ठाणे महापालिका परिसरात ३० टक्के पाणीकपात ,आठवडय़ातून १ दिवस पाणी बंद
ठाणे – पावसाने ओढ लावल्याने धरणक्षेत्रात पुरेसा पाणीसाठा नाही. त्यामुळे ठाणे महापालिकेने ३० टक्के पाणीकपात करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आठवडय़ातील एक दिवस शहरात निर्जळी राहणार आहे.
ठाणे महापालिकेला मुंबई महापालिकेकडून ६० दशलक्ष लिटर, स्टेमकडून १०० दशलक्ष, एमआयडीसीकडून ११० दशलक्ष तर महापालिकेच्या स्वत:च्या पाणी योजनेतून २०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. ठाणे जिल्ह्यातील धरण परिसरात यंदा मुबलक पाणीसाठा नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शहरात १४ टक्के पाणीकपात होत आहे. पाण्याचे नियोजन आगामी पावसाळ्यापर्यंत करण्यासाठी ही पाणीकपात करण्यात येत आहे. पूर्वी १४ टक्के पाणी कपात शहरातील काही भागासाठीच होती. मात्र, नव्याने होणारी पाणीकपात ही संपूर्ण शहरासाठी लागू राहणार आहे. दरम्यान पाटबंधारे विभागानेही जिल्ह्यातील इतर महापालिकासाठी पाणी कपात सुचवलेली आहे. यात ग्रामीण भागाचाही समावेश आहे.
ठाणे महापालिका परिसरात पाणीचोरी व गळतीचे प्रमाण हे ४५ टक्के आहे. ते कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाण्याचे लेखा परीक्षण करण्याचे ठरवले आहे. तसेच मोजून मापून नागरिकांनी पाणी वापरावे यासाठी मीटरही लावण्यात येणार आहे. दरम्यान, ठाणे महापालिका परिसरात सध्या सुरू असलेल्या पाणीकपातीमुळे शहरवासीयांना त्रास होत आहे. पाणी कपातच्या दुस-या दिवशीही नियमित पुरेसे पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत नव्याने होणा-या ३० टक्के पाणी कपातीमुळे नागरिकांना आता पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे.