विधानमंडळात तातडीचीच चर्चा आज तातडीने सुरू होती. सर्वानाच वेगळी वेगळी तातडी लागली होती. हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या आठवडय़ातील शेवटचा दिवस असल्याने आमदारांना आपापल्या गावाकडे जाण्याची तातडी झाली.
विधानमंडळात तातडीचीच चर्चा आज तातडीने सुरू होती. सर्वानाच वेगळी वेगळी तातडी लागली होती. हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या आठवडय़ातील शेवटचा दिवस असल्याने आमदारांना आपापल्या गावाकडे जाण्याची तातडी झाली.
आपले काम आटोपून साहेब किती तातडीने बाहेर येतात याची वाट त्यांचे पीए पाहात होते. तर पीएचा कधी निरोप येतो आणि आपण गाडी घेऊन निघतो, अशी तातडी चालक मंडळींना झाली होती. सभागृहात उपस्थित होणा-या प्रश्नांचे आणि लक्षवेधीचे ब्रीफिंग तातडीने देण्याची अधिका-यांची लगबग सुरू होती, तर आलेल्या कार्यकर्त्यांना तातडीने कटवून आपला प्रश्न तातडीने समजून घेण्यासाठी मंत्र्यांनी आपल्या अधिका-यांना तातडीने निरोप दिले होते.
मंत्री आणि राज्यमंत्र्यांना सभागृहातील कामकाज तातडीने उरकण्याची तातडी झाली होती. तातडीने सभागृह संपल्यावर आपण तातडीने बातम्या करून तातडीने बाहेर पडू अशी तातडी पत्रकारांनाही झालेली होती.
नागपूर कराराप्रमाणे विदर्भात अधिवेशन घेतले जात असले तरी पहिल्याच आठवडय़ापासून सर्वाना तातडीने परत जाण्याची घाई झालेली असते.
या सरकारचे पहिलेच अधिवेशन असल्याने ते तातडीने संपेल असे वाटले होते. या अधिवेशनात जे महत्त्वाचे विषय चर्चिले जाणे अपेक्षित असते. ते सर्व विषय होऊन गेले होते. परंतु सध्याचे मुख्यमंत्री हे विदर्भाचे आहेत. चार आठवडे अधिवेशन चालले पाहिजे, असा त्यांचा आग्रह यापूर्वी विरोधी बाकावर असताना असायचा.
म्हणूनच आपण विदर्भाचे असताना दोनच आठवडय़ात तातडीने अधिवेशन गुंडाळले असा ठपका येऊ नये म्हणून फडणवीस यांनी अडीच आठवडय़ांचा घाट घातला. ज्या विदर्भासाठी हे अधिवेशन घेतले त्या विदर्भाच्या चर्चेला उत्तर देताना म्हणूनच की मुख्यमंत्र्यांच्या दर दोन वाक्य मागे ‘तातडीने’ हा शब्द येत होता.
जसे की, ‘विदर्भातील सर्व प्रश्न तातडीने मार्गी लागावेत यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. विदर्भातील सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी तातडीने मंजु-या देण्यात येऊन निधीही तातडीने उपलब्ध करून दिला जाईल.’ मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला एक लय होती आणि बरोबर चार वाक्य झाली की ते ‘तातडी’ने असा उच्चार करत होते. पुढे पुढे तर त्यांचे वाक्य झाले की पत्रकार गॅलरीतील पत्रकारच त्यांचे तातडीने असे शब्द उच्चारीत होते.
सकाळी विदर्भाच्या प्रश्नावरील चर्चेला ब-यापैकी उपस्थिती होती. मात्र प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यानंतर गर्दी ओसरू सुरू लागली. प्रश्नोत्तरानंतर औचित्याचे मुद्दे झाले आणि त्यानंतर दुष्काळाच्या प्रश्नावर लगेच मुख्यमंत्री उत्तर देणार होते. मात्र मी ऑनलेग आहे, असे सांगत राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी बोलण्याचा आग्रह धरला. मात्र यावेळी आपली मते मांडताना जाधव यांची गाडी चांगलीच घसरली.
विदर्भातील शेतक-यांना न्याय देण्यासाठी चर्चा असताना त्यांनी थेट प्रांतिक भेद करण्याचा प्रयत्न केला. विदर्भापेक्षा कोकणातील शेतक-यांची अवस्था वाईट असताना तिथले शेतकरी आत्महत्या करीत नाहीत, मग विदर्भातले शेतकरीच का आत्महत्या करतात. त्यांना प्रत्येक वेळी पॅकेज देऊन आपण त्यांना आळशी बनवत आहोत, असा जाधव यांच्या बोलण्याचा सूर होता.
जाधव यांची भाषा ऐकून विदर्भातील दोन्ही बाकांवरील आमदार संतापले. तेव्हा जाधव यांनी तातडीने आपले शब्द मागे घेतले आणि उर्वरित चर्चा तातडीने संपली. त्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांचे उत्तर संपताच बहुतेक सर्व आमदार तातडीने बाहेर पडले. उर्वरित काम उरकण्यासाठी अधिकारी आणि मोजकेच आमदार सभागृहात होते.