नाटय़कलेच्या अभ्यासकांच्या मते या जगात केवळ सात प्रकारचीच कथाबिजं असतात. आपल्या अवतीभवती वाचण्यात, पाहण्यात जितकं म्हणून साहित्य किंवा कथा येतात त्या याच सातपैकी एक असतात. त्यामुळे आपण एखाद्या कलाकृतीला कितीही वेगळं म्हटलं तरी ती या सात प्रकारच्या कथांमध्येच बसत असते.
आतापर्यंतच्या आपल्या अवतीभवतीच्या वा माहितीच्या अनेक साहित्यिकांमध्ये शेक्सपिअर महान का? तर त्याने या सातपैकी चार कथांवर अप्रतिम अशा शोकांतिका दिल्या. त्या केवळ कथाबीजच नव्हत्या तर नाटकाचा एक परिपूर्ण असा आकृतीबंधच होत्या. या चारही नाटकांपैकी एक अजरामर कलाकृती म्हणजे अॅथेल्लो. त्याच कलाकृतीवरून वि.वा. शिरवाडकरांनी नटसम्राट ही अजरामर कलाकृती निर्माण केली.
आधी सकस बीज व त्यावर तितक्याच तोलामोलाची कलाकृती अशा प्रकारचा या नटसम्राटचा प्रवास होता. ही कलाकृती शिरवाडकरांनी इतकी मराठी व सकस केली, त्यात त्यांच्या शब्दसामर्थ्यांची एक एक रत्नं अशी काही पेरली की गेली अनेक र्वष ही कलाकृती रंगकर्मीना खुणावत राहिली. हा नटसम्राट मग सिनेमावाल्यांना खुणावणार नाही हे शक्यच नव्हतं. हिंदीत या बिजावर आधारित अवतार, बागबान अशा अनेक चित्रपटांची निर्मिती झालेली असली तरी नटसम्राटची बातच काही और आहे.
हीच अजरामर कलाकृती दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी या वर्षारंभाची भेट म्हणून आपल्यासमोर आणली आहे.‘नटसम्राट असा नट होणे नाही’ असे शीर्षक असलेल्या या सिनेमातून त्यांनी नाना पाटेकर यांनाही एका वेगळय़ाच रंगात समोर आणले आहे.
चित्रपटाची कथा एका नटाची. आपल्या आयुष्याची अनेक र्वष रंगभूमीची सेवा केल्यानंतर गणपतराव बेलवलकर हे निवृत्ती घेतात. आतापर्यंत आपण आपल्या कुटुंबाला वेळ दिलेला नाही या अपराधीपणाच्या जाणिवेतून मुक्त होण्यासाठी तेही निवृत्ती घेतात. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात जे काही घडते त्याची कथा या चित्रपटात आहे.
नटसम्राट हे नाटक मराठी रसिकांच्या इतकं जवळचं आहे की त्याची वेगळी कथा सांगण्याची काही गरजच नाही. या नाटकाचा चित्रपट करताना महेश मांजरेकर यांनी अनेक बदल केले असले तरी त्याचा मूळ गाभा मात्र कायम ठेवला आहे. वास्तविक पाहता हा मूळ गाभाच या कथानकाची शक्ती आहे. चित्रपट करताना पूर्वाधात महेश मांजरेकर यांनी अनेक प्रसंगाच्या रचनेतून गणपतराव बेलवलकरांची सद्यस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हे करत असताना त्यांचा बेसावधपणा मात्र म्हणावा तितका मनाला भिडत नाही.
कोणतीही शोकांतिका निर्माण होण्याची कारणं ही नेहमीच सुखाच्या दिवसांमध्ये असतात. याची जाणीव ठेवून त्या प्रकारचे प्रसंग आणण्यापेक्षा त्यांनी हे पात्र कसं आत्मप्रौढी असलेलं आहे. त्याला समाजाचे काही नियम कसे माहीत नाहीत हे दाखवण्यात खर्ची घातला आहे. त्यातही या भागात नाना पाटेकरांनीही आपल्या आधीच्या नाटकातल्या स्वगतांनी थोडी रंगत आणण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यात कारण नसताना तोचतोचपणा आला आहे.
अर्थात, यातल्या काही प्रसंगांमध्ये पुढच्या शोकांतिकेची नांदी आहे तेवढीच. त्यातही कोणतंच पात्र हे वाईट नसल्याने दिग्दर्शक म्हणून मांजरेकरांना बरीच तडजोड करावी लागली, तीही त्यांनी अगदी योग्य पद्धतीने केली आहे. महेश मांजरेकरांच्या नटसम्राटचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी सर्वच पात्रांना समान न्याय व भूमिका दिली आहे.
अर्थात हे करताना गणपतराव बेलवलकरांचं चांगलं व इतर वाईट असं न करताही गणपतराव बेलवलकरांना बरोबर ठरवण्याची हातोटीही साधली आहे. हे करण्यासाठी दिग्दर्शकाची माध्यमावर एक पकड असावी लागते ती त्यांनी साधलेली आहे.
पहिल्या भागात मात्र कधी कधी सिनेमाच्या व्याकरणावर नाटकातले संवाद वरचढ होताना दिसतात. त्यामुळे पहिला भाग थोडासा शब्दबंबाळ झालेला दिसतो. त्यातही तो वेळ दिग्दर्शकाने केवळ एका एका पात्राच्या प्रस्थापनेसाठी वापरल्याचंही लक्षात येतो. चित्रपटाच्या उत्तरार्धात मात्र कथा इतक्या वेगाने घडत जाते की त्यात आपण अगदी रंगून जातो. सर्वच पात्रांनी आपल्यावरची जबाबदारीही अशा पद्धतीने सांभाळली आहे की क्या बात है!
