औद्योगिक परिसरातील मोकळ्या जागांवर व रस्त्याच्या कडेला मोठया प्रमाणात कचरा टाकून त्याला आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत.
डोंबिवली – औद्योगिक परिसरातील मोकळ्या जागांवर व रस्त्याच्या कडेला मोठया प्रमाणात कचरा टाकून त्याला आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे होणा-या प्रदूषणामुळे रहिवासी हैराण झाले असून हे प्रकार न रोखल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
औद्योगिक परिसरातील रासायनिक कंपन्यांतून सोडण्यात येणा-या दूषित पाणी व धुरामुळे प्रदूषण वाढले आहे. रहिवाशांनी एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, मानपाडा पोलिस ठाण्यातही याबाबत तक्रार करूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा प्रकार बंद न केल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नंदी पॅलेस हॉटेल व उस्मा पेट्रोल पंप, स्टेट बँक येथील मोकळ्या जागांवर प्लॅस्टिक पिशव्या, रबर, फायबर, केबलचे तुकडे, वेस्टेज ऑईल, थर्माकोल पॅकिंग सामान, हॉटेल व घरगुती वेस्टेज आणि भाजीपाला इत्यादी कचरा टाकला जात आहे.
मोठया प्रमाणात कचरा साठल्यानंतर या कचऱ्याला आग लावून जाळण्यात येतो. कच-याला लावलेल्या आगीच्या धुराचे लोट मिलापनगर परिसर निवासी विभागात पसरत असल्याने नागरिकांना त्याचा खूपच त्रास होत आहे. धुराची काजळी घरात जमा होऊन घाण वास येतो. कचरा डेपोंवर एमआयडीसीने कारवाई करावी,अशी मागणी मिलापनगर रेसिडेन्ट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने डोंबिवली एमआयडीसीक डे एका निवेदनाद्वारे केली आहे. एमआयडीसी परिसरातील लगतच्या ग्रामपंचायती व कंपन्यांकडून हा कचरा टाकला जात असून या मोकळ्या जागांवर बेकायदा कचरा डेपो तयार झाले आहेत.
सिलिंडर गोदामाला धोका
कच-याच्या आगीमुळे जवळच शंभर मीटरच्या आत असलेल्या पेट्रोल पंप व गॅस सिलिंडर गोदामाला धोका पोहोचू शकतो. आग व धुरांमुळे झाडांवर त्याचा विपरित परिणाम होत आहे, असेही नलावडे यांनी सांगितले. अनधिकृत बांधकाम होऊ नये यासाठी एमआयडीसीने यापूर्वी मोकळ्या भूखंडावर संरक्षण दगड व तार कुंपणे घातली आहेत.
त्याचप्रमाणे या जागांवरही संरक्षण कुंपण टाकण्यात यावे अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच कचरा डेपोला मोठी आग लागली होती. या घटनेची माहिती मानपाडा पोलिस ठाणे व अग्निशमन दलाला कळवण्यात आली होती. मात्र केडीएमसी हद्दीबाहेर असल्याने अग्निशमन दलाकडून पाच हजार रुपये भरा असे सांगण्यात आले.
सध्या एमआयडीसी येथील रहिवासी व कंपन्याकडून अग्नी सुरक्षा फी घेत आहे, याकडेही रहिवासी नलावडे यांनी लक्ष वेधले. जल व वायू प्रदूषणाबरोबरच वायू प्रदूषणाचा विषयही एमआयडीसीत गंभीर बनत चालला आहे.