‘साटंलोटं..सगळंचं खोटं’ हा चित्रपट माझ्या मनाच्या फारच जवळचा आहे. गेल्या काही वर्षात मी फार दु:ख भोगले. देबूचं जाणं माझ्या आईचं जाणं, त्यानंतरच्या माझ्या मानसिक स्थितीमधून बाहेर येण्यासाठी मी हा चित्रपट करायचा ठरवला.
‘साटंलोटं..सगळंचं खोटं’ हा चित्रपट माझ्या मनाच्या फारच जवळचा आहे. गेल्या काही वर्षात मी फार दु:ख भोगले. देबूचं जाणं माझ्या आईचं जाणं, त्यानंतरच्या माझ्या मानसिक स्थितीमधून बाहेर येण्यासाठी मी हा चित्रपट करायचा ठरवला.
या चित्रपटाची कथा मी फार आधीच लिहिली होती. त्यावेळीही देबू असं म्हणाला होता की, आपण यावर चित्रपट केलाच पाहिजे, मात्र काही ना काही कारणाने ते होत नव्हतं. शेवटी आता माझ्या मुलीमुळे, सईमुळे ते शक्य झालं. ती म्हणाली, मम्मा तुला हा चित्रपट केलाच पाहिजे.
तिने ज्या पद्धतीने मला एका प्रकारे उठवून उभंच केलं. त्यामुळे हा चित्रपट मी करू शकले. अनेकांच्या मदतीने व आशीर्वादाने हा चित्रपट आता लोकांच्या समोर येत आहे.
साटंलोटंमध्ये काय आहे?
हा एक आऊट अॅण्ड आऊट कॉमेडी चित्रपट आहे. कोणत्याही प्रकारची अश्लीलता न वापरताही आपण एक चांगला विनोदी चित्रपट करू शकतो यावर माझी श्रद्धा आहे. या चित्रपटात अनेक प्रसंगनिष्ठ विनोद आहेत. भाषेतून वेगवेगळया
लोकांच्या स्वभाववैशिष्टयातून घडणारे असे अनेक विनोद या चित्रपटात पाहायला मिळतात. कोणताही विनोदी चित्रपट करताना सगळयात पहिल्यांदा हे जपावं लागतं की आपण आपल्या प्रेक्षकांना गृहीत धरून चालत नाही. त्यांना आपण काहीही दाखवावं आणि ते त्यांना आवडतं असं समजून चालत नाही. त्यांना सगळं कळत असतं.
या चित्रपटात मी प्रेक्षकांना गृहीत न धरता त्यांना एक चांगल्या प्रकारची कॉमेडी देण्याचा प्रयत्न केला आहे. ही सगळी प्रक्रिया मी स्वत: अनुभवली, त्याची मजा घेतली आहे. मला वाटतं तीच गोष्ट प्रेक्षकांच्या बाबतीतही होईल व त्यांना एक चांगला विनोदी चित्रपट पाहण्याचं समाधान नक्कीच मिळेल.
तुम्ही आतापर्यंत अनेक चित्रपट केले, त्यात या चित्रपटाचं स्थान काय आहे?
फारच महत्त्वाचं आहे. मी आतापर्यंत जवळजवळ सर्वच जॉनरचे चित्रपट केले. त्यातही आपल्याला एकदा ना एकदा कॉमेडी ही करायचीच आहे हे माझ्या मनात पक्कं होतं. मात्र तशी वेळ आली नव्हती. आताच्या माझ्या ज्या मानसिकतेत मी हा चित्रपट केला त्याने मला खरोखरच आनंद दिला.
तुम्ही विनोदाकडेही गंभीरपणे पाहता का?
हो, खरोखरच. विनोद करणं ही खरोखरच फार गंभीर अशी गोष्ट आहे. त्यासाठी एक निश्चित अशी योजना करावी लागते. मी तुम्हाला आधीच सांगितलं की, प्रेक्षकांना तुम्ही गृहीत धरून चालत नाही. त्यांना सर्वच गोष्टींची कारणमीमांसा द्यावी लागते.
माझ्या या कथेतली सर्वच पात्रं त्यांचे स्वभाव, त्यांची प्रतिक्रिया देण्याची पद्धती याची निश्चित अशी कारणं आहेत. त्यांचा हा स्वभाव असा का? ते नेमकं काय करताहेत हे मी प्रेक्षकांसमोर उघड केलं आहे. इथे कोणतीही गोष्ट, कोणताही प्रसंग उगीच घडतो असं चालत नाही. प्रत्येकाच्या जीवनाची एक गोष्ट आहे. प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास आहे, त्यातून ते विनोद घडणार आहेत. त्यातले संवादही मी आधीच
प्रसंगानुरूप योजून ठेवले आहेत. माझ्या सेटवर कलाकार आपण हे असं करून बघूया का? असं काही विचारत नाहीत. मी त्यांना सांगते तुम्ही केवळ संहितेला अनुसरून काम करा. त्यात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू नका माझी संहिता इतर सर्वच गोष्टींची काळजी घेण्यास समर्थ आहे. त्याचबरोबर मी कलाकारांना आधीच स्क्रिप्ट देत असल्याने त्यावर त्यांनी त्यांची तयारी चित्रीकरणाच्या आधीच पूर्ण करावी असा माझा शिरस्ता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम करताना त्याचा ताण येण्यापेक्षा त्यांचा आनंदच अधिक येत असतो.
या चित्रपटासाठी कलाकारांची निवड कशा प्रकारे केलीत?
चित्रपटाच्या यशात त्यातल्या कलाकारांचा वाटा फार महत्त्वाचा असतो. मी कलाकारांच्या निवडीवर फार वेळ घेते. माझ्या पात्राच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन योग्य पद्धतीने करतील अशा कलाकारांची मी निवड करते, मला कलाकारांचे चांगले सहकार्यही मिळत असते. त्यांनाही वेगळं काही सांगण्याची गरज भासत नाही.
मला वाटतं की चित्रपटात कलाकार हेच महत्त्वाचे असतात. त्यांच्या देहबोलीतून, संवादाच्या शैलीतून ही कथा पुढे जात असते. माझ्या सर्वच कलाकारांनी जे काम केलं आहे त्यानेही मी समाधानी आहे. या चित्रपटासाठी सर्वच पातळीवर मला मदत मिळाली. कॅमेरामन, कॉस्च्युम या सर्वच पातळीवर झालेल्या चांगल्या कामामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसमोर नेताना एक आत्मविश्वास आहे. मला वाटतं की प्रेक्षकांनाही तो निश्चितच आवडेल. ..
पुरुषोत्तम माणिकराव