माया नगरी मुंबईत महिलांवर होणारे अत्याचार, वाढती गुन्हेगारी यात गेल्या काही वर्षात वाढ झालेली दिसून येते. मुंबईत रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स सुरू असतात. त्यातच शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पहाटेपर्यंत हॉटेल्स सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून मंजुरीसाठी राज्य सरकारच्या टेबलावर ठेवला आहे. आदित्य ठाकरे यांचा हा प्रस्ताव रास्त आहे का? पहाटेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्यास परवानगी दिल्यास गुन्हेगारीत वाढ होईल का? अपुरे संख्याबळ असलेल्या पोलिसांवर नाईट लाईफमुळे कामाचा ताण वाढेल का? नाईट लाईफमुळे कुठलाही गुन्हा घडल्यास त्याची जबाबदारी आदित्य ठाकरे स्वीकारतील, असे वाटते का? नाईट लाईफमुळे लाचखोरी वाढेल, असे वाटते का?
चंगळसाठी नाईट लाईफला परवानगी नको
मुंबई शहर हे भारताचे ‘हृदय’ आहे. ते कायम चालू राहिले पाहिजे. हे जरी खरे असले तरी मुंबईतील सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि येथील कायदा व सुरक्षेत कुठेही व कधीही बाधा येणार नाही, याची शासनाला काळजी घ्यावी लागेल.
मुंबईत रेल्वे, एसटी व खासगी वाहनांची ये-जा सुरू असते. त्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, अंधेरी, बोरिवली, वांद्रे व कुर्ला टर्मिनस, परेल एसटी डेपो, दोन्ही विमानतळ फक्त हॉटेल्स आणि रेस्टॉरंट रात्रभर चालू ठेवण्यास हरकत नसावी.
मात्र तेथील बियर बार, पब, वाईन शॉप्स, मॉल्स व चित्रपट गृहांना अजिबात परवानगी देऊ नये. कोणी तरी सांगतो म्हणून नको, तर गरज म्हणून हरकत नसावी. पण चंगळ करण्यासाठी बिलकूल नको.
– अनंत आंगचेकर, भाईंदर
सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा
नाईट लाईफमुळे मुंबई रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याने तरुणाई मोठया प्रमाणावर आकर्षित होईलच, पण आजच्या तरुणांना करिअर हवं आहे, की नाईट लाईफ. नाईट लाईफला पाठिंबा देताना सर्वात मोठा धोका आहे, तो महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा आणि बलात्काराच्या प्रकरणांचा.
रात्रभर तरुणाई आणि लोक मौजमजा करणार आणि एकाही तरुणीवर अथवा महिलेवर अतिप्रसंग अथवा बलात्कार होणार नाही, याची हमी मुंबई पोलीस आणि राज्य सरकार देईल का? अशा बिकट परिस्थितीत रात्रीच्या अंधारात किती गंभीर घटना घडू शकतात, याचा राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी देताना विचार करायला हवा.
– कमलाकर जाधव, बोरिवली, पूर्व
अच्छे दिन के बाद अच्छी राते
नाईट लाईफ सुरू होणार याची चाहुल लागल्यावर प्रश्नांचे काहूर मनात उठले. पण मनात ठाण मांडून बसला तो प्रश्न म्हणजे ‘नाईट लाईफ’ नेमके कोणासाठी? ज्यांच्याकडे भ्रष्टाचारातून मुबलक पैसा आलेला आहे, त्यांच्यासाठी की, मोठमोठे बार आणि रेस्टॉरंट यांच्यासाठी की, सरकारचा महसूल वाढविण्यासाठी?
माणसाचे जीवन केवळ मौजमजा एवढया पुरतेच मर्यादित आहे का? व्यसन म्हणजे ‘भोगवत्ती!’ भोगाबरोबर रोगसुद्धा माणसाची पाठ सोडणार नाही. तरुणाईला रोगाच्या खाईत लोटण्यापेक्षा त्याच्या ऊर्जेला योग्य गती देऊन ती प्रगतीकडे कशी नेता येईल, याचा विचार ‘नाईट लाईफ’चा प्रस्ताव सादर करणाऱ्यांनी वेळीच करावा.
