पंजाब सरकारमधील मंत्री, काँग्रेस नेता आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू याच्या विरोधात मुजफ्फरपूर येथील न्यायालयात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला हे एकप्रकारे चांगलेच झाले.
वकील सुधीर ओझा यांनी हा खटला दाखल केला आहे. या खटल्यातून काहीही निष्पन्न होणार नाही; परंतु सिद्धूचे कृत्य देशद्रोही असल्याची प्रत्येक भारतीयांची भावना मात्र यानिमित्ताने प्रखरपणे उठून दिसते. एकीकडे देशाचे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे सारा देश शोकसागरात बुडाला होता, दुसरीकडे सीमेवर आमचे जवान दररोज शहीद होत आहेत आणि ज्यांच्या आदेशाने काश्मीर आणि भारतात दहशतवादी कारवाया होत आहेत, ते पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेण्यापूर्वी सिद्धूने थोडा तरी विचार करायला पाहिजे होता. आपल्या वायफळ बडबडीमुळे प्रसिद्ध असलेला सिद्धू पूर्वी भाजपचा खासदार होता. आता तो काँग्रेसवासी झाला असून पंजाबच्या कॅप्टन अमरिंदर सिंग मंत्रिमंडळात मंत्री आहे. क्रिकेटपटू असल्यामुळे त्याचे पाकिस्तानातील इम्रान खानशी मैत्रीचे संबंध असू शकतात. तसे भारतातील अनेक क्रिकेटपटूंचेही आहेत. इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यास भारतातील अन्य क्रिकेटपटूंप्रमाणेच सिद्धूलाही निमंत्रण मिळाले होते. अन्य भारतीय खेळाडूंनी इम्रानचे हे निमंत्रण नाकारले, मात्र सिद्धूने ते स्वीकारले आणि तो इम्रानच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहिला. सातत्याने भारताची कुरापत काढणारा, काश्मीरमध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे हिंसाचार घडविणा-या पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांच्या शपथविधीला सिद्धूने उपस्थित राहणे हे अनेक भारतीयांना खटकणारे होते. त्या समारंभात पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची सिद्धूने गळाभेट घेतली आणि पुन्हा हे भेटीचे समर्थन करण्याचा आगाऊपणा केला. ज्या लष्करप्रमुखाच्या इशा-यावरून भारतावर सातत्याने हल्ले केले जात आहेत, त्या लष्करप्रमुखाची पंजाबचा एक मंत्री गळाभेट घेतो म्हणजे भारतीयांच्या तळपायाची आग मस्तकात जाण्यासारखेच हे कृत्य होते. इम्रान खान व पाकिस्तानी नेत्यांबद्दलचे सिद्धूचे प्रेम उफाळून येणे भारतीयांना कधीच रुचणारे नाही. त्यामुळेच या भेटीनंतर केवळ पंजाबमध्येच नाही तर सा-या देशात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सिद्धूने पाकिस्तानात जाऊन जी कृती केली, ती निषेधार्हच आहे. ज्या भाजपचा खासदार म्हणून सिद्धू मिरवत होता, त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे झालेले निधन लक्षात घेऊन तरी त्याने हा दौरा रद्द करायला हवा होता. इम्रान खानच्या शपथविधी समारंभात सिद्धू पाकव्याप्त काश्मीरचे अध्यक्ष मसूद खान यांच्या शेजारी बसला होता. कोठे बसायचे, हे सिद्धूच्या हातात नसले तरी नकार देणे त्याच्या हातात होते. तो जर त्याने दिला असता तर सा-या भारत वर्षाने त्याला उचलून घेतले असते. मात्र सिद्धूने पाकिस्तानात जाऊन आणि त्यांच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेऊन, पाकव्याप्त काश्मीरच्या अध्यक्षांच्या मांडीला मांडी लावल्याने सर्व भारतीयांची नाराजी ओढवून घेतली आहे. पाकिस्तानच्या ज्या लष्करप्रमुखाच्या इशा-यावर पाकव्याप्त काश्मीरमधून रोज शेकडो दहशतवादी आपल्या काश्मीरमध्ये घुसविले जातात, सीमेवर पाकिस्तानी लष्कराच्या अंदाधुंद गोळीबारात भारतीय जवान शहीद होतात, त्या राक्षसी वृतीच्या लष्करप्रमुखाला मिठी मारून सिद्धूने