केंद्र सरकारने केलेल्या चुकीच्या नोंदीमुळे ‘धनगर’ आणि ‘धनगड’ या दोन वेगळ्या जमाती आहेत, असा चुकीचा अर्थ लावला जात आहे.
मुंबई- राज्यात ‘धनगर’ आणि ‘धनगड’ दोन्हीही एकच जमात आहे. परंतु केंद्र सरकारने केलेल्या चुकीच्या नोंदीमुळे या दोन वेगळ्या जमाती आहेत, असा चुकीचा अर्थ लावला जात आहे. त्यामुळे राज्यातील लाखो धनगड समाजाला लाभ मिळत नाहीत. त्यामुळे ‘ड’ची चूक तत्काळ सुधारावी, या मागणीसाठी धनगर समाज संघर्ष समितीने सोमवारी मोर्चा काढला. मात्र सरकारकडून आश्वासन न मिळाल्याने समितीने धरणे आंदोलन सुरू केले आहे.
धनगर आणि धनगड एकच जमात असून केवळ इंग्रजी लिपीच्या उच्चारानंतर ‘ड’ व देवनागरीत ‘र’ असा भाषेनुसार झालेला फरक आहे. मात्र ‘र’ चा ‘ड’ झाल्याने धनगर समाजाचा समावेश भटक्या आणि विमुक्त जमातींमध्ये (एनटी) करण्यात येत असून, धनगड समाजाला अनुसूचित जमातीचे (एससी) फायदे मिळत आहेत. या चुकीमुळे राज्यातील सुमारे एक कोटीहून अधिक धनगर समाजाला सरकारच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या चुकीची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी अशी मागणी केली जात आहे.
राज्य सरकारने आचारसंहिता लागू होण्याआधी केंद्राला शिफारस पत्राचे उत्तर पाठवले नाही, तर त्याचा परिणाम येत्या लोकसभा निवडणुकीत दिसेल, असा इशारा संघर्ष समितीचे समन्वयक राजू जांगळे यांनी दिला आहे.