भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये गोंधळ सुरू झाला आहे. अडवाणींसारख्या नेत्याचा मोदींवर विश्वास राहिलेला नाही, हे स्पष्ट होत आहे.
मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये गोंधळ सुरू झाला आहे. अडवाणींसारख्या नेत्याचा मोदींवर विश्वास राहिलेला नाही, हे स्पष्ट होत आहे. त्यांच्या पक्षातच अशी स्थिती असेल, तर देशाने तरी मोदींवर कसा काय विश्वास ठेवावा, असा उपरोधिक सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी उपस्थित केला.
गुरुवारी गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपने आपली चाल, चारित्र्य आणि चेहरा लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो लपवता येणार नाही. गेल्या दोन दिवसांपासून त्याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास लालकृष्ण अडवाणी उत्सुक नव्हते. येथून मोदी आपला जाणीवपूर्वक पराभव करू शकतात, अशी भीती अडवाणींना आहे.
त्यामुळे त्यांनी भोपाळमधून निवडणूक लढण्याचे ठरवले होते. यावरून मोदींवर अडवाणांचा विश्वास नाही, हे स्पष्ट होते. पक्षातल्याच ज्येष्ठ नेत्याला मोदींबाबत सुरक्षिततेची भावना नाही, विश्वासाची भावना नाही, अशा मोदींवर देशाने तरी का विश्वास ठेवावा, असा सवाल सिंघवी यांनी केला.
भाजपने मुझफ्फरपूर दंगलीतील आरोपींना याच भागातल्या दोन मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यात हुकूमसिंग आणि संजय बनियाल यांचा समावेश आहे. यावरून भाजपचा सांप्रदायिक चेहरा उघड होतो. शिवाय भाजप केवळ सत्तेसाठी हापापलेला पक्ष आहे.
खुर्ची मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जावू शकतील, याचीच प्रचिती सध्या ते देत आहेत, असेही सिंघवी म्हणाले. दरम्यान, युपीए-१आणि युपीए-२ ने चांगले काम केल्याचे त्यांनी सांगितले. या काळात गुंतवणूक, बचत, ऊर्जानिर्मिती या क्षेत्रात भरीव काम केल्याचे ते म्हणाले.
गुजरातचे मुख्यमंत्री नेहमी गुजरातचे गुणगाण करतात. प्रत्यक्षात गुजरातपेक्षा महाराष्ट्र, आंध्र, बिहार, दिल्ली आणि हरियाणा ही राज्ये प्रत्येक क्षेत्रांत पुढे आहेत. मात्र येथील मुख्यमंत्री कधीही ही बाब ओरडून सांगत नाहीत, असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला.
पंतप्रधान प्रचारात उतरणार
पंतप्रधान मनमोहन सिंग प्रत्येक निर्णय प्रक्रियेत आहेत, असे सिंघवी यांनी स्पष्ट केले. प्रचाराच्या रणधुमाळीत तेही उतरणार असून, देशात अनेक ठिकाणी त्यांच्या प्रचारसभा होणार असल्याचे ते म्हणाले.