मुंबईतील चिंचोळ्या गल्ल्या, दाटीवाटीने वसलेल्या झोपडय़ांमध्ये आगीसारख्या दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचू शकत नाही.
मुंबई – मुंबईतील चिंचोळ्या गल्ल्या, दाटीवाटीने वसलेल्या झोपडय़ांमध्ये आगीसारख्या दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचू शकत नाही. मुंबईतील एकूण ४२ टक्के लोकसंख्या दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टीत राहत असून कांदिवली दामूनगरची घटना असो, काळबादेवीतील गोकुळ निवासची आग असो, अशा ठिकाणी असलेल्या वाहतूक कोंडी आणि चिंचोळ्या गल्ल्यांमुळे अग्निशमन दलाचे बंब वेळीच पोहोचत नसल्यामुळे आग दुर्घटनांचे प्रमाण व्यापक होते. यासाठी झोपडपट्टय़ांसह चिंचोळ्या गल्ल्यांमधून सहज जातील, अशी क्वीक रिस्पॉन्स मल्टीपर्पज वाहने (मिस्ट फायर इंजिन) अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होत आहेत.
दक्षिण मुंबईतील जुन्या इमारती आणि अरुंद रस्त्यांमुळे वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे काळबादेवीतील गोकुळ निवास इमारतीला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर बंबांना वेळेवर पोहोचता आले नव्हते. त्यामुळे या आगीच्या चौकशीसाठी नेमलेले अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) संजय मुखर्जी यांनी आपला अहवाल दिला. या शोधक समितीने छोटे अग्निशमन केंद्र उभारून त्यासाठी लागणारी वाहने (मिस्ट फायर इंजिन) त्वरित खरेदी करण्यात यावी आणि यासाठी लागणारे मनुष्यबळ निर्माण करण्यात यावे, अशी शिफारस केली होती. त्यानुसार अग्निशमन दलाने वॉटर मिस्ट अग्निशमन यंत्रणा असलेली क्वीक रिस्पॉन्स मल्टीपर्पज वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १७ मिस्ट फायर इंजिन खरेदी करण्यात येत आहे. तब्बल ४२ कोटी ४५ लाख रुपये खर्च करून ही १७ फायर इंजिन खरेदी करण्यात येत आहेत. याला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्यामुळे या वर्षभरातच ही सर्व मिस्ट फायर इंजिन ताफ्यात दाखल होणार आहेत.
फायर इंजिन कशा असतील?
क्वीक रिस्पॉन्स मल्टीपर्पज वाहने विमोचन उपकरणे, श्वसन उपकरणे, विद्युत मनोरा, विंच, जनरेटर व इतर साहित्यांसह सुसज्ज असतील. यामध्ये ५०० लिटर पाण्याची क्षमता असलेली टाकी असेल. तसेच याला हायप्रेशर पंप असेल. विशेष म्हणजे या वाहनावर चालक, एक सहायक अग्निशमन दल अधिकारी आणि दोन जवानांसह ही वाहने घटनास्थळी प्रथम रवाना होतील. आग प्राथमिक स्वरूपात असताना त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करेल. कोणत्याही आगीवर प्राथमिक स्वरूपात नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्यास आग मोठी होत नाही. त्यामुळे या वाहनांचा फायदा मोठय़ा प्रमाणात होईल आणि आगीने रौद्ररूप धारण करण्याचे प्रमाण कमी होईल, असे अग्निशमन दलाच्या अधिका-यांचे म्हणणे आहे.
नव्या फायर इंजिनचा उपयोग
मुंबईतील लोकसंख्येच्या ४२ टक्के जनता झोपडपट्टीत राहते. या झोपडय़ा बांबू, चटई आणि प्लास्टिक यासारख्या ज्वलनशील सामग्रीद्वारे बांधण्यात येतात. इथले रस्तेही अरुंद असल्यामुळे आगीचे बंब वोळेवर घटनास्थळी पोहोचू शकत नाहीत. अशा ठिकाणी ही नव्याने खरेदी करण्यात येणारी फायर इंजिन पोहोचू शकतील.