भाजपने आपल्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचा शुक्रवारी होणा-या शाही शपथविधी सोहळ्यासाठी कोटय़वधी रुपयांची उधळण केली आहे.
मुंबई – भाजपने आपल्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचा शुक्रवारी होणा-या शाही शपथविधी सोहळ्यासाठी कोटय़वधी रुपयांची उधळण केली आहे. नेहमी दुस-या पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणा-या भाजपने या उधळपट्टीसाठी पैसा आणला कुठून? असा जाब कॉँग्रेसने विचारला आहे.
गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी शपथविधीच्या खर्चावरून भाजपवर टीका केली. ‘शपथविधीच्या इव्हेंटसाठी उधळणार कोटीच्या कोटी’ या ‘प्रहार’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसनेही या सोहळ्यावर केल्या जाणा-या खर्चावर टीका केली आहे.
भाजप सरकारचा शपथविधी शुक्रवारी होत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. मात्र भाजपकडे बहुमत नसल्याने त्यांना सत्ता स्थापनेचा आणि शपथ ग्रहण करण्याचा नैतिक अधिकारच नाही. ज्या पक्षाकडे बहुमताचा १४५ चा आकडाच नाही तो पक्ष नैतिकतेच्या आधारावर सत्ता कशी काय स्थापन करू शकतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
भाजपला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांनी लेखी पाठिंब्याचे पत्र दिलेले नाही. त्यामुळे ते केवळ १२३ आमदारांच्या बळावर हे सरकार बनवत आहेत. त्यातही नव्या सरकारसाठी शाही शपथविधी सोहळा आयोजन करून उधळपट्टी चालवली आहे. यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत. हे पैसे भाजपने कुठून आणले हे त्यांनी जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.
शपथविधीचा इव्हेंट करून सोहळ्याचे गांभीर्यच भाजपने घालवले आहे. पंतप्रधानांच्या शपथविधीसाठी १७ लाख खर्च आला होता. मात्र महाराष्ट्रातील नवीन सरकार मात्र शपथविधीसाठी कोटय़वधी रुपये खर्च करत आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सरकारचा आहे की भाजपचा हेही स्पष्ट होणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे पंतप्रधानांनी सर्वच मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला उपस्थित राहणे ही एक नवीन पद्धत रूढ आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेचाच प्रश्न निर्माण झाला आहे, असे गाडगीळ यांनी सांगितले.
दरम्यान, या शपथविधी सोहळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार टीका केली आहे. या भव्य शपथविधी सोहळ्याची गरज नव्हती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. ही केवळ पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोप त्यांनी केला.
दलित संघटनांची निदर्शने
नगर जिल्ह्यात झालेल्या तिहेरी दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यातील दलित, मागासवर्गीय, पुरोगामी, आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी दलित अत्याचार विरोधी कृती समितीच्या माध्यमातून शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर होणा-या शपथविधीदरम्यान धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात साहित्यिक, कवी, पत्रकार तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती ज्येष्ठ साहित्यिका ऊर्मिला पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘राज्यात गेल्या काही महिन्यांत दलितांवर होणा-या अत्याचारांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून, पाथर्डी येथे झालेले हत्याकांड हे महाराष्ट्राला लाजवणारे आहे. तिघांची निर्घृण हत्या करून त्यांचे तुकडे करण्यात आले. माणुसकीला काळिमा फासणारा एवढा भयंकर प्रकार झाल्यानंतरही पोलिसांनी अद्याप कोणाला पकडले नाही. अशीच प्रकरणे परळी, बीड, पाटोदा, पारनेर येथे घडत आहेत. मात्र सर्वच प्रकरणांमध्ये पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत’, असा आरोप पवार यांनी केला.
भाजप सरकारचा आज शपथविधी
भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत पाच ते सात मंत्रीही शपथ घेतील. वानखेडे स्टेडियमवर जवळपास ३० हजार मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. पंतप्रधानांसह भाजपप्रणीत राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत.