल्या होतात.
कॅप्टन मोनाली ठाकूर म्हणाली, झी बांगला सारेगमपसह मी झीसोबत काम करू लागले. हा शो आणि ही वाहिनी माझ्यासाठी अतिशय खास आहेत कारण मी माझ्या टेलिव्हिजन करिअरची इथे सुरुवात केली. कॅप्टन शान म्हणाला, ‘या शोसोबत गेल्या दशकाहून जास्त काळापासून मी काम करत आहे. लिटल चॅम्प्सच्या पहिल्या सीझनचे तर होस्टिंगही मीच केले होते. त्यामुळे मला घरी आल्यासारखे वाटत आहे. मुलांच्या टीमचा कॅप्टन बनताना मला आनंद होत आहे. सा रे ग म प ने संगीत उद्योगाला उत्तमोत्तम कलाकार दिले आहेत आणि भावी गायकांसाठी यापेक्षा अधिक चांगला मंच नाही, असे मला वाटते.