– नारायण तळकटकर, कळवा
हा पोरकट विचार
मुंबईत रात्री उशिरापर्यंत व्यवसाय काही प्रमाणात सुरू असतात. नाईट लाईफ सुरू झाले तर निष्टिद्धr(155)त व्यवसायाचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत जाण्यास वेळ लागणार नाही. यातून समाज घडविण्याऐवजी बिघडवण्याचे कारखाने मात्र उजळ माथ्याने होणार आहेत.
गुन्हेगारीत निश्चित वाढ होईल, मुंबईची सुरक्षा व्यवस्था यू. पी. बिहारींच्या ताब्यात गेली आहे. पूर्वीप्रमाणे ही व्यवस्था त्या त्या अस्थापनाची असावी किंवा सर्व सुरक्षा महाराष्ट्र सिक्युरिटी मंडळाच्या अखत्यारीत आणावी आणि मुंबई महाराष्ट्रात मराठी बोलणे कर्नाटक, तामिळनाडूसारखे सक्तीचे करावे, हेच योग्य वाटते.
– शंकर पानसरे, काळाचौकी
नाईट लाईफ लोकांची गरज नाही
‘रात्रजीवनाची’ (नाईट लाईफ) अपेक्षा युवा नेत्यांकडून केली जाते, याचे आश्चर्य वाटते. यामुळे रोजगार वाढेल, पण कोणाचा? सामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल का? सामान्य चाकरमाने रात्री घरी परतत असताना त्यांच्या खाण्या-पिण्याची परवडेल अशी सोय येथे होणार का? असे जीवन त्यांना आरोग्यदायी ठरेल का?
कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे पोलिसांना आपण किती हैराण करणार आहोत? यापेक्षा अध्र्याअधिक रेल्वे स्टेशनवर कॅन्टीनची जी सोय नाही, ती शासनाने प्रथम करावी आणि सामान्यांचे रात्रजीवन अधिक सुरक्षित करावे. नेत्यांना अपेक्षित असलेले ‘रात्रजीवन’ ही लोकांची गरज नाही, हे त्यांनी ध्यानी ठेवावे.
– डॉ. सुधीर मोंडकर, ठाणे
मुंबईचे जीवन विस्कळीत होईल
मुंबई शहरात रोज खून, बलात्कार, दरोडे यांसारख्या घटना घडत असताना येथील नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष देताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. याची जाणीव राजकारण्यांना असताना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पहाटेपर्यंत हॉटेल्स सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला असून त्याला मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी परवानगी दिल्याचे वाचनात आले.
इतकेच नव्हे तर मुख्यमंत्रीही त्यास अनुकूल असून आगामी अधिवेशनात कायद्यात आवश्यक ते बदल केले जातील, असे संकेत दिले आहेत. परंतु असे निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य मुंबईकरांचे हित जपले पाहिजे. कारण नाईट लाईफ सुरू झाल्यानंतर गुन्हेगारीचे प्रमाण वाढेल.
– मधुकर कुबल, बोरिवली, पूर्व
नाईट लाईफ वादग्रस्त ठरेल
‘मुंबई शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे, हे मान्य. पण ते महाराष्ट्राचे सांस्कृतिक, मराठी संस्कृती टिकवणारे शहर आहे. त्याचे मराठीपण टिकवणे आपले कर्तव्य आहे. सव्वा कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या आणि लाखभर पोलीस खूपच विसंगती आहे. त्यातच नेत्यांच्या संरक्षणासाठी दिवस-रात्र पोलीस वावरतात.
मुंबईत सारे सुरळीत आहे, तर पोलीस संरक्षण का? मुंबईत गुन्हेगारी नाही. मग दररोज दरोडे, बलात्कार, लुटमार, खून यांची नोंद पोलिसात कशी होते. नाईट लाईफ सामान्य नागरिकांची, मराठी माणसाची गरज नाही. मराठीचा स्वाभिमान जपताना ‘नाईट लाईफ’ टायटल दिले, तर आता बिअर बार, दारूची दुकाने, पब, यांचा मुक्त संचार होणार.
– महादेव गोळवसकर, घाटकोपर
नाईट लाईफ आधी जनमताची गरज
नाईट लाईफ युवा पिढीसाठी घातक आहे. तरुण-तरुणी रात्रभर पबमध्ये धिंगाणा घालून मुलींच्या छेडछाडीला आमंत्रण देतील आणि त्याला आवर घालण्यासाठी पोलीस बळ अपुरे पडेल. रात्रीच्या चो-या, दरोडा, खून करणारे नाईट लाईफमध्ये सामील होतील आणि पोलिसांना गुन्हे पकडण्याचे जिकिरीचे होईल.
