माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या बदलीमागे राजकारण आहे. भाजपा नेत्यांशी जवळीक असलेल्या दिल्लीत एका बडया उद्योगपतीचे नाव यात गुंतलेले आहे.
मुंबई- माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या बदलीमागे राजकारण आहे. भाजपा नेत्यांशी जवळीक असलेल्या दिल्लीत एका बडया उद्योगपतीचे नाव यात गुंतलेले आहे.
दिल्लीतील हा बडा उद्योगपतीचा चेहरा उघड होण्याच्या भीतीने मारिया यांची आयुक्त पदावरून बदली केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. पीटर मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया कंपनीच्या व्यवहारांची इडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बारावी उत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका त्यांचे सरकार ज्या डिजिटल इंडियाचा दावा करते, त्याच माध्यमातून सर्वासाठी उपलब्ध करावी.
अन्यथा आपण दहा ते बारा हजार कार्यकर्त्यांचा मोर्चा त्यांच्या घरावर नेऊ, असा इशारा नवाब मलिक यांनी तावडे यांना दिला आहे. तावडे यांची पदवी, विद्यापीठ, तसेच बारावी उत्तीर्ण हा दावाही बोगस असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
आपण माहिती अधिकारात विनोद तावडे यांच्या बारावी उत्तीर्ण असल्याचे पत्र मागितले होते. परंतु शिक्षण मंडळाने ते दिले नाही. त्याऐवजी आपल्या घरी आल्यास आपण गुणपत्रिका दाखवू. आता त्यांनी ती फेसबुक, ट्विटरवर जनतेसाठी उपलब्ध करावी, ही जाहीर मागणी आपण करतो, असेही ते म्हणाले.