राष्ट्रीय मत्स्यबीज विकास मंडळाने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड व अंबरनाथ या दोन तालुक्यांत मत्स्यालय व मत्स्यउत्पादन केंद्र उभारण्यास मान्यता दिली आहे.
ठाणे- राष्ट्रीय मत्स्यबीज विकास मंडळाने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड व अंबरनाथ या दोन तालुक्यांत मत्स्यालय व मत्स्यउत्पादन केंद्र उभारण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाला हिरवा कंदिल देण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत अत्याधुनिक पद्धतीचे मत्स्य साठवण व मत्स्यप्रक्रिया केंद्रही उभारण्यात येणार आहे.
बारवी, चिखलोली, भोज, मानिवली, खांडपे अशा लहान मोठय़ा दहा धरणांत मत्स्यउत्पादन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तलावांत निरनिराळ्या आकारांचे एक हजार पिंजरे सोडण्यात येतील. तसेच गोडय़ा पाण्याबरोबर खा-या पाण्यातील माशांची पैदासही पिंज-यांत केली जाईल. शोभिवंत माशांचीही निर्मिती या प्रकल्पातून होणार आहे. राज्यात सध्या मागणीच्या तुलनेत प्रति माणसी सरासरी ५० ग्रॅम इतके मत्स्यउत्पादन होत असल्याने मासे महाग झाले आहेत. ठाण्यात उभारण्यात येणा-या नव्या प्रकल्पामुळे मत्स्यव्यवसायाला हातभार लागेल.
या दोन्ही तालुक्यांतील तलावांत मत्स्य बीज संवर्धन करून त्याद्वारे कोकणातील जलाशयांतील मत्स्य प्रजनन व्यवस्थेत वाढ केली जाणार आहे. मत्स्यबीज उत्पादनाबरोबरच मत्स्यशेती करणा-या राज्यातील लोकांना माती व पाणी अहवालाची माहिती पुरवणे, तांत्रिक बाबींविषयी मार्गदर्शन करणे आदी उपक्रम या प्रकल्पाद्वारे राबवले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी एकूण १८२ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पानंतर राज्यातील मत्स्य उत्पादनात वाढ होऊन ८४ हजार टन वार्षिक मत्स्य उत्पादन होऊ शकेल.