मुलगी, मुलगा घरी येईपर्यंत आई-वडिलांच्या डोळ्याला डोळा लागत नाही. या आई-वडिलांनी करायचे काय. नाईट लाईफच्या भुरळाने तरुण पोरं रात्रभर घराबाहेर राहू लागली, तर त्यांचा सत्यानाशच होणार आहे. नाईट लाईफ सुरू करण्याऐवजी २४ तास रेल्वे व बस सेवा सुरू करा, त्यामुळे शासनाच्या महसुलात वाढ होईल. शासनाने तरुणांच्या शिक्षण आणि रोजगारासाठी झगडणे योग्य वाटते.
– अरुण पराडकर, डोंबिवली
बेरोजगारांना सुसंधी!
मुंबईत नाईट लाईफसाठी रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारच्या टेबलावर प्रस्ताव ठेवला आहे. खरं म्हणजे प्रस्ताव पास होतो, का हा मुख्य प्रश्न आहे. प्रस्ताव पास झाल्यास त्यासाठी काही नियमावली बनवून हॉटेल फक्त खाण्यासाठी उघडी ठेवावीत.
बाकी इतर गोष्टींना थारा नको! तसेच बेकायदेशीर धंदे लावणाऱ्यांवर कडक निर्बंध घालावे लागतील. लाचखोरीवर नजर ठेवावी लागेल. पण याबाबत जर खरोखर रोजगार वाढत असले, तर चांगली गोष्ट असूनही त्याची जबाबदारी सर्वाना घ्यावी लागेल.
– सुभाष वाघवणकर, जोगेश्वरी
प्रस्ताव रास्त नसल्याने बासनात गुंडाळावा!
मुंबईत रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स सुरू असतात. त्याचा आश्रय आधीच गुन्हेगार घेत आहेतच. त्यात या माया नगरीत महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणातही वाढ झालेली असताना व गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणा-या पोलीस संख्येत मात्र वाढ न झाल्याने कामाचा ताण वाढेल.
सेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफची मागणी करीत हॉटेल्स पहाटेपर्यंत चालू ठेवण्याचा आग्रह सरकारने मान्य केला, तर गुन्हेगारांचे अधिकच फावेल, पोलीस अतिरिक्त ताण सहन करू शकणार नाहीत. त्यासाठी सरकारला नवीन धोरण राबवावे लागेल. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या या प्रस्तावावर फेरविचार व्हावा व बासनात गुंडाळावा!
– अनिल पालये, बदलापूर
पोलिसांवर अतिरिक्त भार वाढेल
नाईट लाईफला परवानगरी देऊन मुंबईला जागतिक शहरांच्या पंक्तित बसविण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंचा दिसतोय. परंतु तो योग्य नाहीच. लंडन व न्यूयॉर्क येथील परिस्थिती वेगळी, ‘कडक कायदे’ याचा विचार करता नाईट लाईफ मुंबईत तर नकोच नको.
रात्री-अपरात्री मद्यधुंद तरुण-तरुणींना कसे काय रोखणार. सध्या मुंबईचे चंगळवादाकडे जाणारे पाऊल खाणे, पिणे व मनोरंजनात वाढत आहे. मॉल, पब, बारमध्ये व्यसनाधिनता वाढतच आहे. त्यात नाईट लाईफ म्हणजे स्वैराचाराचा हैदोस. आदित्य ठाकरे सुरक्षित घरी, तर तरुण पिढी मात्र व्यसनाच्या आहारी’ गुन्हेगारीचा ताण ‘पोलिसांना’ व कच-याचा त्रास ‘पालिकेला’ असेल.
महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली. तर शासनाची जबाबदारी वाढणार आहे. पालकांच्या डोक्याचा मन:स्ताप वाढेल. पोरकट निर्णयाला संमती न देता सरकारने चांगले निर्णय घ्यावेत. महाराष्ट्राची मान शरमेने झुकेल, असे निर्णय नकोत.
– अनंत दाभोळकर, अंधेरी पूर्व
‘‘नाईट लाईफ’’ धोक्याची घंटी
अपुरे पोलीस दल, त्यांच्यावर पडणारा अतिरिक्त कामाचा ताण. वाढती गुन्हेगारी, मग हे ‘नाईट लाईफ’चे नाटक कशासाठी! रात्रभर मुंबई चालू राहिल्यास अनधिकृत कृत्यांना ऊत येईल. गुन्हेगारी वाढेल. बंद असलेले डान्स पुन्हा चालू होतील. भ्रष्टाचार, लाचखोरी वाढेल.
