‘देवाची करणी अन् नारळात पाणी,’ असे म्हटले जाते. त्यातही नारळ दर्जेदार असेल तर त्याला चांगला उठाव असतो. केरळमध्ये असा दर्जेदार नारळ उपलब्ध होतो.
ठाणे – ‘देवाची करणी अन् नारळात पाणी,’ असे म्हटले जाते. त्यातही नारळ दर्जेदार असेल तर त्याला चांगला उठाव असतो. केरळमध्ये असा दर्जेदार नारळ उपलब्ध होतो. त्याच दर्जाचा नारळ जिल्ह्यात निर्माण करण्याचे कृषी विभागाने ठरवले आहे. जिल्ह्यात समुद्रकिनारपट्टीच्या भागात नारळ रोपांची मोठी मागणी आहे. ही बाब विचारात घेऊन जिल्हा कृषी विभागाने केरळमधील कोचीतील नारळ विकास मंडळाच्या सहाय्याने सरकारी रोपवाटिकेवर उच्च दर्जाची नारळ रोपांच्या निर्मितीचा उपक्रम हाती घेतला आहे.
त्यासाठी कर्नाटक राज्यातील हसन जिल्ह्यातून नारळ विकास मंडळाद्वारे मान्यताप्राप्त नारळ बागांमधून ५० हजार नारळ बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. सरावली, पेल्हार आणि पालघर येथील सरकारी रोपवाटिकेत दर्जेदार रोपांची निर्मिती करण्यात येत आहे. येत्या खरीप हंगामात मागणी असलेल्या शेतक-यांना रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कोची येथील नारळ विकास मंडळ यांच्यामार्फत योजना राबवण्यासाठी अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत प्रात्यक्षिक क्षेत्राची स्थापना करणे, गांडूळ खत उत्पादन युनिटची स्थापना करणे या बाबींकरिता अनुदान देण्यात येते.
ही योजना वसई, पालघर, डहाणू व तलासरी या तालुक्यांमध्ये राबवण्यात येते. या तालुक्यांतील नारळ उत्पादक शेतक-यांचे १७८७ हेक्टरचे तालुकानिहाय ३३ गट स्थापन करण्यात आले आहेत.
३५ हजारांचे अनुदान
उत्पादकांना नारळ पिकाचे उत्पादन व उत्पादकता वाढीच्या विविध घटकांसाठी प्रति वर्षी प्रति हेक्टर १७,५०० याप्रमाणे २ वर्षासाठी ३५ हजार रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत २०१२-१३ मध्ये २६ लाख २५ हजार अनुदान प्राप्त झाले असून पालघर तालुक्यातील ४३२ लाभार्थ्यांना १८३.९८ हेक्टर क्षेत्रासाठी विविध स्वरूपात अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.