येत्या वर्षाअखेपर्यंत गिरणी कामगारांसाठी एमएमआरडीएची १० हजार घरे उपलब्ध करून दिली जातील.
मुंबई – येत्या वर्षाअखेपर्यंत गिरणी कामगारांसाठी एमएमआरडीएची १० हजार घरे उपलब्ध करून दिली जातील. त्याचबरोबर म्हाडाद्वारे बांधकाम करण्यात आलेल्या तयार घरांची दुसरी सोडतही काढण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र या घरांच्या किमती काय असतील, सोडत प्रक्रिया कधी आणि कशी राबवली जाईल, आदी अनेक प्रश्न गिरणी कामगारांना पडले आहेत.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर भेट द्यावी आणि दुस-या टप्प्यातील म्हाडाच्या सोडतीच्या आणि एमएमआरडीएच्या घरांच्या वितरणाच्या नियोजनाबाबत कल्पना द्यावी, या आशयाचे पत्र गिरणी कामगार शिष्टमंडळातर्फे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.
२०१२मध्ये म्हाडाद्वारे गिरणी कामगारांसाठी ६ हजार ९२४ घरांची सोडत काढली गेली. पहिली सोडत काढून अडीच वर्षे झाली. मात्र १ लाख ४७ हजार गिरणी कामगारांच्या दुस-या टप्प्यातील सोडतीबाबत शासनातर्फे काहीच हालचाल केली गेली नसल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट आहे. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी कामगारांनी गेल्या महिन्यात विधान भवनावर भव्य मोर्चा काढला होता.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या दुस-या टप्प्याच्या सोडतीबाबत घोषणा केली. एमएमआरडीएची १० हजार घरे बांधून तयार आहेत. या घरांची सोडत डिसेंबर महिन्यात काढण्यात येईल. म्हाडाद्वारे दुस-या टप्प्यातील सोडतीसाठी गिरण्यांच्या जागेवर गृहनिर्मितीचे बांधकाम सुरू आहे. जी घरे बांधून तयार असतील अशा घरांचा सोडतीत समवेश केला जाईल आणि सोडत लवकरच काढली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. घोषणा करून महिना उलटला असला तरी सोडतीच्या नियोजनाबाबत काहीच हालचाल झाली नसल्याने कामगारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरवले आहे.
एमएमआरडीएच्या आणि दुस-या टप्प्यातील सोडतीबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. मात्र या घरांची किंमत काय असेल, सोडत प्रक्रिया कशी राबवली जाईल याची अद्यापही काहीच स्पष्टोक्ती दिलेली नाही. त्यामुळे सोडतीचे नियोजन काय असेल हे जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे आम्ही ठरवले आहे. त्या बैठकीसंबंधीचे पत्रही पाठवण्यात आले आहे. – दत्ता इस्वलकर, गिरणी कामगार नेते