अनधिकृत इमारतींसाठी राज्य सरकारने अध्यादेश काढावा, यासाठी सर्वपक्षीयांच्या वतीने ‘ठाणे बंद’ची हाक देण्यात येणार आहे.
ठाणे- अनधिकृत इमारतींसाठी राज्य सरकारने अध्यादेश काढावा, यासाठी सर्वपक्षीयांच्या वतीने ‘ठाणे बंद’ची हाक देण्यात येणार आहे. ठाण्यात क्लस्टर डेव्हलमेंट, राजीव आवास, एसआरएच्या माध्यमातून विकास करण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षात सरकार स्तरावर प्रलंबित आहे. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या संदर्भात निर्णय घेत नसल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी ठाणे बंदचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देवराम भोईर, विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक, काँग्रेसचे मनोज शिंदे यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून ‘ठाणे बंद’चा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
लकी कम्पाउंड इमारत दुर्घटनेनंतर ठाणे महानगरपालिकेने भविष्यात धोका उद्भवू नये म्हणून अतिधोकादायक ५७ इमारती तोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या इमारतींत राहणा-या रहिवाशांना बेघर व्हावे लागणार आहे. या इमारतींतील जवळपास १ लाख रहिवाशांचे पुनर्वसन कसे करायचे, हा प्रश्न राजकीय पक्षांसमोर आहे. अनधिकृत बांधकामे तोडण्यास विरोध नसला तरी कायद्यापलीकडे मानवतावाद नावाचा कायदा असल्याने मानवतावादी भूमिकेतून या रहिवाशांना न्याय मिळावा, अशी आमची भूमिका असल्याचे विरोधी पक्षनेते जगदाळे यांनी सांगितले. प्रशासनाला त्यांच्या पद्धतीने काम करावे लागत आहे, ते त्यांनी करावे, मात्र या इमारती खाली करण्यापूर्वी त्यांना आठ दिवसांची मुदत मिळावी म्हणून आयुक्तांना विनंती करण्यात आली आहे. अशा इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट इमारतीतील रहिवाशांनी करून घेण्यास मुदत घ्यावी. इमारतींची डागडुजी करून ज्या इमारती राहण्यास योग्य ठरतील, त्या लोकांना बेघर करण्यात येऊ नये, असे प्रशासनाला सांगण्यात आले आहे.
विशेष म्हणजे ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंट योजना मंजूर व्हावी, यासाठी शिवसेना आमदारांनी व राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधान सभेत मागणी केली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही. याव्यतिरिक्त येथील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न निकाली निघावा, यासाठी राजीव आवास योजनेलाही सरकारने अद्याप मान्यता दिलेली नाही. बीएसयूपीच्या माध्यमातून अन्यथा नागपूर आणि पुणे महापालिकेप्रमाणे एसआरएचे अधिकार ठाण्याला दिले तर हे प्रश्न मार्गी लागणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना, भाजप, आरपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस आदी सर्वपक्षीयांच्या वतीने ठाणे बंदची हाक दिली असल्याचे सांगण्यात आले. बंदची तारीख लवकरच कळवण्यात येईल, अशी माहितीही जगदाळे यांनी या वेळी दिली.
धोकादायक इमारतींतील रहिवाशांना दिलासा
अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी ठाणे महापालिकेकडून नोटिस बजावण्यात आल्या असून, सोमवारी या नोटिसींची मुदत संपत असल्याने या इमारतींतील रहिवाशांची मंगळवारी भीतीने गाळण उडली होती. मात्र किसन नगर नंबर-१मधील कारवाईदरम्यान, एकनाथ शिंदे आणि स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक यांनी घटनास्थळी जाऊन या रहिवाशांना घर रिकामे करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत मिळावी, अशी विनंती महापालिकेकडे केल्याने तूर्तास या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
येथील डवले भवन ही तीनमजली इमारत धोकादायक झाल्याने इमारत खाली करावी, यासाठी पालिकेने नोटिस बजावली होती. त्यासाठी सोमवारची मुदत देण्यात आली होती. मात्र या रहिवाशांना आणखी आठ दिवसांची मुदत मिळावी, अशी विनंती स्थायी समितीचे सभापती रवींद्र फाटक व आमदार रवींद्र शिंदे यांच्या वतीने महापालिकेला करण्यात आली आहे. महापालिकेकडून ही मुदत देण्यात आली असल्याने या इमारतीतील रहिवाशांना अन्य पर्यायांचा विचार करणे शक्य होणार आहे. दरम्यान, राबोडी येथील धवलगिरी ही तीन मजली इमारत रहिवाशांनी रिकामी केल्याने ती पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘सनशाईन’वरील कारवाई टळली
मुंब्रा स्टेशनजवळ असलेल्या सनशाईन या दहावी इयत्तेपर्यंतच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर कारवाईसाठी गेलेल्या ठामपाच्या अतिक्रमण पथकाला कारवाई न करताच परत फिरावे लागले आहे. संघर्ष आघाडीच्या नेत्या ऋचा आव्हाड यांनी यशस्वी मध्यस्थी करून मुलांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे एक महिन्याचा अवधी देण्यात यावा, अशी केलेली विनंती मान्य करण्यात आल्याने तूर्तास या शाळेवरील कारवाई टळली आहे.
नदीम अपार्टमेंटमध्ये भरत असलेल्या या शाळेची इमारती ३० वर्षे जुनी आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर दहावीपर्यंत सनशाइन इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत ४५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नदीम अपार्टमेंटचा समावेश धोकादायक इमारतींच्या यादीत करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक पोलिस बंदोबस्तासह नदीम अपार्टमेंटवर धडकले होते. मात्र या ठिकाणी तळमजल्यावर असलेल्या सनशाइन शाळेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने स्थानिक रहिवाशांनी इमारतीवर कारवाई करण्यात येऊ नये, अशी विनंती केली होती. या कारवाईची माहिती मिळताच संघर्ष संस्थेच्या महिला नेत्या ऋचा आव्हाड घटनास्थळी आल्या व त्यांनी एक महिन्याच्या अवधीत ही इमारत दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन स्थानिक नगरसेविका यासिन कुरेशी यांना दिले. त्यामुळे अतिक्रमण पथक मागे फिरले.