राज्यभरात नव्याने देण्यात येणा-या रिक्षा परवान्यासाठी ठेवलेली शिक्षणाची अट शिथिल करण्याची शक्यता आहे.
मुंबई- राज्यभरात नव्याने देण्यात येणा-या रिक्षा परवान्यासाठी ठेवलेली शिक्षणाची अट शिथिल करण्याची शक्यता आहे. नव्याने देण्यात येणा-या परवान्यासाठी अर्ज करणा-या अर्जदाराला दहावी पासची अट घालण्यात आली आहे.
मात्र, दहावी पास व्यक्ती रिक्षाचालक म्हणून काम करण्यास उत्सुक नसल्याचे मागील वर्षी आढळले होते. त्यामुळे यावेळी शिक्षणाची अट शिथिल करून त्याऐवजी आठवी पास करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागातील विश्वसनीय माहितगाराने सांगितले.
आरटीओच्या नव्या नियमांनुसार ज्या अर्जदारांकडे २००७ पूर्वी तीन चाकी चालवण्याचा परवाना असेल, अशा अर्जदारांसाठी दहावी पासची अट घालण्यात आली आहे. तर २००७ नंतर ज्यांच्याकडे तीन चाकी वाहन चालवण्याचा परवाना व रिक्षाचालक म्हणून बॅच असेल, अशा अर्जदारांसाठी दहावीऐवजी आठवी पासची अट ठेवण्याची शक्यता आहे.
नव्या नियमानुसार मागील वर्षी मुंबईत २० हजार ८१० रिक्षाचालकांचे परवाने जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यामधील १५ वर्षे वास्तव्य व शैक्षणिक अट या नियमांची पूर्तता होत नसल्याने अनेकांना त्याचा लाभच होत नव्हता. परिणामी त्यासाठी फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे आरटीओचे म्हणणे आहे.
मागील वेळेस राज्यभरात ऑनलाईन पद्धतीने मागवलेल्या रिक्षा परवान्यासाठी सुमारे १ लाख ७० हजार अर्ज आले होते. यात ५७ हजार २७४ अर्जदार आठवी पास होते. तर ५० हजार ५७७ अर्जदार दहावी पास होते. फक्त १८ हजार २० अर्जदार हे बारावी पास होते. त्यामुळे नव्याने देण्यात येणा-या परवान्यासाठी शैक्षणिक अट शिथिल केल्यास चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा आरटीओतील अधिकारी खासगीत व्यक्त करत आहेत.