देशासाठी प्राणार्पण केलेल्या भारतीय जवानांच्या शौर्याचा अपमान केला आहे. सिद्धू हा केवळ क्रिकेटपटू नसून भारतातील एक महत्त्वाचे राज्य असलेल्या पंजाबचा मंत्री आहे, याचाही त्याला विसर पडलेला दिसतो. त्याच्या कृत्याचा सर्वत्र निषेध होत असताना त्याने आपल्या चुकीच्या कृत्याची माफी मागण्यापेक्षा त्याचे समर्थन करण्याचा प्रकार आणखी संताप आणणारा आहे. सिद्धूचा हा उतावळेपणा काँग्रेससाठीही अडचणीचा ठरणारा आहे. या प्रकाराने काँग्रेस आणि पंजाबमधील अमरिंदर सिंग यांचे सरकारही टीकेचे धनी बनले आहे. भाजपने सिद्धूच्या कृत्यावर टीका केली आहेच, पण पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही सिद्धूवर कडाडून हल्ला केला आहे. इम्रान खानशी असलेल्या मैत्रीसाठी सिद्धू देशाचा आणि मातृ राज्याचाही विसर पडला. आजवर पाकिस्तानने आपल्याविरुद्ध केलेल्या कारवाया भारतीय जनता कधीही विसरू शकणार नाही. पंजाब हा पाकिस्तानच्या शेजारचा प्रांत. फाळणीपासून आतापर्यंत पंजाबने बरेच काही सहन केले. आजही पंजाबमध्ये पाकिस्तानच्या छुप्या कारवाया चालूच आहेत. पंजाबमध्ये मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थ पोहोचवून त्यातून युवा शक्तीला बिघडवण्याचा विडा पाकिस्तानने उचललेला आहे. शीख जनतेत फूट पाडून खलिस्तान चळवळीला खतपाणी घालण्याचे नापाक कृत्यही विसरता येणारे नाही. याचीही सिद्धूला जाणीव नसावी, यासारखे दुर्दैव कोणते. भारताने दोन देशांमधील तणाव, शत्रुत्व कमी व्हावे म्हणून अनेकवेळा प्रयत्न केले. माजी पंतप्रधान वाजपेयी १९९९ मध्ये बसमधून पाकिस्तानात नवाझ शरीफ यांना भेटण्यास गेले होते, पण त्यानंतर आतापर्यंत पाकिस्तान भारताशी कसे वागत आला आहे, हे विसरता येईल काय? वाजपेयी लाहोरला बसमधून गेल्यानंतर पाकिस्तानशी मैत्रीचा हात पुढे केला, म्हणून त्यांची प्रशंसा झाली. पण त्याचवेळी पाकिस्तानने कारगीलमध्ये घुसखोरी केली. त्या युद्धात भारताने पाकिस्तानला नमविले, पण त्यासाठी अनेक भारतीय जवानांना आपले प्राणार्पण करावे लागले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीही आपल्या पाकिस्तान दौ-यात पाकिस्तानचे संस्थापक बॅ. जीना यांच्या मझारवर जाऊन माथा टेकून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाकिस्तानी पंतप्रधानांच्या वाढदिवसाला त्यांच्या निमंत्रणाशिवाय पाकिस्तानात जाऊन तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकच्या कारवाया कमी झालेल्या नाहीत, याचा सिद्धूने विचार करायला हवा होता. सिद्धू पूर्वी क्रिकेटपटू होता. आता तो क्रिकेट समालोचन करीत असला तरी आजचा खेळाडू नाही. आज एका राज्याचा कॅबिनेट मंत्री अशी त्याची ओळख आहे. घटनात्मकपद आणि शपथ ग्रहण झाल्यानंतर मंत्री अशीच ओळख कायम असते. अशावेळी अतिउत्साह दाखवणे, थिल्लरपणा करणे मंत्रीपदाला शोभणारे नाही. शांतीदूताचा आव आणणारा इम्रान खान पाकिस्तानातील निवडणूक प्रचारात भारत द्वेषाची गरळ ओकत होता, हे विसरता कामा नये. म्हणूनच सुनील गावसकर, कपिल देव यांनी धर्मांध इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण झिडकारले. सिद्धूला मात्र इम्रानच्या निमंत्रणाचा मोह आवरता आला नाही आणि भारताच्या इंच इंच भूमीसाठी झटणा-या भारतीय लष्कराचा अवमान करताना त्याने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला मिठी मारली आणि भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरचे अध्यक्ष मसूद खान यांच्या शेजारी बसण्याचे निंद्य आणि किळसवाणे कृत्य केले. आपल्या कृत्याचे सिद्धूकडून केले जाणारे समर्थन म्हणजे भारतीय अस्मितेचा अपमान आहे.