गैरकृत्यांना आळा घालण्यास पोलीस दल अपयशी ठरतील. मुंबईची आरोग्य सेवा धोक्यात येईल. कचरा, घाणीचे साम्राज्य वाढेल. वाढती गर्दी, येणारे लोंढे यावर काही नियंत्रण होऊ शकेल का याबाबत सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा मुंबईचा माणूस लांब जाण्याचा विचार करेल. मूठभर धनिकांसाठी ‘नाईट लाईफ’चे सोंग पांघरूण मुंबईची दुरवस्था करू नका. समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.
– हरिभाऊ खरनार, उल्हासनगर
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कसा सोडवणार
मुंबईला जागतिक शहर बनवण्याचा दृष्टीने हा निर्णय योग्य आहे. कारण अनेक परदेशी नागरिक मुंबईत येतात. पण विविध कारणांमुळे असलेल्या निर्बंधामुळे लवकर बंद होणारे हॉटेल – रेस्टारंट यामुळे त्यांची भटकंतीही मर्यादित राहते. २४ तास हॉटेल्स सुरू ठेवण्याच्या परवानगीमुळे अधिकाधिक पर्यटक आकर्षित होऊन महसूल वाढेल.
मात्र नाईट लाईफला पाठिंबा देताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कसा सोडवणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. तसेच गुन्हेगारीला पाठीशी घालण्यासाठी नाईट लाईफचा फायदाच होईल. नाईट लाईफमध्ये औषध-दुग्धालये, दुकाने आणि फक्त खाद्य भोजनालये हॉटेल रात्रभर चालू ठेवावीत. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि महानगरपालिकेच्या तिजोरीत अधिक महसूल जमा होईल.
– प्रवीण पाटील, मुंबई
जन आंदोलनाची गरज
गुमास्ता परवाना कायद्याच्या नियमाने फक्त रात्री आठ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्याचा नियम आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत दुकाने व हॉटेल्स आजही सुरू आहेत. कायदे हे मोडण्यासाठीच असतात. दुकाने व हॉटेल्स यांनी वेळेच्या नियमाचे पालन केले असते, तर गुन्हे घडलेच नसते.
आता तर आदित्य ठाकरे यांनी रात्रभर दुकाने व हॉटेल्स उघडी ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातले आहे. हे कृत्य बालीश असल्यामुळे गुन्हेगारीत वाढ होईल. महाराष्ट्र आधीच बलात्कारांनी होरपळला आहे. नाईट लाईफमुळे तरुण मुले रात्री उशिरा घरी जाणे पसंत करणार नाहीत, हीच मुले सकाळीच घरी झोपण्यासाठी येतील.
पानपट्टीच्या दुकानावर कधी कारवाई झाली, अशी बातमी आपल्या वाचण्यात अद्याप आलेली नाही! हेच अधिकारी त्या अनधिकृत पानपट्टीच्या दुकानांवर कानाडोळा करतात. आज ना उद्या नाईट लाईफची सुरुवात होणार! तरी जनतेने कुठल्याही पक्षाचा आधार न घेता नाईट-लाईफच्या विरोधात जन आंदोलनास तयार राहावे.
– रामचंद्र मेस्त्री, घाटलेगाव
पोलीस यंत्रणा गोत्यात येईल
मुंबई शहराला जागतिक शहर बनवण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा ‘नाईट लाईफ’ प्रस्ताव श्रीमंत हॉटेल संघटनांना खूश करणारा आहे. मुंबईतील शिस्त, दैनंदिन जीवन, महिलांची सुरक्षितता टिकवायची असेल, तर या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविणे म्हणजे पोलीस यंत्रणेला गोत्यात आणणारे आहे.
पर्यटकांसाठी हॉटेल्स, पब रात्रभर चालू ठेवून हॉटेल मालकांचा गल्ला वाढविण्यासाठी आदित्यजींनी चक्क मुंबईची स्वच्छता व महिला सुरक्षितताच विकावयास काढली का, असा प्रश्न पडलाय. पोलीस आयुक्त राकेश मारिया मुंबईच्या सुरक्षिततेचा विचार करून या प्रस्तावाला बंदी आणतील. थोडक्यात खोकला आला म्हणून गळा कापण्याचा हा प्रकार होईल व भरकटलेल्या तरुणाईला आवरणे मग कठीण जाईल.
