मी आयुष्यभर ध्येयवादी विचाराने जगलो. या विचारामुळेच माझ्या विरोधात अविश्वास ठराव येतोय हे माहीत असतानाही मी डळमळलो नाही.
मुंबई- मी आयुष्यभर ध्येयवादी विचाराने जगलो. या विचारामुळेच माझ्या विरोधात अविश्वास ठराव येतोय हे माहीत असतानाही मी डळमळलो नाही. आयुष्यात अशा पद्धतीने असे संकटं येतच असतात, यामुळे या परिस्थितीत राजीनामा देऊन पळून जावे असे मला वाटले नाही.
यामुळे या निर्माण झालेल्या परिस्थितीकडे मी पाठ न फिरवता सामोरे जाण्याचं ठरवलं. मात्र राष्ट्रवादीने आकडयाच्या सोंगटया फेकून सत्तेचा सारीपाट खेळताना अतिप्रष्ठितेचे गणित जुळवण्याचा जो प्रकार केला त्याची मला खंत वाटते, असे भावनिक निवेदन आपल्याविरोधात आलेल्या अविश्वासाच्या ठरावावरील मत मांडताना विधान परिषदेचे मावळते सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केले.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड करताना माझ्यापुढे माणिकराव ठाकरे यांचेही नाव आले होते, परंतु मी यावर अचूक निर्णय घेत राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांचीच निवड केली. तसे करण्यासाठी मी कोणाचाही सल्ला घेतला नाही.
जे बिनचूक असेल तेच मी ऐकतो असे सांगून राष्ट्रवादी-शेकापच्या जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपांचे खंडनही शिवाजीराव देशमुख यांनी केले. माझ्या विरोधात तीन वेळा अविश्वास प्रस्ताव आला, परंतु तो सभागृहात न मांडता बाहेरच थांबविला गेल्याची प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.
सभागृहात कामकाज करताना कधीही कोणावर अन्याय होईल असे वागलो नाही. त्यामुळेच मला तुम्हीच बिनविरोध निवडून दिले. सभागृहात निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करूनच जे काही अपवादात्मक निर्णय घेतले त्यातील योग्य मत पटल्यावर निलंबित केलेल्या सदस्यांना प्रेमाने बोलावून त्यांची शिक्षा कमी करण्याचा निर्णयही मीच घेतला.
जर कोणाला माझ्याविरोधात अन्य काही भावना असतील तर त्या लिखित द्या, मी काही धोकेबाजी केली असेल तर त्यांची चौकशी होऊ द्या, सभागृहाने दिलेली शिक्षा मी भोगायला तयार आहे, कारण मी अभिमानाने वागणारा एक कार्यकर्ता असल्याचे देशमुख यांनी सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या.
१९७८ला पहिल्यांदा निवडून आलो. राजकारणात प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागला, परंतु प्रत्येक परिस्थितीवर मात करत आपल्या सर्वाचा सहकारी झालो असल्याचेही त्यांनी सांगितले.
रामाने बाण मारण्याची गरज नव्हती
सुग्रीव आणि वाली या दोघा भावांच्या मल्लयुद्धात खरे तर रामाने बाण मारण्याची काहीच गरज नव्हती, अशी खंत मावळते सभापती शिवाजीराव देशमुख यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या घरगुती भांडणात भाग घेतल्याबद्दल सत्ताधारी भाजपाविरोधात सोमवारी अविश्वास ठरावाच्या चर्चेवेळी व्यक्त केली.