महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या व्यथा-वेदना पाहून मन अस्वस्थ झाले. लोक अन्न-पाण्यावाचून तडफडत असताना आपला वाढदिवस साजरा करण्यास मन राजी झाले नाही.
मुंबई – महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या व्यथा-वेदना पाहून मन अस्वस्थ झाले. लोक अन्न-पाण्यावाचून तडफडत असताना आपला वाढदिवस साजरा करण्यास मन राजी झाले नाही. म्हणून वाढदिवस साजरा न करता दुष्काळग्रस्त भागातील जनतेला मदत करण्याचा निर्णय घेतला.
या मदतीमुळे दुष्काळग्रस्तांच्या चेह-यावर जे समाधान दिसेल तोच माझ्यासाठी वाढदिवसाचा खरा आनंद असेल, असे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. निलेश राणे यांनी शनिवारी सांगितले. डॉ. राणे यांचा रविवारी वाढदिवस असून त्यानिमित्त त्यांनी हे विचार बोलून दाखवले. विविध विषयांवर विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपणे उत्तरे दिली.
डॉ. माधवराव गाडगीळ अहवालामुळे कोकणातील जनतेच्या जगण्यावर बंधने येणार असून हा अहवाल रद्द होत नाही, तोपर्यंत आपला लढा कायम राहील. कोकणी माणसाचा विकास हेच आपले ध्येय असून सिंधुदुर्ग जिल्हा जागतिक पर्यटन नकाशावर आणण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांतील आत्मविश्वास वाढला असून २०१४च्या निवडणुकीनंतर पुन्हा दिल्लीत काँग्रेसचेच सरकार येईल, असा विश्वासही डॉ. निलेश राणे यांनी व्यक्त केला.