अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा यंदा जीवघेणा ठरला असून देशात उष्म्याच्या लाटेने आतापर्यंत १५०० जणांचा बळी घेतला आहे.
नवी दिल्ली- अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा यंदा जीवघेणा ठरला असून देशात उष्म्याच्या लाटेने आतापर्यंत १५०० जणांचा बळी घेतला आहे. देशातील पर्यावरण क्षेत्रातील बलाढ्य स्वयंसेवी संघटनेने या उष्म्याच्या लाटेत दोन हजार जणांचा बळी गेल्याचा दावा केला आहे. मात्र, या उष्णतेच्या लाटेमागे वाढते जागतिक तापमान कारणीभूत असल्याचा आरोप सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हारमेंटने (सीएसई) केला आहे. हे तापमान वाढत राहिल्यास उन्हाचे चटके अधिक तीव्र होतील, असा इशारा संस्थेने दिला आहे.
देशात तापमानाने घेतलेल्या बळींची संख्या सरकारी आकडेवारीनुसार १५००च्या घरात आहे. आंध्र प्रदेश, तेलंगण राज्यात उष्णतेचे सर्वाधिक बळी गेले आहेत. या राज्यात तापमानाचा पारा ४५ अंशांपेक्षा अधिक आहे. गेल्या १० वर्षात २०१४ मध्ये भारतात सर्वात जास्त तापमान नोंदवले गेले. या कालावधीत तापमानात ०.४९ अंशाने वाढ झाली. भारतात रात्रीचे तापमानही वाढू लागले आहे. अहमदाबाद व दिल्ली शहरात रात्रीचे तापमान ३९ व ३६ नोंदले गेले आहे. तसेच देशातील उष्णतेच्या लाटेचे दिवस ५ दिवसांपासून आता ३० ते ४० दिवसांवर जाऊ लागले आहेत, असे संस्थेने नमूद केले.
उन्हाळा अधिक भयानक होत चालला आहे. २०१०च्या तुलनेत २०१५मधील उष्णतेची लाट कमी दिवसांची आहे, मात्र त्यात सर्वाधिक बळी गेले आहेत. फेब्रुवारी, मार्चनंतर तापमानात अचानक वाढ होत आहे, असे निरीक्षण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक अर्जुना श्रीनिधी यांनी व्यक्त केले.
शहरांमध्ये झाडांची संख्या लक्षणीय घटल्याने तेथील तापमान प्रचंड प्रमाणात वाढत आहे. शहरातील उष्णतेमुळे तापमानात तीन ते चार अंशाने वाढ झाल्याचे जाणवते. वाढत्या तापमानाबरोबरच अतिनील किरणांचाही मोठा त्रास भोगावा लागत आहे. त्यामुळे मानवी शरीरावर परिणाम होतो, असे श्रीनिधी यांनी सांगितले.
ताज्या आकडेवारीनुसार, आंध्र प्रदेशात उष्माघाताने १०२० तर तेलंगणात ४४० जण मृत्यू पावले आहेत. हैदराबाद हवामान विभागाचे संचालक वाय.के. रेड्डी यांनी सांगितले की, आणखी दोन तीन दिवस किनारपट्टीच्या भागातील प्रदेशात गरम हवा राहील. अधिक वेळ उन्हातान्हात फिरणा-यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आंध्रप्रदेशात प्रकाशम जिल्ह्यात सर्वाधिक २०२ जणांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणात नलगोंड जिल्ह्यात सर्वाधिक ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी, जालना येथील तापमान ४६ अंशापर्यंत पोहचले आहे. ओदिशामध्ये उष्माघाताने ४३ तर गुजरातमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे.
अतिनील किरणांचे प्रमाण वाढले
पुण्यातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रापिकल मेटिरॉलॉजी या संस्थेने अतिनील किरणांचा अभ्यास केला. या किरणांचे प्रमाण सध्या प्रमाणापेक्षा अधिक आढळले आहे. या संस्थेने दोन आठवडय़ांपूर्वी दिल्लीत अतिनील किरणांचे मोजमाप करण्यासाठी यंत्रणा बसवली आहे. यात अतिनील किरणांचे प्रमाण ६ ते ९च्या दरम्यान आढळले. हे प्रमाण अतिशय घातक असते.
दिल्लीत धोक्याची घंटा
दिल्लीत गेल्या दोन आठवडय़ांपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर आहे. अतिनील किरणांची मर्यादा या तापमानाने ओलांडली आहे. त्यामुळे दम्याच्या रुग्णांना मोठा धोका निर्माण झाला आहे. अतिनील किरणांच्या जोडीला शहरात कार्बन मोनोक्साईड व नायट्रोजन ऑक्साईडचे परिणाम वाढत आहे. दिल्लीतील हवेचे प्रदूषण प्रमाणापेक्षा अधिक असून त्यात धूळ, धुराचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती ‘सफर’ या संस्थेचे प्रकल्प संचालक गुफ्रान बेग यांनी दिली. वातावरणातील ओझोनचे प्रमाण कमी झाल्यास श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा, छातीत जळजळ होणे आदी प्रकार घडतात.
तेलंगणात ४४० बळी
तेलंगणातील बळींचा आकडा ४४० वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत उष्णतेने १०० बळी घेतले आहेत, अशी माहिती तेलंगणच्या आपत्कालीन विभागाच्या वरिष्ठ अधिका-याने दिली. उष्णतेची लाट आणखी दोन दिवस राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
ओदिशात ४३ जणांचा मृत्यू
ओदिशातही उष्णतेची लाट तीव्र असून ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील तापमान ४६.५ अंशांवर पोहोचले आहे. केंद्रापाडा जिल्ह्यात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर उन्हामुळे आजारी पडलेल्या ६६ जणांवर उपचार केले जात आहेत, असे राज्याचे आपत्कालीन विभागाने सांगितले.