चाळींमधून टॉवर्समध्ये घर घेण्याचे गिरणी कामगारांचे स्वप्न पूर्ण झाले. जिथे घाम गाळला त्या मिलच्या जागेवर गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळाले.
मुंबई – चाळींमधून टॉवर्समध्ये घर घेण्याचे गिरणी कामगारांचे स्वप्न पूर्ण झाले. जिथे घाम गाळला त्या मिलच्या जागेवर गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळाले. पण, घराचा ताबा मिळाल्यापासून वर्ष उलटले तरी पाण्याची समस्या काही सुटलेली नाही. लिफ्ट आहेत, पण त्याही अधूनमधून बंद पडतात. शेवटच्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी रहिवाशांना कसरत करावी लागत आहे. पाणी नाही, राहायचे कसे, असा
प्रश्न शिवडीतील स्वान मिलमधील रहिवाशांना पडला आहे. काही रहिवाशांनी पाणी उपलब्ध होईपर्यंत घरे बंद करून दुस-या ठिकाणी वास्तव्य करण्याचा मार्ग निवडला आहे. पै-पै करून हक्काचे घर मिळाले, पण मूलभूत सुविधांकडे म्हाडाचे दुर्लक्ष का, असा संतप्त सवाल रहिवाशांनी विचारला आहे.
दोन वर्षापूर्वी १९ गिरण्यांच्या जागांवर बांधण्यात आलेल्या घरांची म्हाडाने सोडत काढली. सोडतीत ६ हजार ९२५ गिरणी कामगारांना घरे लागली. म्हाडाने २० ते २४ मजल्यांचे टॉवर्स बांधले. या टॉवर्समध्ये गिरणी कामगारांच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र पाणी, साफसफाई, लिफ्ट या समस्येने रहिवासी हैराण आहेत.
शिवडीच्या स्वान मिलच्या जागेवर बांधलेल्या टॉवरमध्ये तर घराचा ताबा मिळाल्यानंतर वर्ष उलटले तरी घरांत पाण्याचा थेंब नाही. एक ते सातव्या मजल्यापर्यंत गिरणी कामगार व त्यानंतरच्या ८ ते २४ मजल्यांवर जुन्या उपकरप्राप्त इमारतींतील रहिवाशांसाठी संक्रमण गाळे आहेत. जवळपास ३०० रहिवासी येथे वास्तव्यास आहेत. इमारतीत पाण्याच्या तीन टाक्या आहेत. केवळ अध्र्या तासासाठी पाणी सोडले जाते. तेही कमी दाबानेच असते. सातव्या मजल्यानंतर पाणी पोहोचतच नाही. त्यामुळे ९५ टक्के रहिवाशांना अध्र्या तासात पाणी भरण्यासाठी कसरत करावी लागते. घराची रक्कम भरण्यासाठी गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी पै-पै जमा के ली. घराचा ताबा मिळाल्यावर काही कुटुंबे वास्तव्यास आली. तर काहींनी घराचे कर्ज परत करता यावे, यासाठी घरे भाडयाने दिली. पण, पाणीच मिळत नसल्याने भाडेकरूंनीही घरे सोडली आहेत. त्यामुळे बँकेचे व उसणवारी घेतलेल्या कर्जाची रक्कम परत करण्यास अडचणी येत आहेत.
इमारतीच्या शेजारी असलेल्या बोअरवेलचे पाणी रहिवाशांना प्यावे लागते. हे पाणी शेवटच्या मजल्यापर्यंत न्यावे लागते. लिफ्ट कधीही बंद पडत असल्याने अशावेळी रहिवाशांना कसरत करावी लागते. घर मिळाले, पाणी कधी मिळणार, असा प्रश्न विचारल्यावर म्हाडाच्या अधिका-यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही, असे येथील रहिवासी आनंद मोरे यांनी सांगितले.
घराचा ताबा मिळून वर्ष उलटले, तरीही पाण्याची समस्या सुटलेली नाही. अवघ्या अध्र्या तासाठी पाणी सोडले जाते. तेही कमी दाबाने. त्यामुळे पाण्यासाठी वणवणच करावी लागते. पाणी नाही, म्हणून काही भाडेकरूंना घर सोडावे लागले आहे. पाण्याची प्रतीक्षा अजून किती दिवस करणार?- एकनाथ आसवले, रहिवासी
हक्काचे घर मिळाल्याचे समाधान आहे. पण, पाणीच नसल्याने जगायचे कसे? पाण्याची समस्या सुटेल या आशेवर वर्ष उलटले तरी या समस्येकडे कु णाचे लक्षच नाही. लिफ्ट तर अधूनमधून कधीही बंद पडते. तक्रार करूनही दुरुस्ती वेळेत होत नाही. पाण्यासाठी म्हाडाकडे चकरा सुरू आहेत. पण, तरीही याकडे दुर्लक्षच आहे. – हरिश्चंद्र जाधव, रहिवासी