– विभा भोसले, मुलुंड
नाईट लाईफला मान्यता नकोच
मुंबईतील हॉटेल रात्रभर सुरू ठेवण्यास पोलीस आयुक्तांनी दिलेल्या संमतीमुळे मुंबईतील नाईट लाईफ पहाटेपर्यंत सुरू राहणार आहे. परंतु या निर्णयामुळे काही बाबींवर थेट परिणाम होणार आहे. त्या विचारात घेतल्या गेल्या होत्या का? ‘नाईट लाईफ’च्या मान्यतेनंतर मुंबई २४ तास चालू राहिली, तर आधीच अपु-या असलेल्या पोलीस बळावर ताण येऊ शकतो.
त्यामुळे असुरक्षितेत भर पडू शकते. रात्रीच्या जागत्या मुंबईमुळे विजेची मागणी वाढू शकते. मुंबई आर्थिक राजधानी असल्याने ही वाढीव विजेची मागणी पुरवली जाईल, पण त्यामुळे राज्यातील इतर भागातील वीजपुरठयावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नाईट लाईफला मान्यताच नकोच.
– पी. बजरंग रेवाळे, दहिसर
नाईट लाईफचे फॅड नकोच!
नाईट लाईफला मान्यता म्हणजे, चंगळवाद झिंदाबाद म्हणायची वेळ जवळ आलेली दिसते. एकीकडे व्हॅलेंटाईन डेची तोडफोड, मुस्कटात हाणणे व जय महाराष्ट्र म्हणून छाती पुढे काढणे हेच का नाईट लाईफचं वैशिष्टय़ तंबाखूमुळे आबांची जीवनयात्रा संपली.
त्यामुळे येणारी पिढी व आताची तरुणाई भलतीकडे वळण्यास प्रोत्साहन बिलकूल देता कामा नये. दाभोलकर, पानसरे यांना दिवसा ढवळ्या संपविले जाते. खून, बलात्कार, हाणामा-या या गुन्हेगारीपासून चार हात लांब राहण्यासाठी तरी मुंबईत नाईट लाईफचे फॅड नकोच!
– उत्तम भंडारे, चेंबूर
उच्चभ्रू वर्गासाठीच नाईट लाईफ!
मुंबईत नाईट लाईफ कल्चर रुजविण्यासाठी युवा सेनाप्रमुखांनी रात्रभर पब, बार, हॉटेलसोबत वडापाव, पाणीपुरी आदी खाद्यपदार्थ विक्रीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केल्यानंतर लगेचच मुंबई पोलीस आयुक्तांनीही त्या मागणीला हिरवा कंदील दाखवला. जर मुंबईत रात्रभर पब, पाटर्य़ा व रस्त्यावर वर्दळ सुरू राहिली, तर या गर्दीवर रात्रीच्या वेळी पोलिसांना संपूर्ण लक्ष ठेवणं शक्य होणार नाही. परिणामी, कायदा-सुव्यवस्था बिघडेल.
– दादासाहेब येंधे, काळाचौकी
‘ई-मेल’द्वारा आलेली पत्रे..
‘नाईट लाईफ’चा हट्ट कशाला
‘नाईट लाईफ’च्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेने व मुंबई पोलिसांनी हिरवा कंदील दाखवला असला, तरी राज्य शासनाने मंजुरी देताना सामाजिक व सुरक्षेच्या बाबींवर विचार करूनच निर्णय घ्यावा. कष्टकरी व सर्वसामान्य मुंबईकरांना नाईट लाईफची गरज नाही. ही संस्कृती फक्त उच्चभ्रू समाजाची आहे.
मुंबईत वाढते महिलांवरील अत्याचार व वेगवेगळ्या गुन्हेगारी कृत्यांमुळे मुंबई असुरक्षित बनत असताना नाईट लाईफचा हट्ट अनावश्यक वाटतो. यामुळे अंमली पदार्थ व नशेच्या इतर काही गोष्टी तरुणांना सोप्या पद्धतीने उपलब्ध होतील आणि तरुण पिढी व्यसनाच्या जाळ्यात अडकेल. नाईट लाईफमुळे सुरक्षा यंत्रणांवर देखील अतिरिक्त बोजा पडेल.
