घरात डेंग्यूच्या डासांच्या अळी सापडल्यास संबंधितांना अटक करण्याचा निर्णय घेणा-या महापालिका आयुक्तांनी आता स्वच्छतेसाठी मंडईतील गाळेधारक आणि दुकानदारांबाबत असाच निर्णय घेत खळबळ उडवून दिली आहे.
मुंबई – घरात डेंग्यूच्या डासांच्या अळी सापडल्यास संबंधितांना अटक करण्याचा निर्णय घेणा-या महापालिका आयुक्तांनी आता स्वच्छतेसाठी मंडईतील गाळेधारक आणि दुकानदारांबाबत असाच निर्णय घेत खळबळ उडवून दिली आहे.
प्रत्येक मंडईतील गाळेधारक व दुकानदारांना कचरापेटी ठेवणे बंधनकारक करतानाच जर यापुढे दुकानासमोर कचरा पडलेला दिसल्यास संबंधित गाळेधारक व दुकानदाराचा परवानाच रद्द करण्यात येईल, असा फतवा जारी करत आयुक्तांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
देशभर स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत असल्याने दर शनिवारी प्रत्येक विभागात सकाळी दोन तास स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गतच मंडईतील गाळे, मंडई तसेच मंडईतील परिसरासह दुकानदारांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्यामुळे स्वत: कचरा करणार नाही व दुस-याला कचरा करू देणार नाही, असा संकल्प प्रत्येक मंडईतील गाळेधारक आणि दुकानदार तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळेधारकाने करावा, असे आवाहन बाजार विभागाच्या सहायक आयुक्तांनी केले आहे. प्रत्येक परवानाधारकाने आपल्या गाळय़ांवर कचराकुंडी ठेवणे, ठरवून दिलेल्या ठिकाणीच कचरा टाकणे व अन्य ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही, याची खबरदारी याबाबत सर्वाना प्रवृत्त करणे आवश्यक असल्याचे आदेशच त्यांनी प्रत्येक गाळेधारकांना पाठवले आहे.
जे परवानाधारक आपल्या गाळय़ांवर कचराकुंडी ठेवणार नाहीत, मंडईतील मार्गिका स्वच्छ ठेवणार नाहीत त्यांचे परवाना रद्द केले जातील, अशी ताकीद बाजार विभागाने दिली.