मालाड पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव (शांताराम तलाव) या आजवर दुर्लक्षित राहिलेल्या तलावाने यंदा तब्बल २५ वर्षानतर गणेश विसर्जन सोहळा अनुभवला.
मुंबई – मालाड पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव (शांताराम तलाव) या आजवर दुर्लक्षित राहिलेल्या तलावाने यंदा तब्बल २५ वर्षानतर गणेश विसर्जन सोहळा अनुभवला. भिकारी, गर्दुल्ले यांच्या सततच्या वावरामुळे या तलावाकडे जनसामान्यांनी पाठ फिरवली होती.
परंतु, नूतनीकरणानंतर हा तलाव गणेशविसर्जनासाठी खुला झाल्याने गणेशविसर्जनासाठी मढ व आरे वसाहतीपर्यंत जाणा-या गणेशभक्तांना नवा पर्याय प्राप्त झाला आहे. त्यामुळे, गणेशभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
स्थानिक आमदार राजहंस सिंह यांच्या प्रयत्नांमुळे आणि आमदार निधीतून उपलब्ध झालेल्या ४ कोटींच्या मदतीमुळे या तलावाचे सुशोभीकरण शक्य झाले. सिंह यांच्या आमदारकीपूर्वी तब्बल ३ वेळा या तलावाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन झाले होते. मात्र, ते कधीच पूर्णत्वास जाऊ शकले नव्हते. अखेर, सिंह यांनी आपल्या कारकीर्दीत माजी खासदार गुरुदास कामत यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणून स्थानिक नागरिकांनाही एक चांगले स्थळ विकसित करून दिले आहे.
गर्दुल्ले तसेच भिका-यांमुळे या तलावावर सामान्य नागरिकांना जाणे मुश्किल होऊन बसले होते. मालाड येथील कुरार व्हिलेज, आप्पापाडा आदी परिसरातील गणेशभक्तांना गणेशविसर्जनासाठी मढ किंवा आरे वसाहतीतील तलावाला भेट द्यावी लागत असे. गणेशविसर्जनासाठी वाहनांचा आधार घेत गणेशभक्तांना पंधरा ते वीस किलोमीटर लांब असलेल्या तलावांमध्ये मूर्ती विसर्जित करण्यावाचून पर्याय नव्हता.
अखेर, ब-याच प्रयत्नांनंतर या तलावाची पुनर्बाधणी करण्यात आली. तलावाच्या एका भागात विद्युत रोषणाईचे कारंजे, तर उर्वरित भागात गणेश विसर्जनासाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. शिवाय रात्रीच्यावेळी गणेशविसर्जनात अडथळा येऊ नये, यासाठी सर्व ठिकाणी लाइटही बसवण्यात आले आहेत.
शिवाय विसर्जनादरम्यानच्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी तलावाच्या पात्रात पाय-यांची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. गेल्याच महिन्यात गणेशभक्तांसाठी खुले झालेल्या या तलावामध्ये दीड दिवसांच्या तब्बल ३३४ गणेशमूर्तीचे विसर्जन झाले.
या तलावाची खोली २० फूट असून येथे १० ते १२ फूट उंचीच्या गणेशमूर्तीचे विसर्जन होऊ शकते. या तलावाच्या सुशोभीकरणामुळे कुरारगाव, आप्पापाडा, पिंपरीपाडा, क्रांतीनगर आदी भागातील नागरिकांनी मालाडचे वैभव परत मिळाल्याची भावना बोलून दाखवली.