– नितीन प्रकाश पडते, ठाणे (प.)
गुन्हेगारी वाढवू नका
नाईट लाईफ संस्कृती शहरात अमलात आणाल, पण आज देशांच्या गरीब, कष्टकरी आणि शासनाच्या योजनेपासून वंचित असलेल्या ग्रामीण भागातील आदिवासींचे काय! आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्रात समाज घडवायचा असेल तर, ग्रामीण आदिवासी गरिबांचे अश्रू पुसावेत. त्यांच्या मुलांना शिक्षणात ई लर्निंगसारखे माध्यम आणून देशाला प्रगत करावे.
रेस्टॉरंट, हॉटेल्स, व्यावसायिक इत्यादींच्या व्यवसायांना चालना देण्यापेक्षा शिक्षित तरुणांना नोकरी द्या, राज्यात शिक्षित तरुणांना पोलीस दलात सामील करून पोलिसांची मोठया प्रमाणात भरती करा. परदेशाची परंपरा राज्यात आणू नका. राज्यात चांगले विचार-आचार आणि नियोजन करीत फायदा-नुकसान पाहणेही जरुरीचे आहे.
मोठयांचे मार्गदशन घ्या, गुन्हेगारीचे रोपटे राज्यात लावू नका. परिवर्तन करायचे असेल तर कायदा-सुव्यवस्था कडक करा, शासनाच्या योजना राबवा. नाईट लाईफ पद्धत राज्यात राबवून राज्याची अस्मिता मलीन करू नका.
नाईट लाईफची अंमलबजावणी करण्याअगोदर मोठया बुद्धिवतांचे मार्गदर्शन घेऊनच पर्यटकांसाठी उपाययोजना राज्यात राबवाव्यात, अन्यथा पाकिस्तान होण्यास वेळ लागणार नाही.
– राजेंद्र सावंत, टीटवाळा
आधी मूलभूत गरजांची तजवीज करा
नाईट लाईफच्या नियोजित प्रस्तावामुळे मुंबई शहर रात्रभर जागे राहिल्यास काय होईल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. प्रस्ताव मांडणाऱ्यांकडून आमची भूमिका कशी रास्त आहे आणि या प्रस्तावामुळे फक्त श्रीमंतांचाच नाही तर गरिबांचासुद्धा फायदा होणार आहे, हे बिंबवले जात आहे.
हे सर्व जरी खरे असले तरी काही बाबींवर थेट परिणाम होणार आहे. निरनिराळे गुन्हे रोज उघडकीस येत असल्यामुळे मुळात मुंबईकर सुरक्षित आहे का? हाच खरा प्रश्न आहे. अशातच जर ‘नाईट लाईफ’ला मान्यता मिळून मुंबई २४ तास चालू राहिली तर आधीच अपु-या असलेल्या पोलीस बळावर ताण येऊ शकतो. त्यामुळे असुरक्षिततेत भरच पडू शकते.
रात्रीच्या जागत्या मुंबईमुळे विजेची मागणी वाढू शकते. मुंबई आíथक राजधानी असल्याकारणाने ही वाढीव विजेची मागणी पूर्ण होईल. पण त्यामुळे राज्यातील इतर भागातील वीजपुरवठयावर परिणाम होऊन त्या भागातील लोडशेिडग वाढू शकते. हेच पाणीपुरवठयाच्या बाबतीत म्हणता येईल.
एकूणच मूलभूत गरजांची मागणी वाढून त्यांचा तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे सरसकट ‘नाईट लाईफ’ला मान्यता न देता प्रायोगिक तत्त्वावर अगदीच आवश्यक असेल, अशा ठिकाणी मोजकीच दुकाने चालवून पाहवीत. त्याचबरोबर मूलभूत गरजांची तजवीज केली जाईल हे पाहावे. जेणेकरून संबंधित यंत्रणावर ताण येणार नाही.
– दीपक काशिराम गुंडये, वरळी
ठरावीक भागातच ‘नाईट लाईफ’ला परवानगी द्या
‘नाईट लाईफ’मुळे सामाजिक जीवनावर मोठासा फरक पडेल, मोठे दुष्परिणाम होतील, असे वाटत नाही. नाईट लाईफमुळे परदेशी चलन भारतात येईल. मुंबई पोलीस यासाठी सक्षम आहेत, ते मुंबईची दक्षता, सुरक्षितता, न्यायव्यवस्था सक्षमपणे सांभाळतील, याबद्दल मुंबईकरांना विश्वास आहे.
