लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवनंतरचे कवित्व आद्यप सुरूच असून, नवी मुंबई मनसेत पदाधिका-यांनी थेट राजीनामा अस्त्र बाहेर काढले आहे.
नवी मुंबई – लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवनंतरचे कवित्व आद्यप सुरूच असून, नवी मुंबई मनसेत पदाधिका-यांनी थेट राजीनामा अस्त्र बाहेर काढले आहे. या नाराज पदाधिका-यांची समजूत काढण्यासाठी बैठक बोलावण्यात आली, मात्र या बैठकीतही हे पदाधिकारी आपसात भिडले. खुर्च्याची फेकाफेक करत ऐरोलीतील उपशहर अध्यक्षाने थेट शहर सचिवाच्या कानशिलात भडकावून आपला राग व्यक्त केला. पक्षातील हा वाद बाहेर जाऊ नये म्हणून प्रकरण मिटवण्यात आले असले तरी हा प्रकार दादरमधील मनसे नेते आणि ठाणे संपर्कप्रमुख नगरसेवक गिरीश धनुरकर यांच्यासमोरच घडल्याने नवी मुंबई मनसेतील सुदोपसुंदी बाहेर आली आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसेच्या काही पदाधिका-यांनी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार केल्याने नवी मुंबईत मनसेला आघाडी घेता आली नाही, असा आरोप करत माजी विधानसभाध्यक्ष विजय घाटे मनसे सचिव कौस्तुभ मोरे व त्यांच्या समर्थकांनी मागील आठवडय़ात राजीनामा पाठवून दिला होता. मनसेत दोन महिन्यांपासून अनेक पदाधिकारी राजीनामा अस्त्र उपसून बाहेर पडत असल्याने ही पडझड रोखण्यासाठी मनसेचे संपर्कप्रमुख गिरीश धानुरकर यांनी तातडीने बैठक आयोजित करून मोरे यांची समजूत काढण्याचा निर्णय घेतला होता. ही बैठक नेरूळमधील स्टेट बँक सभागृहात घेण्यात आली.
या वेळी ऐरोलीतील उपशहराध्यक्ष निलेश बाणखिले व सचिव संदीप गलुगाडे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. बाणखिले यांनी गलुगाडे यांच्या कानशिलात लगावून, लोकसभा निवडणुकीत तुम्ही पैसे खाल्ले, असा आरोप केल्याने त्यांच्यात हाणामारी झाली. दरम्यान, या सर्व प्रकाराला शहराध्यक्ष गजानन काळे जबाबदार असल्याचा आरोप करत खुच्र्याची फेकाफेक केली. या हाणामारीची फूस उपाध्यक्षाने लावल्याचा आरोप एका पदाधिका-याने केला असून या उपाध्यक्षाला अध्यक्ष व्हायचे असल्याने मनसेत फूट पडण्याचा डाव असल्याचा आरोप केला जात आहे.