चित्रपटाची सर्वच तांत्रिक अंगे विलक्षण आहेत. चित्रपटाचं छायांकन, त्यासाठी वापरण्यात आलेली प्रकाश योजना, त्यातही शेवटच्या काळातलं गणपतराव बेलवलकरांचं राहणं हे सारं काही अगदी अंगावर येणारं आहे.
चित्रपटाची सुरुवात व चित्रपटाचा पहिला सीन हा फारच महत्त्वाचा असतो. या चित्रपटाच्या पहिल्याच सीनमध्ये महेश मांजरेकरांनी लोकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. त्यातही त्यांनी सिद्धार्थ या एका तरुणाच्या पात्राची योजना करून या सा-या घटनेला एक कथांतर्गत साक्षीदारही दिला आहे. मात्र त्याची दृष्टी व प्रेक्षकांची दृष्टी एक ठेवण्यात मात्र काहीसा गोंधळ झाल्याचं दिसून येतं. त्याचं येणं-जाणं व चित्रपटात वावरणं का कोण जाणे एका फिलरसारखं वाटत राहतं.
या चित्रपटाचं नावच नटसम्राट असल्याने ही भूमिकाच या चित्रपटाचा पाया व कळस दोन्ही आहे. नाना पाटेकर यांनी ही भूमिका ज्या पद्धतीने केली आहे, त्याचं वर्णन शब्दात करणं खरोखरच शक्य नाही. एक नट एखादी भूमिका अशा पद्धतीने करू शकतो त्याचे बारकावे, त्यातले सुक्ष्म भेद पडद्यावर अशा पद्धतीने दाखवू शकतो यावर विश्वास ठेवणंच कठीण जावं असं काम त्यांनी केलं आहे. आधीच्या कोणत्याही भूमिकेचा कोणताही संदर्भ रसिकांसमोर आणू न देता प्रसंगी आपल्याच शैलीलाही चकवत त्यांनी ही भूमिका केली आहे. त्यासाठी त्यांनी काय काम केलं असेल याची जाणीव होते.
ज्यांना अभिनय या क्षेत्रात यायचं असेल त्यांनी एकदा अभ्यास म्हणून ही भूमिका बघावी अशी आहे. त्यांची वेगवेगळय़ा प्रसंगातली देहबोली, त्यांचं भावनांचं प्रकटीकरण, त्यांची संवादफेक या सा-या गोष्टी खरोखरच महान आहेत. या चित्रपटाला तांत्रिक दृष्टीने नटसम्राट असा नट होणे नाही असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यातलं असा नट होणे नाही हे बिरुद नानाने मिरवलं आहे.
वास्तविक पाहता स्वगत हा नाटकातला प्रकार, ज्या गोष्टी रंगमंचावरून दाखवता येणार नाहीत, ज्या भावना चेह-याच्या केवळ हावभावांवरून प्रेक्षकांपर्यंत नेता येणार नाहीत, त्या गोष्टी शब्दांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची ती एक शैली होती.
सिनेमामध्येही ही स्वगतं यशस्वी करून दाखवण्याची किमया नानाने साधली आहे. त्यांना इतरांनीही तितकीच प्रामाणिकपणे साथ दिलेली आहे. त्यांचा मित्र, त्यांचा सहकारी, स्पर्धक व त्यांच्या आयुष्याची नेमकी विरुद्ध बाजू असलेल्या राम या व्यक्तीची भूमिका विक्रम गोखले यांनी इतक्या जबरदस्तपणे साकारली आहे की क्या बात है! मेधा मांजरेकरांची कावेरीही सुरेख वठली आहे.
मुलाच्या भूमिकेत असलेल्या अजय परब यानेही आपल्या वाटय़ाला आलेले प्रसंग चांगल्या प्रकारे निभावून नेले आहेत. मात्र दोन अभिनेत्रींचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल त्या म्हणजे सुनेच्या भूमिकेत असलेल्या नेहा पेंडसे व मुलीच्या भूमिकेत असलेली मृण्मयी देशपांडे.
नेहाने एका सुनेचे, एका आईच्या कुचंबणेचं जे दर्शन घडवलं आहे, त्यामुळे तिची भूमिका तिने मान्य करायला लावली आहे. मृण्मयीने एका जबाबदार अशा मुलीची भूमिका करताना आपल्यातल्या पत्नीत्वाचाही विसर पडू दिला नाही हे विशेष.
खासकरून पैसे चोरीच्या प्रसंगाचा शेवट तिने आपल्या परिने ज्या नोटवर केला आहे ती जबरदस्त आहे. सुनील बर्वे यांनी तिच्या पतीची भूमिकाही आपल्या लौकिकाला साजेशी केली आहे. रस्त्यावरच्या बुटपॉलीशवाल्याची भूमिका नीलेश दिवेकरनेही अफलातून वठवली आहे.
एकंदरीत हा चित्रपट केवळ एक चित्रपट म्हणून पाहण्यासारखा नाही तर तो या काळात निर्माण करण्यात आलेला एक सांस्कृतिक ठेवा आहे. आपल्या हयातीत आपल्या अवतीभवती तो निर्माण झाला याचा आनंद म्हणून तो पाहायलाच हवा.