नाईट लाईफमुळे गुंडगिरी वाढेल, मुंबई असुरक्षित होईल हे म्हणणे चुकीचे वाटते. कारण नाईट लाईफमुळे सगळीकडे सामान्य लोकांचे रात्री जाणे-येणे वाढेल. त्यांचा वाढता सहभाग असेल, त्यामुळे पोलीस व जनता या शक्तीला घाबरून कोणी गुन्हेगारी करेल, असे वाटत नाही.
उलट त्यामुळे मुंबईमध्ये रात्री-अपरात्री कोणलाही प्रवास करणेही सोपे जाईल. सुरुवातीला नाईट लाईफला विमानतळ, हॉस्पिटल परिसर, रेल्वे परिसर, बस डेपो, मंदिरे अशा ठिकाणी प्राथमिक तत्त्वावर चालू करावीत. मात्र या अगोदर पोलिसांचे मत घ्यायला हवे व कायदे-नियम करताना त्यांचाही सहभाग असायला हवा. पोलीस कंट्रोल रूमची भूमिका मोठी असेल, तेव्हा ते मजबूत करायला हवे जेणेकरून सामान्यांना ताबडतोब मदत उपलब्ध होईल.
– दीपक नाडकर, गिरगाव
एवढा पुळका कुणासाठी
जनसामान्यांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व सुरक्षा या गरजेच्या सुविधा आहेत. या महत्त्वाच्या कामांना प्राधान्याने करावयाचे सोडून आमच्या युवा नेत्यांना केवळ श्रीमंत व अति श्रीमंतांच्या अडाणटप्पू चिरंजीवांचे चोचले पुरविण्यासाठी आहे का?
दोन कोटींच्या वर लोकसंख्या पोहोचलेल्या मुंबई महानगरासाठी असलेल्या ४० हजार पोलिसांची फौज सध्याच अपुरी पडत आहे, अशी व्यथा पोलीस महासंचालक व आयुक्त वारंवार व्यक्त करीत आहेत. यापैकी २५ टक्के पोलीस तर बडया नेत्यांच्या व महत्त्वाच्या व्यक्तींसाठीच सध्या कार्यरत आहेत.
उरलेले ७५ टक्के पोलिसांचे सामर्थ्य कमालीचे अपुरे पडत असताना त्यांना या ‘निशा-जीवना’मुळे निर्माण होणा-या सुरक्षेच्या जबाबदारीची भर टाकण्यात शहाणपण ते कोणते? दहशतवादी हल्ल्यासाठी आतंकवाद्यांना अनायासेच अनुकूल वातावरण प्राप्त होण्याचा धोका नजरेआड करण्यासारखा नाही.
भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी पोलिसांना आयतेच नवीन कुरण उपलब्ध होईल, यात शंका नाही. थोडक्यात म्हणजे ‘निशा-जीवनाची’ ही घातक व चिंताजनक बाब विचारात घेता या विषयाला मुळातूनच अनुमती नाकारणे अंतिमत: इष्ट, समुचित व न्याय्य ठरेल, सूज्ञास अधिक सांगणे नलगे!
– मधुकर ताटके, गोरेगाव (प.)
चंगळवादाला चालना मिळेल
माया नगरी मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर व देशाची आर्थिक राजधानी असल्याने ते घडयाळाच्या काटयावर व चाकावर चालणारे शहर असून सतत दहशतवादाच्या छायेखाली आहे. या शहरात हाताच्या बोटावर मोजता येईल, एवढयाच आस्थापनांमध्ये रात्रपाळी सुरू असते.
अन्यथा मध्यरात्री सर्वच व्यवहार ठप्प असतात. ते केवळ शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिणामी मुंबईत चंगळवादाला प्रोत्साहन मिळवून देणारे नाईट लाईफ कल्चर रुजवणे विसंगत ठरेल. केवळ पर्यटनास चालना मिळेल, रोजगाराच्या संधी व महसुली उत्पन्न वाढेल, अशा हॉटेल व्यावसायिकांच्या मागण्या पुढे करून समाजाचे हित साधण्याऐवजी युवा पिढी चंगळवादाकडेच झुकण्याची जास्त शक्यता असून गुन्हेगारीत वाढ होण्याचा धोका संभवतो.
– पांडुरंग भाबल, भांडुप