डेंग्यूच्या तापाने मुंबई फणफणू लागल्याने मुंबई महापालिका खडबडून जागी झाली आहे. पण या समस्येवर महापालिकेने सुचवलेला इलाज रोगापेक्षा तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.
मुंबई – डेंग्यूच्या तापाने मुंबई फणफणू लागल्याने मुंबई महापालिका खडबडून जागी झाली आहे. पण या समस्येवर महापालिकेने सुचवलेला इलाज रोगापेक्षा तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत. ज्या व्यक्तींच्या घरात डेंग्यू डासाच्या अळ्या सापडतील त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगवास घडवण्याचा अजब फतवाच महापालिकेने गुरुवारी काढला.
[poll id=”823″]
शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हे आदेश लागू केले आहेत. या वेळी पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होत्या.
शहरात डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. केईएम रुग्णालयात डॉ. श्रुती खोब्रागडे यांचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला. मात्र, याबाबत सार्वजनिक विभाग, कीटकनाशक विभाग गंभीर नसून अनेक ठिकाणी इमारतींच्या तळघरातच पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आढळले आहे.
अंधेरी पश्चिम येथील बेहराम बाग परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने तेथे स्वच्छता मोहीम राबवण्यावर पालिका लक्ष देत आहेत. या वेळी राष्ट्रवादीचे गटनेते दादा पिसाळ यांनी कांजूरमार्ग भागात डेंग्यूचे १८४ रुग्ण असल्याचे सांगितले. तर कुर्ला भागात ३८ रुग्ण असल्याची माहिती डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी दिली.
घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरमध्येही डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एकाच चाळीत १४ रुग्ण असल्याची माहिती देत काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी या आजाराबाबत चिंता व्यक्त केली.
प्रयोगशाळांमधून डेंग्यूच्या रुग्णांची माहिती घ्यावी
पालिका केवळ आपल्याच रुग्णालयातील डेंग्यूच्या रुग्णांची माहिती देते. परंतु या खासगी रुग्णालयांमधील रुग्णांची माहिती दिली जात नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांवर अवलंबून न राहता सर्व प्रयोगशाळांमधून (लॅब) मलेरिया, डेंग्यूच्या आजाराचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी केली जाते. त्या प्रयोगशाळांमधून डेंग्यूसह सर्व आजारांची माहिती प्रशासनाने मागवून घेतल्यास आजारांचे प्रमाण लक्षात येईल, अशी मागणी सभागृहनेते तृष्णा विश्वासराव यांनी केली.
दरम्यान, डेंग्यूचा समावेश गंभीर आजारांच्या यादीत झाल्यास त्याची माहिती सर्व खासगी व इतर रुग्णालयांना देणे बंधनकारक होईल. त्यामुळे यासाठीच्या उपाययोजना राबवणे पालिकेला सोपे जाईल, असा विश्वास डॉ. सुहासिनी नागदा यांनी व्यक्त केला.
उच्चभ्रू वस्तीबरोबरच झोपडपट्टीत पसरू लागला आजार
डेंग्यूचा आजार हा उच्चभ्रू वस्तीत होत असल्याचे बोलले जात असले तरी अनेक चाळी व झोपडपट्टयांमध्येही हा आजार पसरू लागला आहे. अनेक चाळींमधील पाण्याचे ड्रम, घरांवर अंथरलेल्या निळया तथा काळया रंगाच्या ताडपत्रीत पाणी साचून त्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याची माहिती नागदा यांनी दिली. डेंग्यूच्या आजाराचे चार टप्पे आहेत. सध्या पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दुस-या, तिस-या आणि चौथ्या टप्प्यात आजार पसरल्यास प्रभावी वैद्यकीय उपचार करण्यात पालिकेला यश येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, डेंग्यूच्या आजाराच्या जनजागृतीसाठी सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी दोन तास रिक्षा आणि टॅक्सीतून प्रचार करत जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेला सुरुवात झाली असून आता यासाठीची स्टिकरची छापण्यात येणार आहे, असे नागदा यांनी सांगितले.